आपल्याकडे प्रथा आहे, नातेवाईक-मित्र परिवाराच्या घरी जर एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्याची दुःखद घटना घडली असेल तर आपण त्या कुटुंबियांचे सांत्वन करतो आणि आपण त्यांच्या दुःखात सहभागी असल्याचे जाहीर करतो. कारण त्या जाणाऱ्या व्यक्ती किंवा त्या कुटुंबियांबद्दल आपल्याला वाईट वाटत असते. या सध्याच्या कोरोना काळात अशाच प्रकारे संपूर्ण देशावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अनेक कुटुंबातील व्यक्तीचा या संसर्गजन्य आजाराच्या प्रादुर्भावामुळे मृत्यू झाला आहे. या सगळ्या परिस्थितीची जाण ठेवत नागरिकांनी आपला वावर ठेवला पाहिजे.


आजही दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णाची संख्या वाढतच आहे. शुक्रवारी राज्यात या आजारामुळे एकाच दिवशी 300 जण मृत्युमुखी पडले आहेत. प्रत्येकजण या संकटातून सहीसलामत बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे, जे रुग्ण उपचार घेत आहेत त्या कुटुंबातील सदस्य आपला रुग्ण या आजारातून बाहेर पडावा म्हणून जमेल तशी धडपडत करत आहे, देवाच्या धावा करत आहेत. एकंदरच सर्वच हा प्रकार भयावह आहे. या परिस्थितीकडे हतबलतेने न पाहता योग्य ते प्रसंगावधान राखून ह्या संकटाबरोबर दोन हात करण्याची वेळ आपल्या सगळ्यांवरच आली आहे. याकरिता राज्याची आरोग्य यंत्रणा यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.


कोरोनाने महाराष्ट्रात शिरकाव केल्यापासून आतापर्यंत 17 हजार 092 नागरिकांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे तर 4 लाख 90 हजार 262 रुग्ण या आजाराने बाधित झाले आहे. त्यापैकी 3 लाख 27 हजार 281 रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहे तर 1 लाख 45 हजार 582 रुग्ण राज्यातील विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. आजही वैद्यकीय तज्ञाच्या मते राज्याची परिस्थिती म्हणावी तशी नक्कीच चांगली नाही. आपल्याला हे आकडे एव्हाना कंटाळवाणे वाटत असले तरी या आकड्यांवरूनच आपल्याला सत्य परिस्थितीची जाणीव होते त्यामुळे हे सत्य तर कुणी नाकारू शकत नाही. हे आकडे फक्त आकडे नसतात त्या प्रत्येक आकड्यांमागे एक व्यक्ती असते, त्याची स्वतःची अशी एक कुटुंब व्यवस्था असते, त्याची सामाजिक व्यवस्था असते. त्यामुळे प्रत्येक आकडा हा महत्वाचा असतो. मुंबई शहरातील परिस्थिती हळू-हळू सुधारण्याच्या मार्गावर आहे. मात्र, राज्यातील इतर शहरातील परिस्थिती बिकट होत चालली आहे.


कोरोनाचं हेच तर खरे वैशिष्ट्य आहे. कधी कुठली परिस्थिती चांगली होईल आणि वाईट होईल ह्याचा थांगपत्ता लागणे अवघड होऊन बसले आहे. मे महिन्यात, त्यावेळी देशात सर्व ठिकाणी कोरोनाचा हाहाकार सुरु असताना केरळ राज्यात 1 मे ला एकही रुग्ण सापडला नाही आणि फार कमी रुग्ण होते ते त्या राज्यातील विविध रुग्णालयात उपचार घेत होते. केरळच्या या कोरोना काळातील कामगिरीचे देशभर कौतुक झाले. केरळ सारखेच सगळ्यांनी काम केले पाहिजे अशी चर्चा जोर धरू लागली होती. मात्र, नियतीला हे मान्य नव्हते की काय केरळमध्ये पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली. एवढेच कमी की काय त्या राज्यातील एक जिल्ह्यातील दोन गावात रुग्ण संख्या इतकी वाढली कि त्या गावांमध्ये सामूहिक संसर्ग झाल्याचे त्या राज्यातील मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. तर हे सांगण्यामागे हेतू एवढाच की कोरोना कधी आपले रूप दाखवेल हे कुणालाच कळणार नाही. त्यामुळे प्रत्येकानेच काळजी घेऊन या आजारापासून दूर राहिले पाहिजे.


गेल्या काही दिवसांपासून राज्यातील ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केला आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात आरोग्याच्या चांगल्या सुविधा आहेत. त्यामुळे शहरी भागात रुग्णांना तात्काळ उपचार देणे शक्य आहे. मात्र, ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्था म्हणावी तितकी सक्षम नाही हे वास्तव आहे. त्यामुळे जर ग्रामीण भागात कुणी व्यक्ती आजारी पडली तर त्याला उपचार देण्यास काही काळ जातो. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी या काळात विशेष काळजी घेतली पाहिजे. सणासुदीच्या या काळात शहरी भागातून काही नागरिक गावी जातील त्यामुळे तेथे गर्दी होईल. कोरोनाचा हा काळ पाहता यंदाच्या वर्षी बहुतांश मंडळांनी सण-उत्सव छोटेखानी स्वरूपात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. काही ठिकाणी तर गर्दी टाळण्याच्या भीतीने यंदाच्या वर्षी सण रद्द करुन राज्यातील आरोग्य व्यवस्थेला कशी मदत करता येईल त्याचा निर्णय जाहीर केला आहे. शहरी भागातील नागरिकांना जर गावी टाळण्याचे शक्य असल्यास या वर्षी टाळण्याचा प्रयत्न करावा आणि जर तेथे गेलात तर सर्व सुरक्षिततेच्या नियमाचं कडेकोट पालन करावे. यामुळे आहे त्या आरोग्य व्यवस्थेवर ताण कमी करण्यास नक्कीच मदत होईल.


खरं तर सगळेच जण एका मोठ्या संकटातून जात असताना समाजातील बहुतांशनी सण साजरा न करता आलेल्या संकटाविरोधात लढणाऱ्या व्यवस्थेला बळ देण्याचे काम केले पाहिजे. कारण हे संकट एका राज्यवार किंवा देशावर नसून जगातील 200 पेक्षा अधिक देश या संकटाचा मुकाबला करीत आहेत. या काळात नागरिकांनी देशामध्ये संयमाची भूमिका घेऊन एक नवीन आदर्श घालून दिला आहे. आजही विविध देशात या आजाराच्या विरोधात लस बनविण्याच्या प्रक्रियेत व्यस्त आहे. अजूनही अनेक देशात या लशी संदर्भात मानवी चाचण्या करण्यात येत आहे. अनेक देशांनी लवकरच कोरोना विरोधात लस बाजारात आणू असे दावे करत असले तरी तज्ञांच्या मते अजून लस येण्यास काही महिने जाऊ शकतात. सर्वात जास्त कोरोना बाधित रुग्णसंख्येच्या यादीत भारत देशाचा जगातील पहिल्या पाच देशात आज समावेश होत आहे. आपल्या देशातील एकूण रुग्णसंख्या 20 लाख 91 हजार 416 असून त्यातील 6 लाख 19 हजार 088 रूग्ण उपचार घेत आहेत, तर 42 हजार 518 नागरिकांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्र राज्याची मोठी परंपरा आहे, राज्यात एखाद्या शहरात किंवा जिल्ह्यात दुर्घटना घडली तर राज्यातील इतर भागातील सर्व नागरिक, सामाजिक संस्था मदतीसाठी कायम पुढे येत असतात हे आपण अनेकवेळा पाहिलं आहे. एवढेच नव्हे तर देशात एखाद्या राज्यात काही अनुचित घटना घडली किंवा निसर्गाचा कोप होऊन ते राज्य अडचणीत आले तर महाराष्ट्र सैदवच मदत करण्यासाठी आघाडीवर असतो. दुसऱ्यांचे दुःख स्वतःचे मानून सगळ्यासाठी उभा राहतो. मात्र, सध्याचा कोरोना काळ हा इतर सर्व काळापेक्षा वेगळा आहे. येथे तर प्रत्येक राज्यात या आजारामुळे हजारो नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. अनके कुटुंबं उध्वस्त झाली आहेत, अनेकांवर दोन वेळेच्या खाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकांचे रोजगार गेले आहेत. त्यामुळे अशा कठीण समयी या आपल्या लोकांच्या दुःखात सहभागी होण्याची हीच ती वेळ. या वर्षी सण साजरे न करता, त्या प्रत्येक अडचणीत सापडलेल्या नागरिकांच्या पाठी मागे उभे राहण्याची वेळ असून यथाशक्ती मदत करू शकतो याचा विचार प्रत्येकानेच केला पाहिजे. सध्याच्या या काळात सर्वच नागरिक निरोगी राहिले तर पुढच्या वर्षी धामधुमीत सगळेच सण हवे त्या पद्धतीने साजरे करता येतील.


संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग