Dhananjay Munde : राज ठाकरे म्हणजे भाजपचे अर्धवटराव, धनंजय मुंडेंचा जोरदार निशाणा
अर्धवटराव आधी भाजपविरोधात खुप बोलायचे, सीडी लावायचे. एकदा ईडी घुसली आणि अर्धवटराव गप्प बसले, असे म्हणत मंत्री धनंजय मुंडे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

Dhananjay Munde : पूर्वी रामदास पाध्याय यांचा बोलक्या बाहुल्यांचा खेळ प्रसिद्ध होता. आता भाजपच्या बोलक्या बाहुल्याचा खेळ सुरु आहे. अर्धवटरावांचा खेळ सुरु आहे. अर्धवटराव आधी भाजपविरोधात खुप बोलायचे, सीडी लावायचे. एकदा ईडी घुसली आणि अर्धवटराव गप्प बसले, असे म्हणत मंत्री धनंजय मुंडे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. भाजपच्या इतक्या सीडी लावल्या की त्यांच्यामागे ईडी लागली असेही धनंजय मुंडे म्हणाले.
राज ठाकरे हे भाजपचे भोंगे म्हणून काम करत असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. सांगलीच्या इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी परीसंवाद यात्रेच्या जाहीर सभेत मुंडे बोलत होते. यावेळी त्यांनी राज ठाकरेंवर चांगलाच निशाणा लगावला. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी पक्षाचा एक दिवस मुख्यमंत्री होणार असा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीचे 100 च्या वर आमदार येतील, फक्त जयंत पाटील साहेब आपल्या टप्यात निवडणूक घ्यावी असेही मुंडे यावेळी म्हणाले.
धनंजय मुंडेंच्या टिकेला मनसेकडून प्रत्युत्तर
दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या टिकेला महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 'अहो धनंजय मुंडेराव, तुम्ही ज्यांची 'अर्धवटराव' म्हणून खिल्ली उडवताय, ते राजसाहेब तुमच्यासारख्या 'तात्या विंचू'चा ओम फट स्वाहा करणार आहेत. राजसाहेबांनी दे दणादण करायला आत्ता कुठे सुरुवात केली आहे, लवकरच तुमचा थरथराट होणार. Get Well Soon धनंजय मुंडे असे ट्वीट करत अमेय खोपकर यांनी निशाणा साधला.
अहो धनंजय मुंडेराव, तुम्ही ज्यांची ‘अर्धवटराव’ म्हणून खिल्ली उडवताय, ते राजसाहेब तुमच्यासारख्या ‘तात्या विंचू’चा ओम फट स्वाहा करणार आहेत.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) April 20, 2022
राजसाहेबांनी दे दणादण करायला आत्ता कुठे सुरुवात केली आहे, लवकरच तुमचा थरथराट होणार.
Get Well Soon धनंजय मुंडे
यावेळी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखीलभाजप आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. राज ठाकरे माझी टिंगल आणि माझी मस्करी करतात. पण असे होत नसते बापाला बाप भेटतोच असे आव्हाड म्हणाले. आज गॅस आणि पेट्रोलचे भाव काय आहेत. आयुष्यात देशाने इतकी महागाई पाहिले नाही असेही आव्हाड म्हणाले. सध्या देशात तेलाचे राजकारण सुरु आहे. पेट्रोल 200 रुपयांवर जाणार आहे. लक्ष्यात ठेवा. या देशाचे विचार संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे. अनेकांच्या हत्या झाल्या. सगळे बदलले आहे. इतके द्वेषाचे राजकारण देशामध्ये कधी झाले नाही. सत्तेसाठी माणुसकी नावाचा शब्दच राहिला नाही अशी खंतही आव्हाड यांनी बोलून दाखवली.























