![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी हॉटेल्स, उपाहारगृहांनीही सहकार्य करावं; मुख्यमंत्री आग्रही
राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या सातत्यानं वाढत आहे. परिणामी अनेक जिल्ह्यांमध्ये याच पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचे निर्बंधही लागू करण्यात आले आहेत.
![कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी हॉटेल्स, उपाहारगृहांनीही सहकार्य करावं; मुख्यमंत्री आग्रही CM uddhav thackeray urges Hotels and restaurants should cooperate to prevent the growing infection of covid 19 कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी हॉटेल्स, उपाहारगृहांनीही सहकार्य करावं; मुख्यमंत्री आग्रही](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/03/13/d2af4b26a2f622aaf95964ee7d1b5841_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या सातत्यानं वाढत आहे. परिणामी अनेक जिल्ह्यांमध्ये याच पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचे निर्बंधही लागू करण्यात आले आहेत. परिस्थिती अशीच कायम राहिली तर, राज्यातही काही अंशी सार्वत्रिक लॉकडाऊन नाकारता येत नाही. याच धर्तीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा एक आवाहन केलं आहे.
कोविडचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी हॉटेल्स, उपाहारगृहे यांनी सहकार्य करावे. लॉकडाऊन करून सगळं बंद करणं आम्हालाही नको आहे. पण, मास्क न घालणे, सुरक्षित अंतर न ठेवणे अशा नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असून आम्हाला कडक निर्बंध लावण्यास भाग पडू नका असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. शनिवारी त्यांनी हॉटेल्स, उपाहारगृहे, मॉल्स संघटनांच्या प्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन आवाहन केले.
स्वयंशिस्त महत्वाची
पुढच्या काळात देखील आपल्याला कोविडबरोबरच जगायचे असून जीवनपद्धती त्याला अनुरूप करावी लागेल. बंदी आणि स्वयंशिस्त यात फरक असून सर्वांनी याचे भान ठेवावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मागील आठवड्यात केंद्रीय पथक मुंबईत आले असता एका हॉटेलमध्ये त्यांना कोणत्याही कर्मचाऱ्यांनी मास्क न घातलेला व सुरक्षित अंतर न पाळता गर्दी झाल्याचा अनुभव त्यांनी आपणास सांगितला होता. हॉटेल्स आणि उपाहारगृहे हे भेटीगाठी व जेवण-नाश्त्याचे प्रमुख ठिकाण असून सुरुवातीच्या काळात नियमांचे पालन होताना दिसत होते. हॉटेल्समध्ये समोरासमोर न बसवता सुरक्षित अंतर ठेऊन बसविणे, वेटर्सआणि इतर कर्मचारी यांनी मास्क घालणे, जंतुनाशक फवारणी असे होत होते. पण राज्यभरात आता काही हॉटेल्स , मॉल्स, उपाहारगृहांत नियमांची पायमल्ली होऊन वातावरण सैल झाल्यासारखे प्रशासनाला दिसत आहे. अजूनही परिस्थिती आपल्या हातात आहे, आपण स्वत:हून आमच्या एसओपीचे पालन नीट व काटेकोरपणे झालेच पाहिजे हे पहा. सर्व जन नियम धुडकावत आहेत असे नाही, पण काही नियम न पाळणाऱ्यांमुळे धोका वाढतोय असेही ते म्हणाले. लॉकडाऊन लावून सगळे बंद करणे आम्हाला सुद्धा आवडत नाही. आपण हे अर्थचक्र सुरु केले आहे, सर्वांनी सहकार्य केले तर संसर्ग रोखता येईल त्यामुळे लॉकडाऊनसारखे कडक निर्बंध लावण्यास भाग पडू नका असेही मुख्यमंत्री म्हणाले.
