एक्स्प्लोर
“...अन्यथा एक डिसेंबरपासून पुन्हा मराठ्यांचे वादळ”
"मराठा आंदोलनामध्ये जे सहभागी झाले होते, त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावेत. ज्यांना पुरावे आहेत म्हणून अटक केली आहे, त्यांना सोडवण्याचा पूर्णपणे कायदेशीर प्रयत्न करु"

प्रातिनिधिक फोटो
मुंबई : यंदा नोव्हेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण जाहीर झाले नाही, तर एक डिसेंबरपासून पुन्हा मराठ्यांचे भगवे वादळ महाराष्ट्रभर पोहोचेल, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाने दिला आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाची आढावा बैठक आज मुंबईत पार पडली. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या या आढावा बैठकीला आबासाहेब पाटील, रमेश केरे पाटील, संतोष सूर्यराव, महेश राणे इत्यादी समन्वयक उपस्थित होते. मराठा आंदोलनामध्ये जे सहभागी झाले होते, त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावेत. ज्यांना पुरावे आहेत म्हणून अटक केली आहे, त्यांना सोडवण्याचा पूर्णपणे कायदेशीर प्रयत्न करु, अशी माहिती यावेळी देण्यात आली. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून येत्या महिन्याभरात प्रत्येक जिल्ह्यांतील 100 मुलींना कर्जास पात्र केले नाही, तर महामंडळाला टाळे ठोकू, असा इशारा यावेळी देण्यात आला. तसेच, मराठ्यांसाठी मराठा आरक्षण, मोर्चे, कर्ज आणि मराठा समाजातील विविध प्रश्नांसाठी मराठा हेल्पलाईनचा टोल फ्री क्रमांक, अॅप सुरु करणार आहोत, अशी माहितीही मराठा क्रांती ठोक मोर्चाने दिली. दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात ज्या पत्रकारांना धक्काबुक्की झाली, त्रास झाला, त्यांची सकल मराठा समाजाकडून माफी मागतो, असे समन्वयकांकडून नमूद करण्यात आले.
Before You Go
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















