एक्स्प्लोर
कल्याणचा पत्री पूल धोकादायक, लवकरच पूर्णपणे बंद होणार
रेल्वेकडून आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर पत्री पुलाच्या पाडकामाला सुरुवात होणार

कल्याण : कल्याणचा ब्रिटिशकालीन पत्री पूल धोकादायक झाल्याने त्यावरुन होणारी सगळ्या प्रकारची वाहतूक बंद करावी, अशी अधिसूचना वाहतूक पोलिसांनी काढली आहे. त्यामुळे हा पूल लवकरच बंद होणार आहे. कल्याण आणि डोंबिवली, तसंच शिळफाटा-भिवंडी या शहरांना जोडण्यासाठी पत्री पूल हा एकमेव मार्ग सध्या अस्तित्वात आहे. मात्र अंधेरी पूल दुर्घटनेनंतर या पुलाच्या जीर्णावस्थेकडे यंत्रणेचं लक्ष गेलं आणि पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं. यात हा पूल धोकादायक असल्याचं समोर आल्यानं तातडीनं पुलावरुन होणारी अवजड वाहनांची वाहतूक बाजूच्या नवीन पुलावरुन वळवण्यात आली होती. आता मात्र हलकी वाहनंच नव्हे, तर पादचाऱ्यांनाही या पुलावरुन जाऊ देऊ नये, अशा प्रकारची स्पष्ट अधिसूचना वाहतूक पोलिसांनी जारी केली आहे. हा पूल पाडून त्या जागी नवीन पूल उभारण्यात येणार असून त्याची निविदा प्रक्रियाही पूर्ण झालेली आहे. रेल्वेकडून आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर आता या पुलाच्या पाडकामाला सुरुवात होणार आहे. मात्र या कामामुळे कल्याण आणि डोंबिवलीत वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. या पुलाला अनेक वर्षात पर्यायी मार्गच उभारण्यात आलेला नसून भिवंडी-माणकोली पुलाच्या कामालाही अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळं पत्री पुलाचं काम सुरू झाल्यावर कल्याण आणि डोंबिवलीकरांचा मनस्ताप वाढणार आहे.
Before You Go
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा






















