Pakistan Afghanistan War: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या रक्तरंजित संघर्षात 300 जणांचा जीव गेला, 500 जखमी; युद्धजन्य परिस्थिती का निर्माण झाली??
Pakistan Afghanistan War: पाकिस्तान लष्कराचे प्रवक्ते अहमद शरीफ चौधरी यांच्या मते, आतापर्यंत 274 तालिबानी सैनिक मारले गेले आहेत आणि 400 हून अधिक जखमी झाले आहेत.

Pakistan Afghanistan War: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील लष्करी संघर्षात (Conflict Between Pakistan and Afghanistan) 300 हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत आणि दोन्ही बाजूंनी 500 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. दोन्ही देश एकमेकांना पुढील लष्करी कारवाईची धमकी देत आहेत. जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना विचारणा केली असता त्यांनी पाकिस्तान चांगला मित्र असल्याची प्रतिक्रिया दिली. अमेरिका पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये हस्तक्षेप करेल का? अशी विचारणा केली असता त्यांनी उत्तर दिले की, मी हस्तक्षेप करू शकतो, परंतु माझे पाकिस्तानशी खूप चांगले संबंध आहेत. पाकिस्तान सध्या खूप चांगले काम करत आहे.
कारवायांसाठी तालिबानचा प्रदेश वापरला जातो
दरम्यान, पाकिस्तानी लष्करी प्रवक्त्याने आरोप केला की देशात दहशतवादी हल्ल्यांमागे भारत आहे. त्यांनी सांगितले की या कारवायांसाठी अफगाण तालिबानचा प्रदेश वापरला जातो. 22 फेब्रुवारी रोजी अफगाणिस्तानने पाकिस्तानी हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर दिल्यावर गुरुवारी रात्री उशिरा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संघर्ष सुरू झाला. त्यानंतर पाकिस्तानने ऑपरेशन गझ्ब-उल-हक सुरू केले. पाकिस्तानी हवाई दलाने काबूल, कंधार, पक्तिया, नांगरहार आणि इतर प्रांतांमध्ये हवाई हल्ले केले.
274 तालिबानी सैनिक मारले गेले
पाकिस्तान लष्कराचे प्रवक्ते अहमद शरीफ चौधरी यांच्या मते, आतापर्यंत 274 तालिबानी सैनिक मारले गेले आहेत आणि 400 हून अधिक जखमी झाले आहेत. 115 टँक आणि चिलखती वाहने नष्ट करण्यात आली, 74 चौक्या उद्ध्वस्त करण्यात आल्या आणि 18 चौक्या पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतल्या. पाकिस्तानचे 12 सैनिक मारले गेले असून 27 जखमी झाल्याचे मान्य केलं आहे.
दरम्यान, तालिबानचा दावा आहे की त्यांचे फक्त 8 ते 13 सैनिक मारले गेले आणि काही जखमी झाले. त्यांनी दावा केला की 55 पाकिस्तानी सैनिक मारले गेले आणि दोन लष्करी मुख्यालयांसह अनेक चौक्या ताब्यात घेण्यात आल्या. पाकिस्तानने आणखी हल्ले केल्यास अधिक तीव्र प्रत्युत्तर देण्याचा इशारा तालिबानने दिला आहे.
टीटीपी आणि आयसिसच्या ठिकाणांवर हवाई हल्ले
22 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या सीमावर्ती भागात हवाई हल्ले केले. पाकिस्तानचे उपगृहमंत्री तलाल चौधरी यांनी दावा केला की सीमावर्ती भागात टीटीपीच्या लपण्याच्या ठिकाणांविरुद्धच्या कारवाईत 70 दहशतवादी मारले गेले. नंतर, पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने ही संख्या 80 वर पोहोचल्याचे वृत्त दिले. अफगाणिस्तानने या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला. तालिबानने म्हटले की हल्ल्यांमध्ये नागरिकांना लक्ष्य करण्यात आले. टोलो न्यूजच्या वृत्तानुसार, नांगरहारमधील एका घरावर झालेल्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील 23 जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले.
पाकिस्तानला योग्य वेळी कडक प्रत्युत्तर मिळेल
अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की पाकिस्तानला "योग्य वेळी कडक प्रत्युत्तर" मिळेल. मंत्रालयाने या हल्ल्यांना देशाच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन म्हणून वर्णन केले आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानातील तालिबान सरकारवर कोणत्याही दहशतवादी संघटनेला त्यांच्या भूमीचा वापर करण्यापासून रोखण्यासाठी बराच काळ दबाव आणला आहे. इस्लामाबादचा आरोप आहे की टीटीपी अफगाणिस्तानातून चालते, हा आरोप तालिबान सरकारने सातत्याने नाकारला आहे.
दोन्ही देशांमधील तणाव पूर्वीपासून
अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये डुरंड रेषेवरून बराच काळ वाद सुरू आहे. दोन्ही देश एकमेकांवर हल्ले आणि दहशतवाद्यांना आश्रय देण्याचा आरोप करतात. 2021 मध्ये तालिबानने अफगाण सरकारचा ताबा घेतल्यापासून तणाव वाढला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























