संपूर्ण विश्वात ज्या विषयावर सध्या चर्चा, आंतराष्ट्रीय वैद्यकीय आणि सामाजिक परिषदाचं वेबिनारच्या माध्यमातून आयोजन होतंय, तसेच वेगवेगळ्या पैलूंचा धांडोळा घेत महत्वपूर्ण बाबीवर खल घातला जातोय तो म्हणजे कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेला हा आजार. या आजाराने गेले नऊ महिने भारतातील आरोग्य व्यवस्थेला जेरीस आणले आहे. लाखोंच्या संख्येने या आजाराने बाधित झाले आहे तर हजारोंच्या संख्येने नागरिकांनी प्राण गमावले आहेत. खरं तर कोरोना सध्याच्या घडीला तुम्हा-आम्हा, श्रीमंत-गरीब जनतेचा अत्यंत 'जवळचा' विषय झालाय. त्याने अनेकांच्या घरात प्रवेश मिळवून अनेक घरं उध्वस्त केलीत. वास्तवात कोरोनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असताना राज्यातील लोकप्रतिनिधीना इतर विषयाचं राजकरण सुचतं कसं हा खरा संशोधनाचा विषय आहे.


अनेक रुग्ण 'आरोग्य व्यवस्था' तोकडी पडत असल्यामुळे तडफडून मरतायत, प्राण सोडतायत. विशेष म्हणजे सध्याची वाढती रुग्णसंख्या पाहता कोरोनाने रौद्र रूप धारण केल्यासारखं चित्र संपूर्ण राज्यात आहेत. या सगळ्या प्रकारात कोरोनावरचा फोकस हलून भलतीकडेच जातोय की काय अशी शंका निर्माण होतेय.

राज्यात रोज रुग्णसंख्येचा उच्चांक येत आहे. शुक्रवारी 19 हजार 218 नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले. या अशा परिस्थितीत कोरोनाच्या अनुषंगाने आणखी काही करता येईल का यावर लक्ष देणे अधिक गरजेचे आहे. त्यावेळी राज्यात गेली अनेक दिवस 'फडतूस' विषयवार चर्चा सुरु असताना दिसत आहे. यामध्ये राजकारणी आहेत हे विशेष. खरं तर लोकप्रतिनिधीनी जनतेच्या विषयवर लक्ष दिले पाहिजे, त्यांच्या समस्या सोडवल्या पाहिजे. कोणत्या विषयाला किती महत्व द्यायचं याचा निर्णय त्यांनी घेतला पाहिजे. ज्या कोरोना सारख्या जटिल आजारामुळे शेकडो नागरिक रोज मरण पावत आहेत. अशा विषयाकडे लक्ष दिले तर कोरोनाच्या अनुषंगाने आखण्यात येणाऱ्या आरोग्य व्यवस्थापनात काही तरी बदल होतील.

सध्याच्या प्रसिद्धीमाध्यमांवरील चर्चेमुळे कोरोना संपला की काय अशी शंका येते. कोरोनाच्या प्रत्येक घडामोडीशी सर्वसामान्य जनतेचा संबंध आहे. या आजाराच्या विरोधात निघणारी लस केव्हा येतेय याची नागरिक चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. कधी एकदाचा हा कोरोनाचा कहर संपेल अशीच प्रत्येकाची भावना आहे. ज्या विषयांमुळे थेट नागरिकांच्या आयुष्यावर परिणाम होतो अशा विषयाला महत्व द्यायचं की अन्य विषय ज्याने सर्वसामान्यांच्या जीवनात कणभरही फरक पडत नाही त्या विषयाची चर्चा करायची, हे ठरवण्याची वेळ आता आली आहे.

कोरोनाचं संकट दिवसेंदिवस गडद होत आहे, राज्याचा विचार केला तर अनेक ठिकाणी आरोग्य सुविधेच्या समस्या 'आ' वासून उभ्या आहेत. त्या प्रश्नाची उत्तरे शोधायची नितांत गरज आहे. पुण्यातील कहर कमी होता की काय त्यात आता नागपूर शहराची भर पडली आहे. दिवसाला नवीन रुग्णांची संख्या 1500 इतकी पोहचली आहे. त्याठिकाणी काही विशेष उपाययोजना करता येतील का हे पाहण्यासाठी मुंबई महापालिकेचे इकबालसिंग चहल, डॉ. मुज्जफल लकडावाला यांना खास निमंत्रित केले होते. त्याठिकाणी जंबो फॅसिलिटी कशा पद्धतीने उभारता येईल याची चाचपणी केली गेली. त्याशिवाय टेस्टिंग फॅसिलिटी वाढविण्यासाठी कोणते प्रयत्न केले पाहिजे, तसेच सर्वेक्षण करताना ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग ट्रीटमेंट याचा कशा पद्धतीने वापर करता येईल यावर मत व्यक्त करण्यात आले. त्याशिवाय ज्या पद्धतीने मुंबई आणि पुण्यात खासगी रुग्णालयांनी कोरोनाच्या रुग्णाच्या उपचाराचा भार उचलला आहे त्यापद्धतीने अधिकच्या संख्येने खासगी रुग्णालयांनी पुढे यायला पाहिजे मत असे मुंबईतून गेलेल्या डॉक्टरांनी व्यक्त केले.

