Zero Hour Santosh Deshmuh : महंतांची भेट ते जरांगेंचा दावा...बीड प्रकरणी Manoj Jarange EXCLUSIVE
नमस्कार मी विजय साळवी... एबीपी माझाच्या झीरो अवर या खास कार्यक्रमात आपलं स्वागत...
मंडळी, महाराष्ट्राचं राजकारण गेल्या दोन महिन्यांपासून बीडमधल्या मस्साजोगचे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाभोवती फिरतंय.. त्याच प्रकरणात आजही अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत...
यात सर्वात महत्वाची घडामोड म्हणजे आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती... आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्याभोवती आरोपांचा डोंगर उभा राहत असताना... धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी तीव्र होत असताना... मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना न्याय मिळावा म्हणून त्यांच्या कुटुंबाचा पाठिंबा वाढत असताना...
आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही काय निर्णय होणार... याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं.. त्यात राज्य मंत्रिमंडळाच्या या बैठकीआधी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी मंत्री धनंजय मुंडेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले... विशेष म्हणजे एबीपी माझानं हा कृषी खरेदी गैरव्यवहार सर्वप्रथम चव्हाट्यावर आणला होता. त्याच मुद्द्यावर आज अंजली दमानियांनी आरोप केले. त्यावर मुंडेंनी स्पष्टीकरण देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. मग मुंडेंचं स्पष्टीकरण खोडून काढण्यासाठी दमानिया पुन्हा माध्यमांसमोर आल्या. मग मुंडेंनी आपण दमानियांवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं जाहीर केलं.
धनंजय मुंडेंवर घोटाळ्य़ाचे गंभीर आरोप झाल्यामुळे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडेही सगळ्यांचं लक्ष होतं.. पण त्यानंतरही आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंडेच्या राजीनाम्यावर कोणताही निर्णय झाला नाही... त्यामुळं काहींचा विरोध आणखी तीव्र झाला.. पण त्याचवेळी सरपंच संतोष देशमुखांचं कुटुंब आपल्या मागण्यावर ठाम होतं. मुंडेंच्या राजीनाम्यापेक्षा प्रकरणातील आरोपींना शिक्षा व्हावी... याच मागणीचा पुनरुच्चार संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी एबीपी माझाशी बोलताना केला.. धनंजय देशमुखांनी आज नारायणगडचे महंत शिवाजी महाराज यांची भेट घेतली..
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याआधी धनंजय मुंडेंनी भगवानगडावर जाऊन... महंत नामदेव शास्त्रीकडून आशीर्वाद घेऊन... समाज माझ्या पाठीशी आहे... असा संदेश देण्याचा प्रयत्न केला होता... इतकंच नाही तर भगवानगड खंबीरपणे धनंजय मुंडेंच्या पाठीशी आहे असं म्हणत नामदेवशास्त्रींनी संपूर्ण प्रकरणात धनंजय मुंडेंना क्लिनचीटही दिली होती.. त्यानंतर किती मोठं राजकीय वादळ आलं हे पुन्हा नव्यानं सांगण्याची गरज नाहीय.. त्यातच संतोष देशमुखांचे कुटुंबीय नामदेव शास्त्रींच्या भेटीला पोहोचलं..
तिथं बीड जिल्ह्यातील जातीय राजकारणावरुन नामदेवशास्त्रींनी मोठं भाष्य केलं.. आणि त्यांची चर्चा शांत शांत होण्याआधीच... आज मस्साजोगमध्ये मोठी घडामोड घडली.. नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांनी थेट मस्साजोगला जावून देशमुखांच्या कुटुंबाची भेट घेतली.. महंत शिवाजी महाराज यांच्यासोबत महंत लक्ष्मण महाराज मेंगडे हेही उपस्थित होते. त्यांनी देशमुख कुटुंबीयांचं सांत्वन केलं. त्यांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केलं ... की अवघा वारकरी सांप्रदाय देशमुख कुटुंबीयांच्या पाठीशी आहे... त्यामुळं गेल्या चार दिवसांमधल्या दोन अत्यंत महत्वाच्या भेटींनी बीडचं समाजकारणही स्पष्ट झालं.
आणि आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा सर्वात मोठा दावा... छत्रपती
संभाजीनगरमध्ये उपचार घेत असलेल्या जरागेंनी आज अनेक विषयांवर भाष्य केलं... संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणाऱ्या नेत्यांमध्ये जरांगेंचाही समावेश आहे.. त्यामुळं माध्यमांशी बोलत असताना ते किमान एकदा तरी त्याचा उल्लेख करतात.. पण, आज त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांविषयी एक मोठी शंका उपस्थित केली... कोणती आहे ती शंका.. आणि त्याचा बीड प्रकरणावर कसा परिणाम होवू शकतो.. याचीच चर्चा आजच्या भागात करणार आहोत.. पण सुरुवात जरांगेंच्या वक्तव्यानं...पाहूयात ते नेमकं काय म्हणाले?
All Shows

































