चंद्रशेखर बावनकुळे यांनी जी तत्परता धनंजय मुंडे यांच्या भेटीसाठी दाखवली ती देशमुख कुटुंबाच्या भेटीसाठी का दाखवली नाही; धनंजय देशमुखांचा सवाल
Dhananjay Deshmukh: चंद्रशेखर बावनकुळे यांनी जी तत्परता धनंजय मुंडे यांना भेटीसाठी दाखवली तीच तत्परता देशमुख कुटुंबाच्या भेटीसाठी का दाखवली नाही असा सवाल धनंजय देशमुखांनी केला आहे.

बीड : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सुरेश धस (Suresh Dhas) आणि धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांची भेट घालून दिली त्यामागे त्यांचा काय हेतू होता हे आम्हाला माहीत नाही. मात्र ही तत्परता बावनकुळे साहेबांनी देशमुख कुटुंबाच्या भेट घेण्यासाठी का दाखवली नाही? असा सवाल सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांचे बंधु धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी उपस्थित केला आहे.
घटना घडल्यानंतर हत्या करणारे सगळे आरोपी हे वाशीमार्गे पळून जातात, पोलीस सांगतात की ते जंगलातून पळून गेले. मात्र मला सांगा की वाशीमध्ये कोणत्या प्रकारचे जंगल आहे? ते तुम्हाला सीसीटीव्हीमध्ये दिसत आहेत. तुम्ही पत्रकार तिथे पोहोचलात मग तिथे पोलीस का पोहोचले नाहीत? असा आमचा सवाल आहे. त्यामुळे आम्ही सुरुवातीपासून म्हणतोय की या प्रकरणांमध्ये पोलिसांनी तपासामध्ये दिरंगाई केली आहे आणि याच्यावर चर्चा करण्यासाठी आज नागरिक आम्ही एकत्र भेटणार आहोत. असेही धनंजय देशमुख म्हणाले.
मात्र बावनकुळे यांनी दुसऱ्याच लोकांच्या भेटीगाठी करून दिल्यात
मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी, आरक्षणासाठी लढाई लढत आहेत. मी माझं दुःख बाजूला सारून जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये उभा राहिलोय. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमच्या पीडित कुटुंबीयांना भेट घेण्यासंदर्भात विचार विनिमय करायला पाहिजे होता. मात्र बावनकुळे यांनी दुसऱ्याच लोकांच्या भेटीगाठी करून देण्याससाठी प्रयत्न केले, याचा मला खेद वाटतो. अजित पवार यांच्या राजीनामा संदर्भात काय म्हणाले आम्हाला माहित नाही, यावर आम्ही काही मत मांडणार नाही. आम्हाला असं वाटतं की ज्यांनी या प्रकरणातील आरोपींना मदत केली त्यांच्यावर कारवाई पाहिजे. असेही धनंजय देशमुख म्हणाले.
परभणी आणि बीड प्रकरणाचे मराठवाडा साहित्य संमेलनात पडसाद
परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी या विद्यार्थ्यांचा झालेला मृत्यू हा पोलीसांच्या बेजबाबदारपणाचा कळस आहे. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचा गुंडांनी भरदिवसा केलेला निर्घृण खून, गाजत असलेला मंत्र्याचा भ्रष्टाचार व मंत्र्याच्या हस्तकांची खंडणीखोरी हे मराठवाड्यातील मराठी समाजाला लागलेले ग्रहण आहे. अशा गुन्ह्यांमुळे मराठवाड्यातील व महाराष्ट्रातील समाजजीवन सध्या कमालीचे अस्थिर, असुरक्षित व भयभीत बनलेले आहेत. दिवसेंदिवस स्त्रिया, मुली, बालिका यांच्यावर लैंगिक अत्याचाराच्या घडणाऱ्या घटना मन विषण्ण करणाऱ्या आहेत. महाराष्ट्रातील बदलापूर, पुणे, बीड, परभणी, मस्साजोग या ठिकाणच्या बाहेर आलेल्या घटना केवळ हिमनगाचे दिसणारे टोक आहे.
महाराष्ट्राबाहेरही देशभर सर्वत्र अनागोंदी माजली असून समाज भयभीत झाला आहे. मणीपूर हे त्याचे धगधगते उदाहरण आहे. ठिकठिकाणची शासनं कायदेशीर व परिणामकारक कृती करण्याऐवजी फक्त बोलघेवडेपणा व पक्षपातीपणा करताना दिसत आहेत. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाच्या चौकशीचे प्रकरण व बीड जिल्ह्यातील खंडणीखोरीचे व भ्रष्टाचाराची मोठमोठी प्रकरणे ही त्याची ढळढळीत उदाहरणे व पुरावे आहेत. हे चित्र बदलण्यासाठी तातडीने परिणामकारक कृतीची, कायद्याच्या कठोर अमंलबजावणीची आणि गुन्हेगारी मोडून काढण्याची नितांत गरज आहे.
याकडे हे साहित्य संमेलन महाराष्ट्र सरकारचे व भारत सरकारचे लक्ष वेधत असून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी व देशाच्या पंतप्रधानांनी केवळ स्वपक्षीय राजकारणाचा विचार न करता राजकीय नेत्यापर्यंत पोहचलेली ही गुंडगिरी व राजकारण्यांचा पक्षपातीपणा संपवण्याची आणि महाराष्ट्रीय व भारतीय समाजाला निर्भयतेने जगण्याची हमी देण्याची मागणी, हे 44 वे मराठवाडा साहित्य संमेलन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्याकडे करीत आहे. अशी मागणी वळूजच्या मराठवाडा साहित्य संमेलनातून करण्यात आले आहे.
हे ही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