नियम मोडले तर कारवाई
पालिका आणि पोलीस प्रशासनाने देखील यासंदर्भात राज्यातील सर्व हॉटेल्स व उपाहारगृहे काटेकोर पालन करतात किंवा नाही तसेच नियम तोडत असतील तर कारवाई करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी देखील सांगितले की, एकीकडे आम्हाला कोरोनाला पूर्णपणे रोखायचे आहे पण असे करतांना अर्थचक्रही सुरूच ठेवायचे आहे. हे संतुलन राखण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची खूप गरज आहे. १ फेब्रुवारी पासून कोरोना वाढतोय . आज सुमारे १५००० रुग्ण दिवसाला सापडले आहेत तर १ लाख १० हजार सक्रीय रुग्ण राज्यात झाले आहेत. या वेगाने १५ एप्रिलपर्यंत २५ हजार रुग्ण दिवसाला आढळतील, त्यामुळे गर्दीचे नियंत्रण ठेवणे व सुरक्षित अंतर राखणे गरजेचे आहे हे सांगताना त्यांनी सिद्धीविनायक मंदिरात तंत्रज्ञांच्या उपयोगाने गर्दीचे कसे व्यवस्थापन केले आहे त्याचे उदाहरण दिले.
पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी यावेळी सुचना केली, की हॉटेल्स संघटनांनी प्रत्येक प्रभागात त्यांची फिरती पथके तयार करून नियमांचे पालन होते आहे किंवा नाही ते तपासावे. सर्व पदाधिकाऱ्यांची तत्काळ बैठक घेऊन त्यांना जाणीव करून द्यावी. एक स्टार किंवा दोन स्टार तसेच लहान उपाहारगृहांत नियम पाळत नसल्याचे दिसून येते असेही ते म्हणाले.
याप्रसंगी हॉटेल्स आणि उपाहारगृहे यांच्या संघटनांच्या वतीने गुरुबक्षसिंग कोहली ,सुभाष रुणवाल, शिवानंद शेट्टी, श्री रहेजा आदींनी शासनाला संपूर्ण सहकार्य करण्याचे तसेच प्रसंगी एसओपी न पाळणाऱ्या उपाहारगृहांना संघटनेतून काढून टाकण्याची कार्यवाही केली जाईल असे आश्वस्त केले. मॉल्समध्ये ४० ते ५० हजार लोक दररोज येतात, तेथे देखील कोविड मार्शल्स मास्क न घालणाऱ्याना दंड करतील व फूड कोर्टमध्ये देखील संख्या मर्यादित ठेवूत, थर्मल इमेजिग, संपर्काशिवाय पार्किंग याचे देखील पालन केले जाईल असे संघटनांनी सांगितले.
Coronavirus | ...तर विमानातून होणार तुमची हकालपट्टी
गर्दीला सुमार नाही
कोरोनाची रुग्णसंख्या काहीशी नियंत्रणात येत असल्याचं चित्र दिसू लागल्यानंतर लगेचच राज्य शासनानं अनेक निर्बंधांमध्ये शिथिलता आणली. ज्याअंतर्गत मॉल, हॉटेल्स आणि उपहारगृह सुरु करण्याचीही मुभा देण्यात आली. पण, नागरिकांनी मात्र या ठिकाणांवर भेट देतेवेळी कोरोना नियमांची सर्रास पायमल्ली केल्याचं पाहायला मिळालं. याच हलगर्जीपणाच्या निकालस्वरुपी कोरोनाचं सावट आणखी बळावलं.
राज्यातील अनेक भागांमध्ये वीकेंड लॉकडाऊन
शुक्रवारी राज्यात 15,817 रुग्णा वाढले आहेत तर 56 जणांचा मृत्यू झाला. तर मुंबईत शुक्रवारी गेल्या 6 महिन्यातील सर्वात मोठी रुग्णवाढ झाली. मुंबईत शहरात 1646 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतील रुग्णांची संख्या ही पंधराशेहून अधिक होती. तर, नागपुरातही रुग्णांची संख्या तब्बल 2000 हजारांच्या पार गेली. पुणे शहर आणि ग्रामीण मिळून 2423 कोरोना रुग्णा वाढले, तर नाशिक जिल्ह्यात आज 1135 नवे रुग्ण तर 8 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे नागपुर, नाशिकसह राज्यातील काही शहरांमध्ये वीकेंड लॉकडाऊन करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)