शाळांना लवकर सुट्टी जाहीर करा, राज ठाकरेंची सरकारला विनंती, मनसैनिकांनाही प्राणी-पक्ष्यांची काळजी घेण्याचं आवाहन
उन्हाचा (Maharashtra Heat) हा तडाखा इतका जबरदस्त आहे की, नागरिकांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावं लागत आहेत. शाळांना लवकर सुट्टी जाहीर करा, अशी विनंती राज ठाकरेंनी सरकारला केली आहे.
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात कमालीची वाढ (Heat Wave) होताना दिसून येत आहे. जागतिक वातावरणातल्या हवामान बदलामुळं यंदाचा उन्हाळा दरवर्षीपेक्षा वेगळा असल्याचं जाणवत आहे. त्यामुळं मुंबई आणि आसपासच्या महानगरांमधल्या नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. उन्हाचा (Maharashtra Heat) हा तडाखा इतका जबरदस्त आहे की, नागरिकांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावं लागत आहेत. या पार्श्वभूमी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मनसैनिकांनाही प्राणी-पक्ष्यांची काळजी घेण्याचं आवाहन केले आहे. तसेच शाळांना लवकर सुट्टी जाहीर करा, अशी विनंती देखील सरकारला केली आहे.
राज ठाकरे म्हणाले, गेले काही दिवस मुंबई, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, कोकण ह्या भागात दिवसाचं सरासरी तापमान हे जवळपास 40 अंशांपर्यंत गेलं आहे. अर्थात उर्वरित महाराष्ट्रात पण काही वेगळी स्थिती नाहीये. उष्णतेची लाट आली आहे असं जाहीर झालं आहे.
मुळात अशी लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने आधीच का नोंदवली नाही?, हा मुद्दा आहे. असो. अशा परिस्थितीत लहान मुलांच्या शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरु व्हायला अजून काही काळ असल्यामुळे त्यांना शाळेत जावं लागत आहे. ह्याबाबतीत, जरी आचारसंहिता असली, तरी सरकारने शाळांना आत्ताच उन्हाळी सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश देण्याची तजवीज करायला हवी.
सस्नेह जय महाराष्ट्र,
— Raj Thackeray (@RajThackeray) April 16, 2024
गेले काही दिवस मुंबई, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, कोकण ह्या भागात दिवसाचं सरासरी तापमान हे जवळपास ४० अंशांपर्यंत गेलं आहे. अर्थात उर्वरित महाराष्ट्रात पण काही वेगळी स्थिती नाहीये. उष्णतेची लाट आली आहे असं जाहीर झालं आहे.
मुळात अशी लाट येण्याची शक्यता…
राज ठाकरे यांचं श्वानप्रेम सर्वांनांच माहित आहे. अनेकदा त्यांचं हे श्वानांवरील प्रेम पाहायलाही मिळालं आहे. राज ठाकरेंना प्राण्यांची काळजी करताना दिसत आहे. आता देखील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर पक्ष्यांची, प्राण्यांची काळजी घेण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. राज ठाकरे म्हणाले, माझी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना पण विनंती आहे की, तुम्ही पण उष्णतेच्या लाटेत स्वतःची काळजी घ्या. तसंच ह्या भीषण उन्हाळ्यात सगळ्यात जास्त हाल होतात प्राण्यांचे आणि पक्षांचे (राजकीय नव्हेत ) आणि निराधार आणि बेघर लोकांचे. त्यांना प्यायला स्वच्छ पाणी मिळेल ह्याची तजवीज करा. आणि प्राणी आणि पक्षी तर बिचारे पाणी मागू शकत नाहीत, त्यामुळे, त्यांना सहज पाणी मिळेल आणि सहज पिता येईल अशा पद्धतीने गॅल्लरीत, गच्चीत पाणी ठेवा.