Manoj Jarange Patil : ओला दुष्काळ जाहीर करा, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातील चौथा हिस्सा घ्या, फडणवीस, शिंदे, ठाकरे, राणे, पवारांसह राजकीय नेत्यांची संपत्ती घ्या; जरांगे पाटलांच्या 8 मागण्या
Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नारायण गडावरील दसरा मेळाव्यातून फडणवीस सरकारकडे 8 मोठ्या मागण्या केल्या आहेत.

Manoj Jarange Patil : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अतिवृष्टीने (Maharashtra Rains) थैमान घातले आहे. विशेषतः मराठवाड्यातील (Marathwada Rains) शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी घेतली जात आहे. तर विरोधकांकडून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी नारायण गडावरील दसरा मेळाव्यातून फडणवीस सरकारकडे 8 मोठ्या मागण्या केल्या आहेत.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मी सरकारला जाहीरपणाने सांगत आहे की, मराठवाड्यात आणि मराठवाड्या लगतच्या जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा, त्याशिवाय माघार नाही. हे काम दिवाळीच्या आत करायचे आहे. सरकारने दिवाळीच्या आत ओला दुष्काळ जाहीर करायचा आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 70 हजार रुपयांचे मदत द्यायची. पाण्याने पिकं जळाले आहेत. 70 हजार रुपये हेक्टरी कॅश सरकारने द्यावी. आता शेतकऱ्यांची खरी फाईट सुरू झाली आहे.
शंभर टक्के भरपाई द्यावी (Manoj Jarange Patil Demand)
ज्यांचे शेत वाहून गेले नाही, त्यांना सरसकट 70 हजार रुपये हेक्टरी मदत करा. ज्यांच्या नदीच्या शेजारचे वावर वाहून गेलेत, पीक वाहून गेले त्यांना एक लाख तीस हजार रुपये भरपाई म्हणून द्यावी. ज्यांचे जनावरं वाहून गेले, कांदा वाहून गेला, सोयाबीन वाहून गेले, धान्य वाहून गेले त्या लोकांचे शेतकरी सांगेल तसा पंचनामा करून शंभर टक्के भरपाई द्यावी, अशा मोठ्या मागण्या त्यांनी यावेळी केल्या.
सरकारला एक महिन्याचा अल्टीमेटम (Manoj Jarange Patil Demand)
मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, शेतकऱ्याचे ऊसाचे पंधरा रुपये कापायचे ठरवले आहे. अजिबात एक रुपया सुद्धा कापायचा नाही. याला पर्याय म्हणून ज्या सरकारी कर्मचाऱ्याला दहा हजार रुपये पगार आहे. त्याचे अडीच हजार रुपये कापा. ज्याला वीस हजार रुपये पगार आहे त्याचे पाच हजार रुपये कापा. ज्याला एक लाख पगार आहे त्याचे 25 हजार रुपये कापा. ज्याला दोन लाख रुपये पगार आहे त्याचे 50 हजार रुपये कापा. चार-पाच लाख अधिकाऱ्यांचे पैसे कापले तर जवळपास हजार कोटी रुपये जमा होतील. फडणवीस, शिंदे, ठाकरे, राणे, पवारांसह राजकीय नेत्यांची संपत्ती घ्या. शेतीला हमीभाव द्या, पिक विमाला बसवलेले ट्रिगर काढा. संपूर्ण विमा द्या. सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला सरकारी नोकरी द्या. सरकारने मदत दिली नाही तर आंदोलन करणार, सरकारला एक महिन्याची मुदत देत आहोत, असा इशारा देखील त्यांनी दिला.
मनोज जरांगेंच्या आठ मागण्या (Manoj Jarange Patil Demand)
1. दिवाळीच्या आत मराठवाड्यात आणि लगतच्या जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा.
2 70 हजार रुपये शेतकऱ्यांना हेक्टरी भरपाई द्या.
3 नदीच्या शेजारचे वावर वाहून गेले. पिक वाहून गेले, त्यांना 1 लाख ३० हजार रुपये भरपाई द्या.
4 शेतकऱ्याच्या उसातून 15 रुपये कापायचे ठरवले आहेत, त्यातला एक रुपयाही कापायचा नाही.
5 शेतीला नोकरीचा दर्जा द्या.
6 पीक विम्याला तीन ट्रिगर बसवले ते उठवा. पीक विमा सरसकट सर्व शेतकऱ्यांना द्या. सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी.
7 सरकारी कर्मचाऱ्यांचा चौथा हिस्सा घ्या, फडणवीस, शिंदे, ठाकरे, राणे, पवारांसह राजकीय नेत्यांची संपत्ती घ्या.
8. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला सरकारी नोकरी द्या.
आणखी वाचा
