पश्चिम महाराष्ट्रात अनेक रुग्णांना बेड्स मिळत असल्याच्या तक्रार आजही कायम आहेत, त्याचप्रमाणे काही ठिकाणी औषधांचा तुटवडा जाणवत आहे. पुण्यात जंबो फॅसिलिटीच्या नावाने अजूनही बोंबाबोंब सुरुच आहे. कोरोनाचं संकट हे यापूर्वीच्या संकटापेक्षा वेगळं आहे, यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन उपाय योजना करण्याची गरज आहे. मात्र राज्यात एकमेकांवर आरोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. अनेक वेळा प्रशासनामध्ये समन्वयाचा अभाव आढळतो. राज्यात प्रत्येक जिल्ह्याचे प्रश्न वेगळे आहेत. प्रत्येकाने निर्णय घेताना स्थानिक पातळीवरील प्रश्नाचा अभ्यास करून निर्णय घेणे अपेक्षित आहे. मुंबई शहराला लागू पडणारे नियम इतर शहरांना लागू पडतीलच असे नाही. अनेकवेळा मोठ्या अडचणींचा सामना करून रुग्ण शासकीय रुग्णालयात दाखल होतात. मात्र, नातेवाईकांना त्यांच्या रुग्णाबाबतचे सर्व अपडेट वेळेत मिळत नाही. त्यामुळे अनाठायी गोंधळ उडतो, आरोग्य व्यवस्थेतील कर्मचारी आणि रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये वाद होतानाचे प्रकार अनेक ठिकाणी घडत आहेत. यासाठी काही मार्गदर्शक तत्वे तयार करून सर्व शासकीय रुग्णालयात ती तात्काळ पाठविण्यात आली पाहिजे. हे वाद टाळता येण्यासारखे आहेत फक्त संवाद व्यवस्थित होत नाही, ते व्यवस्थित होण्याची गरज आहे.

आपण सगळ्यांनी मान्य केले पाहिजे कोरोनाचा हा आजार हा सर्वांसाठीच नवीन आहे. मात्र, आता सहा महिने झाल्यानंतर ही सबब पुढे करून चालणार नाही. रुग्णांना उपचार पाहिजे असतात ते कसे मिळतील याकडे त्याचे लक्ष असते. अनेकवेळा रुग्णांना समजावताना डॉक्टरांची दमछाक होते हे कटू वास्तव मान्य केले पाहिजे. डॉक्टरांवर कामाचा ताण दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अनेक ठिकाणी तज्ञ डॉक्टर उपस्थित नाही. कुशल मनुष्यबळाची मोठी कमतरता राज्यात भासत आहे. शिथिलतेच्या नावाखाली लोकांनी प्रवास सुरु केले आहेत. पण खरोखरच या प्रवासाची गरज आहे का? हा प्रश्न प्रत्यकाने स्वतःला विचारला पाहिजे. अनेक लोक विनाकारण प्रवास करीत आहे. राज्यावर आणि देशावर एवढं मोठं संकट आले आहे त्याला सावरण्यासाठी प्रत्यके नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. कोरोना आजाराचे गांभीर्य फक्त ज्याच्या घरामध्ये कोरोनाचा रुग्ण झाला आहे, त्यालाच असावे असे नाही. कोरोना कोणालाही कधीही होऊ शकतो. ही खरी तर वेळ आहे एकजुटीने लढण्याची, मात्र तरीही काही वेळा अशा घटना आपल्याला पाहायला मिळतात कि, ज्या व्यक्तीला कोरोना होतो त्याला आणि त्याच्या कुटुंबियातील लोकांबरोबर नाते तोडण्याचे प्रकार घडत आहेत.

खूपच भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या इतकी वाईट वेळ आली आहे, की माणसे एकमेकांकडे संशयाने पाहू लागली आहेत. प्रत्येकजण विविध समस्येने ग्रासला आहे. कोरोनाच्या आजाराबरोबर अनेकांसमोर रोजगाराचे मोठे प्रश्न उभे राहिले आहेत. आजच्या काळात खरं तर प्रत्येकालाच आधाराची गरज आहे. काही लोकांना मानसिक आधाराची नितांत गरज आहे, अनेक नागरिक नैराश्याच्या गर्तेत सापडले आहेत. कोरोनाचे संकट कधी संपेल हे आता कुणीच सांगू शकणार नाही. अनेक जण प्रत्येक दिवस उद्या काही तरी चांगलं होईल या आशेवर जगत आहे. वरिष्ठ नागरिकांची परिस्थिती तर खूप कठीण होऊन बसली आहे. अशा या चोहोबाजूनी आलेल्या संकटाच्या काळात फालतू विषय चघळत बसण्यापेक्षा कोरोनाचा प्रसार कमी कसा करता येईल याचा विचार केला पाहिजे. या अशा कठीण काळात लोकप्रतिनिधींचे मायेचे,आपुलकीचे चार शब्द औषधासारखी जादू करतात, अनेकांना धीर प्राप्त होतो. कोरोनाचा कहर वाढत असताना या विषयावरचा फोकस हलता कामा नये, नागरिकांची खरोखरच राजकारणी काळजी घेत आहेत असे वर्तन या काळात अपेक्षित आहे.

संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग