Rajya Sabha Election : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी घोडेबाजार सुरु करण्याची विरोधकांची ईर्षा : संजय राऊत
Rajya Sabha Election : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन विरोधकांवर घोडेबाजाराचा आरोप केला आहे. त्याचवेळी महाविकास आघाडीच्या विजयाचा विश्वासही व्यक्त केला आहे.
मुंबई : राज्यसभेच्या निवडणुका जूनमध्ये होणार आहेत त्यात महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. सहाव्या जागेसाठी आवश्यक असणारे संख्याबळ राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडे आहे त्यात शिवसेनेने आधीच सहाव्या जागेवर दावा केला आहे. तर महाराष्ट्र विधानसभेतील सध्याच्या आमदारांचे संख्याबळ लक्षात घेता, राज्यसभेसाठी भाजप तिसरी जागा लढण्याची शक्यता असल्याचा माहिती सूत्रांनी दिली आहे. यावरुन आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करुन सहाव्या जागेवरुन विरोधकांवर घोडेबाजाराचा आरोप केला आहे. त्याचवेळी महाविकास आघाडीच्या विजयाचा विश्वासही व्यक्त केला आहे.
संजय राऊत यांनी ट्वीट केलं आहे की, "राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाराष्ट्रात घोडेबाजार सुरु करण्याची विरोधकांची इर्षा दिसू लागलीय.. भ्रष्टाचारातून पैसा .. त्यातून घोडेबाजार! हे दुष्टचक्र कधी थांबेल? सहावी जागा शिवसेना लढेल. कोणी कितीही आकडे मोड करावी.. आकडे आणि मोड दोन्ही महाविकास आघाडीकडे आहे. लढेंगे. जितेंगे.
राज्यसभेच्या ६ व्या जागेसाठी
— Sanjay Raut (@rautsanjay61) May 18, 2022
महाराष्ट्रात घोडेबाजार सुरू करण्याची विरोधकांची इर्षा दिसू लागलीय.. भ्रष्टाचारातून पैसा .. त्यातून घोडेबाजार!हे दुष्ट चक्र कधी थांबेल?
सहावी जागा शिवसेना लढेल.
कोणी कितीही आकडे मोड करावी.. आकडे आणि मोड दोन्ही महविकास आघाडीकडे आहे. लढेंगे . जितेंगे. pic.twitter.com/VOXRKRDzdk
महापालिका निवडणुकीआधी राज्यसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राज्यसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यसभेसाठी महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. यात राज्यातील बदललेल्या राजकीय स्थितीनुसार भाजपचे 2, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसचा प्रत्येकी 1 उमेदवार विजयी होईल. तर, सहाव्या जागेसाठी आवश्यक असणारे संख्याबळ राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडे आहे त्यात शिवसेनेने आधीच सहाव्या जागेवर दावा केला आहे. तर महाराष्ट्र विधानसभेतील सध्याच्या आमदारांचे संख्याबळ लक्षात घेता, राज्यसभेसाठी भाजप तिसरी जागा लढण्याची शक्यता असल्याचा माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपने जर हा उमेदवार रिंगणात उतरवला तर फोडाफोडीचं राजकारण पाहायला मिळू शकतं. त्यामुळे सहाव्या जागेसाठी जोरदार रस्सीखेच आणि राजकारण पाहायला मिळू शकतं
भाजपकडून मोर्चेबांधणी सुरु
राज्यसभेतून भाजपचे पीयूष गोयल, विनय सहस्रबुद्धे आणि विकास महात्मे तर शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल आणि काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम असे महाराष्ट्रातील सहा राज्यसभा सदस्य 4 जुलै रोजी निवृत्त होत आहेत. या रिक्त जागांसाठी ही निवडणूक आहे. या तिसऱ्या राज्यसभेच्या जागेसाठी भाजपकडून पियूष गोयल, विनोद तावडे, हर्षवर्धन पाटील, धनंजय महाडिक यांच्या नावाची चर्चा आहे. राज्यसभेची जागा जिंकण्यासाठी 42 मतांचा कोटा आहे. तिसऱ्या जागेसाठी भाजपला 13 मते कमी पडत आहे. भाजपकडून तिसऱ्या जागेसाठी लागणाऱ्या मतांसाठी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात झाली आहे.
भाजपकडे सध्या 113 आमदारांचं संख्याबळ आहे. भाजपचे 106 आमदार, रासप 1, जनसुराज्य 1 आणि अपक्ष पाच आमदार असे एकूण 113 आमदार भाजपकडे आहेत. राज्यसभेच्या एका जागेसाठी 42 मतांची गरज आहे. भाजपला फक्त 13 मतांची गरज आहे. महाविकास आघाडीकडे 169 आमदार आणि भाजपकडे 113 आमदार आहेत. संख्याबळानुसार भाजप दोन, शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार सहज राज्यसभेवर निवडून जाऊ शकतात.
या सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण
शिवसेना : संजय राऊत
भाजप : पीयूष गोयल, विनय सहस्रबुद्धे, विकास महात्मे
राष्ट्रवादी काँग्रेस : प्रफुल्ल पटेल,
काँग्रेस : पी. चिदंबरम