VIDEO Chitrasen Khilare : 35 वर्षांपूर्वी 'दीनानाथ'ला जागा देऊन आम्ही चूक केली का? मूळ मालक खिलारे कुटुंबीयांना आज काय वाटतंय?
Deenanath Mangeshkar Hospital : मंगेशकरांना जमीन ज्या उद्देशासाठी दिली होती तो आज साध्य होतोय का? तनिषा भिसेच्या मृत्यूला रुग्णालयासोबत आम्ही खिलारे कुटुंबीय जबाबदार आहोत असं चित्रसेन खिलारे म्हणाले.

पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये पैशाअभावी एका महिलेचा जीव गेल्याची घटना घडली. त्यानंतर या रुग्णालयाला जमीन दान केलेल्या पुण्यातील खिलारे कुटुंबीयांबद्दल सोशल मीडियामध्ये एक पोस्ट फिरत आहे. भाऊसाहेब खिलारेंनी शरद पवारांच्या सांगण्यावरुन लता मंगेशकरांना रुग्णालयासाठी जमीन दिली होती. या सगळ्या घटनेवर आता खिलारे कुटुंबीयातील वारस चित्रसेन खिलारे यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी या रुग्णालयाबद्दल खिलारे कुटुंबीयांना आलेले अनेक चांगले-वाईट अनुभव सांगितले.
लता मंगेशकरांना ही जागा कशी दिली?
चित्रसेन खिलारे म्हणाले की, "बाळासाहेब खिलारे यांच्या डेक्कन परिसरात मोठ्या होत्या. सामाजिक संस्थांसाठी त्या मोठ्या प्रमाणात दान करण्यात आल्या होत्या. 1989 साली लता मंगेशकरांनी रुग्णालयासाठी जमीन मागितली. लता मंगशकरांनी त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर शरद पवारांनी भाऊसाहेबांना जागेसाठी विचारलं. तुमच्या अनेक जागा या सामाजिक कार्यासाठी वापरल्या गेल्या आहेत, आता गरिबांसाठी एक रुग्णालय उभा राहत असेल तर ती चांगली गोष्ट आहे असं पवारांनी सांगितलं."
त्यावेळी सर्व सरकारी रुग्णालये ही पुण्यातील पूर्व भागात होती. पश्चिम भागात एकही मोठं रुग्णालय नव्हतं. त्यामुळे या भागातील नागरिकांसाठी जर रुग्णालय उभं राहत असेल आणि ते आपल्या जागेवर राहत असेल तर ती पुण्याईची गोष्ट आहे असं भाऊसाहेबांना वाटलं आणि त्यांनी जमीन दान करायची ठरवली. त्यानंतर शरद पवारांनी सरकारी स्तरावर तात्काळ हालचाली केल्या आणि ती जागा लता मंगेशकरांच्या दीनानाथ मंगेशकर ट्रस्टला दिली.
रुग्णालयाच्या उद्घाटनावेळी भाऊसाहेबांना मागे बसवलं
ज्यावेळी रुग्णालयाचं उद्घाटन करायचा कार्यक्रम ठरला त्यावेळी आम्हाला निमंत्रण पत्रिका आली होती. त्या कार्यक्रमाला गेलो असता भाऊसाहेबांना मागे कुठेतरी, चौदाव्या-पंधराव्या रांगेत बसवण्यात आलं होतं. भाऊसाहेबांना पाहताच एक महिला पोलिस अधिकारी धावत आल्या आणि त्यांनी खंत व्यक्त केली. ज्यांनी रुग्णालयासाठी जागा दिली त्यांनाच पुढे बसायला जागा नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. त्यानंतरही भाऊसाहेबांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. कारण एका हाताचं दान देतो ते दुसऱ्या हाताला कळू नये अशी त्यांची भावना होती.
