Nagpur : हिंसाचारग्रस्त नागपुरातली संचारबंदी सहा दिवसांनी पूर्णपणे मागे, पोलिस बंदोबस्त मात्र कायम
Nagpur Violence : येत्या काळात सोशल मीडियाच्या वापरावर पोलिसांची कडक नजर राहणार असल्याची माहिती नागपूरचे पोलिस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी दिली.
नागपूर : गेल्या सहा दिवसांपासून नागपूरमध्ये लागू असलेली संचारबंदी हटवण्यात आली आहे. गेल्या सोमवारी नागपूर शहरात झालेल्या हिंसाचारानंतर 11 पोलिस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली होती. ती आता उठवण्यात आली आहे. संचारबंदी उठवल्यानंतर नागपूर पोलिसांनी हिंसाग्रस्त भागात रुटमार्चही काढला. गणेशपेठ, कोतवाली , तहसील आणि यशोधरा नगर या भागात संचारबंदी उठवताच बाजापेठा उघडायला सुरवात झाली. छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबच्या कबरीवरुन (Aurangzeb Tomb) झालेल्या वादानंतर 17 मार्च रोजी नागपूरमध्ये दंगल उसळली होती.
संचारबंदी उठल्यानंतर नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी हिंसाचाराचे केंद्र राहिलेल्या भालदारपुरा या भागाची पाहणी केली. यावेळी एबीपी माझाशी बोलताना त्यांनी नागपूरची स्थिती नियंत्रणात असून परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर संचार बंदी उठवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. पुढील काळात सोशल मीडियाच्या वापरावर पोलिसांची कडक नजर राहणार असल्याचे देखील पोलिस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी सांगितलं.
नागपूरमधील अग्रेसन चौक, चिटणवीस पार्क , शिवाजी चौक ,गांधीगेट , महाल मार्केट हंसापुरी , मोमीनपुरा भागातून रुट मार्च काढण्यात आला. संचारबंदी हटवल्यानंतर या परिसरातील दुकानं उघडायलाही सुरुवात झाली आहे. हिंसाचारामुळे नागपुरात निर्माण झालेला तणाव आता निवळला असून जनजीवन पूर्ववत होवू लागल्याने नागपूरकरांकडूनही समाधान व्यक्त केलं जातंय.
गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबच्या कबरीवरून राज्यात वाद सुरू आहे. राज्यभरात हिंदुत्ववादी संघटनांकडून खुलताबादेतील (Khultabad) कबर हटवण्यासाठी आंदोलने सुरू आहेत. नागपुरात औरंगजेब कबरीवरून सुरू असलेल्या वादामुळे दंगल झाली.
104 दंगलखोरांची ओळख पटली
नागपूर दंगल प्रकरणात पोलिसांनी चार-पाच तासांत दंगल नियंत्रणात आणली. त्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करण्यात आला. या सगळ्यात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले. यानंतर पोलिसांनी दंगलीचे सीसीटीव्ही फुटेज, लोकांना मोबाईलवर केलेले चित्रीकरण याआधारे दंगेखोरांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई केली आहे. आतापर्यंत 104 दंगलखोरांची ओळख पटली आहे. त्यापैकी 92 जणांना अटक केली आहे. तर 12 जण अल्पवयीन असल्याने त्यांच्यावरही विधिसंघर्षित कायद्यानुसार कारवाई सुरु आहे.
हिंसाचार करणाऱ्या कुणालाही या प्रकरणातून सोडले जाणार नाही. पोलिसांवर हल्ला करणे हे अतिशय गंभीर बाब असून अशा हल्लेखोरांना जर सोडलं तर हे कायदा आणि सुव्यवस्था या दृष्टीने योग्य नाही. परिणामी त्यांना अद्दल घडवल्याशिवाय सोडणार नाही असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

