एक्स्प्लोर
पोलीस मारहाणप्रकरणी मंत्री यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा! कारचालकासह दोन कार्यकर्तेही दोषी
पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी महिला-बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा ठोठवण्यात आली आहे. याप्रकरणी मंत्री ठाकूर यांच्या कारचालकासह दोन कार्यकर्तेही दोषी आहेत.

अमरावती : महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी अंबादेवी मंदिराजवळ उल्हास रौराळे या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. यामध्ये त्यांचा वाहनचालक आणि सोबतच्या दोन कार्यकर्त्यांचाही समावेश होता. याप्रकरणी अमरावती न्यायालयाने ठाकूर यांना तीन महिने शिक्षा आणि 15 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दरम्यान, या प्रकरणी आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची प्रतिक्रिया ठाकूर यांनी दिली आहे. खासदार नवनीत राणा म्हणजे 'जिधर बम, उधर हम' : मंत्री यशोमती ठाकूर काय आहे प्रकरण? वाहनाने एकेरी मार्गावरून जाण्यास मनाई करणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांच्यासह चालक आणि दोन कार्यकर्त्यांना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी (फलके) यांच्या न्यायालयाने आज गुरुवारी 3 महिने सश्रम कारावास, प्रत्येकी 15 हजार 500 रुपये दंड व दंड न भरल्यास 1 महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली. ही घटना 24 मार्च 2012 रोजी दुपारी 4.15 वाजता राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चुनाभट्टी परिसरात घडली होती. यशोमती ठाकूर, सागर सुरेश खांडेकर, शरद काशीराव जवंजाळ आणि राजू किसन इंगळे अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी शहर वाहतूक शाखेत कार्यरत कर्मचारी उल्हास रौराळे यांनी तक्रार दिली होती. न्यायालयात दाखल दोषारोपपत्रानुसार, घटनेच्या दिवशी 24 मार्च 2012 रोजी दुपारी काँग्रेसच्या तत्कालीन आमदार व विद्यमान मंत्री ॲड.यशोमती ठाकूर ह्या आपल्या वाहनाने काही कार्यकर्त्यांसह चुना भट्टी ते गांधी चौक या एकेरी मार्गाने जात होत्या. हा प्रकार निदर्शनास आल्यावर कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलीस उल्हास रौराळे यांनी त्यांचे वाहन अडविले. हा एकेरी मार्ग असल्याचे सांगून त्यांनी वाहन घेऊन जाण्यास चालकास मनाई केली. त्यावर यशोमती ठाकूर यांच्यासह चालक सागर, कार्यकर्ते शरद आणि राजू यांनी वाहनाखाली उतरून उल्हास रौराळे यांच्यासोबत वाद घातला. कॉलर पकडून त्यांना मारहाण केली. या प्रकरणी वाहतूक पोलीस उल्हास रौराळे यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीवरुन पोलिसांनी भादंविच्या कलम 353, 332, 186, 34 अन्वये गुन्हा दाखल केला. चौकशीअंती आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी (फलके) यांच्या न्यायालयाने 5 साक्षीदारांची साक्ष नोंदविली. त्यातील 1 साक्षीदार फितूर निघाला. साक्षीदारांची साक्ष आणि सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्या. उर्मिला जोशी (फलके) यांच्या न्यायालयाने यशोमती ठाकूर, सागर खांडेकर, शरद जवंजाळ आणि राजू इंगळे यांना 3 महिने सश्रम कारावास, प्रत्येकी 15 हजार 500 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 1 महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली. त्याचवेळी फितूर झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेशही न्यायालयाने पोलीस आयुक्तांना दिले. यावेळी जिल्हा सत्र न्यायालयाने मंत्री यशोमती ठाकूर यांची जामिनावर सुटका केली. उच्च न्यायालयात दाद मागणार : ठाकूर न्यायालयीन प्रक्रीयेचा मी सदैव आदर केला आहे. मी स्वत: वकील आहे. त्यामुळे या प्रकरणावर मी फार भाष्य करणं योग्य नाही. आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. या क्षणी मी इतकंच सांगू शकते की शेवटी विजय सत्याचा होईल. बाकी राजीनामा देण्याच्या मागणी बाबत, तर एका महिलेच्या मागे आता अख्खा भाजप लागेल. त्यांना इतकंच काम आहे. भाजप सोबत माझी वैचारिक लढाई आहे आणि मला राजकीय आयुष्यातून संपवण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत, पण मी माघार घेणार नाही. भाजपशी माझी लढाई सुरूच राहील, अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली. वाहनांसाठी रस्ता बंद आहे, असे समजावून सांगणाऱ्या आणि आपले कर्तव्य निभावणाऱ्या खाकी वर्दीतील पोलिसाला सत्तेच्या मस्तीत मारहाण करणाऱ्या काँग्रेसच्या तत्कालीन आमदार व राज्याच्या विद्यमान महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवल्याने त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या मंत्रीपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे, अशी प्रतिक्रिया भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी दिली आहे. Yashomati Thakur | 'कामं होतं नसतील तर दंगा करा' यशोमती ठाकूर यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
Before You Go
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा























