एक्स्प्लोर
ठाकरे - झंजावातामागचा माणूस शोधण्याचा प्रयत्न
1960 ते 1996 अशा कालावधीचं दर्शन हा चित्रपट घडवतो. या काळात बाळासाहेबांची व्यंगचित्रं, त्यातून त्यांनी उभी केलेली शिवसेना, आणीबाणी आणि पर्यायाने मुंबईत वाढणारी शिवसेना अशी वेगवेगळी वळणं घेत हा चित्रपट पुढे जातो. झंजावात होता. आज असंख्य शिवसैनिक बाळासाहेबांना दैवत जरी मानत असले तरी सर्वात आधी ते संवेदनशील माणूस होते, चित्रकार होते.

फार अचंबित करणारी गोष्ट होती ती.
- एक माणूस मुंबईतून महाराष्ट्राच्या जनतेला आदेश देतो. मग तो आदेश महाराष्ट्र बंदचा असो किंवा मोर्चात सहभागी असण्याचा असो. त्या एका आदेशाचं पालन करण्यासाठी राज्यातल्या प्रत्येक घरातला तरुण जोशात रस्त्यावर उतरतो.
- दसऱ्याच्या मुहूर्तावर तो माणूस सभा घेण्याचं जाहीर करतो आणि त्याचं भाषण ऐकण्यासाठी राज्यभरातून येतो आणि एरवी आभाळाएवढं वाटणारं शिवाजी पार्कचं मैदान कमालीचं छोटं वाटू लागतं.
- एक कलासक्त व्यंगचित्रकार आपल्या व्यंगचित्रांमधून भवतालच्या स्थितीवर भाष्य करु लागतो. पण ते भाष्य अपूर्ण वाटल्यामुळे की काय पाहता पाहता संघटना उभी करतो ज्यातून महाराष्ट्राला हिंदूहृदयसम्राट मिळतो.
या तीनही घटनांकडे लक्ष दिलं तर एक बाब लक्षात येते की या माणसाचं आयुष्य दंतकथेसारखं होतं. त्या माणसाचं नाव, बाळासाहेब ठाकरे. म्हणूनच त्यांच्याबद्दल समान्य माणसाला कमालीचं कुतूहल आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ठाकरे या सिनेमाची घोषणा केली तेव्हापासूनच चित्रपटाची उत्सुकता वाढली होती. शिवाय रेगेसारखा वेगळा चित्रपट देणाऱ्या अभिजीत पानसेची निवड त्यांनी दिग्दर्शक म्हणून केली होती. या शिवाय बाळासाहेबांच्या भूमिकेत नवाजुद्दीन सिद्दीकीसारखा कसदार अभिनेता झळकल्यानंतर सिनेमाची उत्सुकता वाढली. खरंतर बाळासाहेबांचं आयुष्य अनेक घटनांनी भरलेलं आणि भारलेलं आहे. ते जितकं कलात्मक आहे तितकंच निखारी आहे. अशा मुशीतून हा चित्रपट तयार झाला आहे.
हा चित्रपट सुरु होतो तो 1960 च्या दशकापासून. 1960 ते 1996 अशा कालावधीचं दर्शन हा चित्रपट घडवतो. या काळात बाळासाहेबांची व्यंगचित्रं, त्यातून त्यांनी उभी केलेली शिवसेना, आणीबाणी आणि पर्यायाने मुंबईत वाढणारी शिवसेना अशी वेगवेगळी वळणं घेत हा चित्रपट पुढे जातो. झंजावात होता. आज असंख्य शिवसैनिक बाळासाहेबांना दैवत जरी मानत असले तरी सर्वात आधी ते संवेदनशील माणूस होते, चित्रकार होते. माणूस म्हणून बाळासाहेबांचं व्यक्तिचित्रं मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनी केला आहे.
चित्रपटाची कथा, छायांकन, संगीत, रंगभूषा, कलादिग्दर्शन या जमेच्या बाजू आहे. पटकथेमध्येही पूर्वार्ध अत्यंत नेटका मांडला आहे. पती, मुलगा, चित्रकार, संघटक म्हणून बाळासाहेब कसे होते हे दिसतं. बाळासाहेबांप्रमाणेच मीनाताई, दत्ता साळवी, मनोहर जोशी आदी मंडळी आपल्याला भेटतात. त्यामुळे हा चित्रपट आपल्या घरातला होतो. पण उत्तरार्धात मात्र यातली गोष्ट कमी होत जाऊन त्यात अनेक घटना क्रमाक्रमाने येऊ लागतात. ज्या घटनांचा आढावा या चित्रपटात घेतला आहे, त्या घटना आपल्याला माहीत आहेत, त्यामुळे चित्रपटातलं कुतूहल काहीसं कमी होतं आणि चित्रपटाचा वेग मंदावतो. तो प्रसंग झाल्यानंतर पुन्हा एकदा चित्रपट पकड घेतो. यामध्ये चित्रपटाची गोष्ट थोडी मागे पडू लागते. बाळासाहेबांवरच्या प्रसंगामुळे तो प्रसंग वेधक आहे. पण माणूस म्हणून बाळासाहेबांच्या व्यक्तिगत जीवनात काय घडत गेलं असावं, तो प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो. म्हणजे, भाषणातून समोरच्याचा खरपूस समाचार घेणारे, थेट भाष्य करणारे, कोणताही आडपडदा न ठेवता भूमिका घेणारे बाळासाहेब सर्वांनीच पाहिले आहेत. पण कधीतरी माणूस म्हणून बाळासाहेब पोट दुखेपर्यंत हसले असतील का?, एखाद्या घडल्या घटनेनं विमनस्क झाले असतील का? त्यांचे डोळे कधी पाणावले असतील का? असे प्रश्न मनात येत राहतात.
चित्रपट म्हणून अभिजीत पानसे यांंनी एक नेटका चित्रपट देण्याचा प्रयत्न केला आहे. पण अनेक वादग्रस्त मुद्द्यांना यात बगल दिली गेली आहे. एक नेटका प्रयत्न आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी, अमृता राव, प्रवीण तरडे, संदीप खरे यांच्या भूमिका संयत आणि महत्वाच्या. सिनेमाचं कास्टिंग छान झालं आहे. सिनेमात येणारे जाॅर्ज फर्नांडिस, शरद पवार, वसंतराव नाईक, इंदिरा गांधी, मनोहर जोशी, मीनाताई ठाकरे या सर्वांचीच रंगभूषाही आणि व्यक्तिरेखा निवड अचूक.
एकूणात, हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहायला हवा. निदान बाळासाहेब या झंजावाताचा किमान अंदाज यायला हा चित्रपट पुरेसा आहे. म्हणूनच पिक्चरबिक्चरमध्ये या चित्रपटाला मिळताहेत साडेतीन स्टार्स.
आणखी वाचा
























