![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
India-Maldives Row : चीनमधून येताच मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांकडून भारताला पहिल्यांदा इशारा अन् आता थेट 15 मार्चपर्यंत अल्टीमेटम!
India-Maldives Row : नुकत्याच चीनच्या दौऱ्यानंतर मायदेशी परतलेले राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू आता भारताबाबत सातत्याने टोकदार विधाने करत आहेत.
![India-Maldives Row : चीनमधून येताच मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांकडून भारताला पहिल्यांदा इशारा अन् आता थेट 15 मार्चपर्यंत अल्टीमेटम! India Maldives Row Maldives asked India to withdraw its military personnel from the archipelago by March 15 India-Maldives Row : चीनमधून येताच मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांकडून भारताला पहिल्यांदा इशारा अन् आता थेट 15 मार्चपर्यंत अल्टीमेटम!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/14/7fc18fedb69108ddb250ca39321aea301705235274601736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
India-Maldives Row : मालदीव आणि भारत (India-Maldives Row) यांच्यातील संबंध सातत्याने वाढत आहेत. दरम्यान, मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी रविवारी (14 जानेवारी) पुन्हा एकदा 'इंडिया आउट'चा नारा दिला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, मोहम्मद मुइज्जू यांनी भारताने मालदीवमधून आपले सैन्य मागे घ्यावे या मागणीचा पुनरुच्चार केला आहे. यासोबतच त्यांनी भारताला 15 मार्चचा अल्टिमेटम दिला आहे. यापूर्वी मालदीवने दोन महिन्यांपूर्वी भारतीय सैन्य हटवण्याची मागणी केली होती. सरकारी आकडेवारीनुसार मालदीवमध्ये 88 भारतीय सैनिक आहेत.
नुकत्याच चीनच्या दौऱ्यानंतर मायदेशी परतलेले राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू आता भारताबाबत सातत्याने टोकदार विधाने करत आहेत. शनिवारी (13 जानेवारी) मुइज्जू यांनी पत्रकार परिषदेत भारताचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. ते म्हणाले होते की, आम्ही लहान असू पण आम्हाला धमकावण्याचा परवाना त्यांना (भारत) मिळत नाही.
भारताला 15 मार्चपर्यंत सैन्य मागे घेण्यास सांगितले
सनऑनलाइन वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, राष्ट्रपती कार्यालयातील सार्वजनिक धोरण सचिव अब्दुल्ला नाझिम इब्राहिम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, राष्ट्रपती मुइझ्झू यांनी औपचारिकपणे भारताला 15 मार्चपर्यंत सैन्य मागे घेण्यास सांगितले आहे. भारतीय सैनिक मालदीवमध्ये राहू शकत नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मालदीव सरकारच्या धोरणाचा दाखला देत नाझिम म्हणाले की, राष्ट्रपती डॉ. मोहम्मद मुइज्जू आणि त्यांच्या प्रशासनाचे हे धोरण आहे.
भारताला अप्रत्यक्ष इशारा
दरम्यान, मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी अप्रत्यक्षपणे भारताला शनिवारी इशारा दिला होता. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, राष्ट्राध्यक्ष मुइज्जू त्यांचा 5 दिवसांचा चीन दौरा संपवून मालदीवला परतले. पत्रकार परिषदेत त्यांनी बोलताना आम्ही लहान असू पण आम्हाला धमकावण्याचा परवाना त्यांना (भारत) दिलेला नाही, अशा शब्दात इशारा दिला होता. पंतप्रधान मोदींच्या नुकत्याच झालेल्या लक्षद्वीप दौऱ्यावर मालदीवचे नेते आणि अनेक मंत्र्यांनी अपमानास्पद टिप्पणी केल्याने हा वाद निर्माण झाला होता. या प्रकरणी मालदीव सरकारने गेल्या 7 जानेवारीला आपल्या तीन मंत्र्यांना त्यांच्या पदावरून निलंबितही केले होते.
मालदीवची चीनला अधिक पर्यटक पाठवण्याची विनंती
दरम्यान, मुइज्जू यांच्या पाच दिवसांच्या चीनच्या द्विपक्षीय दौऱ्यात चिनी नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर संयुक्त निवेदनही जारी करण्यात आले होते. उभय देश त्यांच्या मूळ हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी एकमेकांना जोरदार पाठिंबा देण्यास सहमत असल्याचे म्हटले होते. मालदीवने चीनला अधिक पर्यटक पाठवण्याच्या 'वेगवान' प्रयत्नांमध्ये सहकार्य करण्याची विनंती केली होती. मालदीवचे अध्यक्ष मुइज्जू यांनी 10 जानेवारी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचीही भेट घेतली होती. यानंतर दोन्ही देशांमध्ये 20 महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्याही झाल्या.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)