खिलारे कुटुंबीयांनी साडेतीन लाखांचे बिल भरले
2010 साली भाऊसाहेब खिलारे यांच्यावर दीनानाथमध्ये बायपास सर्जरी करण्यात आली. त्यावेळी साडे तीन लाखांचे बिल झाले होते. ते बिल आम्ही रितसर भरले. भाऊसाहेब हे रुग्णालयात आहेत असं डॉ. रणजीत जगताप यांना समजले त्यावेळी ते आम्हाला भेटायला आले. त्यांनी थेट भाऊसाहेब खिलारे यांचे पाय धरले. या रुग्णालयासाठी जागा देणाऱ्या मूळ मालकाचे ऑपरेशन माझ्या हस्ते झाले, ही पुण्याई मला लाभली. ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच मी इथे आलो असल्याचं डॉ. रणजीत जगताप म्हणाले.
डॉ. केळकर हे व्हिजिटिंगला आले असता त्यांनी त्याची फी लावली असल्याचा किस्सा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याबद्दल आपल्याला इतकी माहिती नसून बिलाचे जुने रेकॉर्ड काढून ते तपासावेत.
भाऊसाहेबांच्या मृतदेहासाठी जागा देण्यास नकार
भाऊसाहेबांची अचानक तब्येत बिघडली त्यावेळी त्यांना ताबडतोब दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेण्यात आलं. पण तोपर्यंत भाऊसाहेबांचे निधन झालं होतं. हा धक्का आपल्या आईला सहन होणार नाही. त्यामुळे भाऊसाहेबांची बॉडी ही रात्री रुग्णालयातच ठेऊयात आणि सकाळी घेऊन जाऊयात असं आमचं ठरलं. पण दीनानाथच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की रुग्णालयात जागा नाही.
हे ऐकून स्थानिकांना मोठा धक्का बसला. ज्या मूळ मालकांनी रुग्णालयासाठी ही जमीन दिली त्यांनाच जागा नसल्याचं कारण सांगून नाकारलं जात आहे, यावर आश्चर्य व्यक्त केलं. त्यानंतर रुग्णालय प्रशासनातील एका मित्राला फोन करून सांगितल्यानंतर वरुन हालचाल झाली. नंतर भाऊसाहेबांची बॉडी ठेवण्यासाठी जागा देण्यात आली.
35 वर्षानंतर वाटतेय, आम्ही चूक केली का?
एखाद्या रुग्णाला पैशामुळे दाखल करुन घेतलं जात नाही आणि तो रुग्ण दगावतोय. 35 वर्षानंतर आता असं वाटतंय की आम्ही चूक केली का? त्या ठिकाणी आमची शेती होती. आम्ही स्वतःचा ट्रस्ट न काढता ती जमीन मंगेशकरांना दान केली. प्रत्येक रुग्णाला न्याय मिळाला पाहिजे अशी भावना त्यामागे होती. पण आज पैशा भरला नसल्याने रुग्ण दगावतोय. आपण सगळे इतके संवेदनशील झालोय का?
तनिषा भिसेंचा दुर्दैवी मृत्यू झाला. असंवेदनशील घटना घडली हे दुर्दैव आहे. ज्या हेतूसाठी खिलारे कुटुंबीयांनी 35 वर्षांपूर्वी जागा दिली तो हेतू साध्य होतोय का असा आज प्रश्न पडतोय. या पुढच्या काळामध्ये तरी अशा घटना घडू नयेत यासाठी प्रयत्न करावे. तनिषा भिसे यांना रुग्णालयात आल्यानंतर पहिला अॅडमिट करून घेणं हे महत्त्वाचं होतं.
यापुढे कोण आपली जमीन देईल का?
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा भिसे या महिलेला 10 लाख रुपये भरण्यास सांगितले. त्याशिवाय अॅडमिट करण्यात येणार नाही असं सांगितलं. त्यानंतर त्या महिलेचा मृत्यू झाला. यापुढे अशा रुग्णालयांसाठी कुठलाही जमीनदार किंवा शेतकरी जागा देईल का असा प्रश्न पडतो.
या घटनेला आम्ही खिलारे कुटुंबीय जबाबदार आहोत, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय जबाबदार आहे. यापुढे अशा गोष्टी घडू नये यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न केला पाहिजे.























