देवाभाऊंनी दिलेला शब्द पाळला! शेतकऱ्यांना सावरण्यासाठी कर्जमाफी अतिशय महत्त्वपूर्ण, अनिल बोडेंनी केलं स्वागत
देवाभाऊंनी बळीराजाला दिलेला तो शब्द पाळला आहे. शेतकऱ्यांना सावरण्यासाठी दिलासा देण्यासाठी ही कर्जमाफी अतिशय महत्त्वपूर्ण असल्याचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी सांगितले.
Anil Bonde : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ अंतर्गत ही कर्जमाफी लागू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या योजनेनुसार 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. यावर भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवाभाऊंनी बळीराजाला दिलेला तो शब्द पाळला आहे. शेतकऱ्यांना सावरण्यासाठी दिलासा देण्यासाठी ही कर्जमाफी अतिशय महत्त्वपूर्ण असल्याचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी सांगितले.
पुन्हा शेतकरी कर्जाच्या विळख्यात सापडू नये यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत
संकटात सापडलेल्या बळीराजाला सांत्वना देताना देवा भाऊंनी सांगितलं होतं, संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल. शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचं विज बिल माफ करण्यात आलं आहे. ग्रामीण भागातील घरकुल, लाडक्या बहिणींचे पैसे, जलयुक्त शिवाराची कामे अशा बाबींना अर्थसंकल्पाच्या माध्यमातून दिलासा देण्यात आला. पाणी मिळेल, वीज मिळेल, कर्ज सुद्धा माफ होईल, पुन्हा शेतकरी कर्जाच्या विळख्यात सापडू नये यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत असे बोंडे म्हणाले. त्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बोंडे यांनी आभार मानले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सरकारवर टीका
कर्जमाफी योजना फसवी आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाहीच.अटी शर्ती घालून दिलेली कर्जमाफी शेतकरी हिताची नाही असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी कर्जमाफी योजनेवर टीका केली. राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याची घोषणा केली आहे. मात्र, ही घोषणा फसवी असल्याचे संदीप जगताप म्हणाले. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करु, अशा घोषणा सरकारने केल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात अटी शर्ती घालून केवळ 2 लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली. ती ही 30 सप्टेंबर 2025 पर्यंतची. यामुळं शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला असून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच नाही असेही जगताप म्हणाले.
शेतकऱ्यांनी जनावरे विकून कर्ज फेडले, सरसकट कर्जमाफी करणे गरजेचं, शेतकरी कामगार पक्षाची मागणी
राज्य सरकारनं केलेली कर्जमाफी दुर्दैवी असल्याचे शेतकरी कामगार पक्षाने म्हंटलं आहे. शेतकऱ्यांनी जनावरे विकून कर्ज फेडलेले आहे, म्हणून सरसकट कर्जमाफी अपेक्षित होती. शेतकऱ्यांच्या आत्महत्यामुळं महाराष्ट्राचा मसनवाटा झाला असताना शेतकरी अशा घोषणा करुन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणार असतील तर हे निंदनीय आहे. या कर्जमाफी विरोधात आम्ही शेतकऱ्यांसोबत आंदोलन उभं करणार आहोत. सरकारला द्यायचे असेल तर सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या






















