गेले काही दिवस राज्यात आणि देशात आता आयुर्वेदातील डॉक्टर सर्जरी करणार ह्या मुद्द्यांवर जोरदार चर्चा सुरु आहे, ती म्हणजे विशेष करून डॉक्टर मंडळींमध्ये. सर्वसामान्य नागरिकांना मात्र कुतूहल आहे ते म्हणजे आयुर्वेदिक सर्जरी म्हणजे असणार तरी काय? कारण आतापर्यंत आयुर्वेदिक उपचार म्हटले की सर्वसाधारण भस्म, चूर्ण किंवा जडी बुटीचे मिश्रण, पंचकर्म आणि शारसूत्र अशी उपचारपद्धती डोळ्यासमोर उभी राहाते. मात्र, आयुर्वेदातील शास्त्र हे यापेक्षाही मोठे असून अनेक शतकांपासून अस्तित्वात आहे. मॉडर्न मेडिसिन (ऍलोपॅथी) च्या आधीपासून आयुर्वेद औषधाचे उपचार आपल्याकडे आहेत. मात्र, कालांतराने आयुर्वेदातील औषधपद्धती मागे पडली आणि ऍलोपॅथीच्या उपचारपद्धती आणि औषधांना प्रचंड मागणी निर्माण झाली. आजही आपल्याकडे आयुर्वेदातील डॉक्टर कार्यरत आहेत आणि ते सुद्धा सर्जरी करतात याबद्दल सामान्य नागरिकांमध्ये फारशी माहिती असताना दिसत नाही. आयुर्वेदिक औषधांना साईड इफेक्ट्स नसतात असे म्हटले जाते, त्यामुळे आता आयुर्वेदिक सर्जरी कशी असते असे प्रश्न नागरिकांना पडले आहेत.


काही दिवसांपूर्वीच आयुर्वेद विषयातील पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या शल्य (सर्जरी) आणि शालाक्य (ईएनटी-ऑफ्थॅल्मॉजी) या विभागात शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांना सर्जरी करण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना या बाबतची परवानगी देणारा अध्यादेश आयुष मंत्रालयाच्या काऊन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनने काढला आहे. यामुळे आता या डॉक्टरांना काही ठराविक सर्जरी करणे शक्य होणार आहे. आयुर्वेदातील तज्ञांनुसार या अगोदरही काही तज्ञ सर्जरी करत होते. मात्र, या अध्यादेशामुळे आता स्पष्टता आली आहे. त्यासाठी इंडियन मेडिसिन काऊन्सिल (पदव्युत्तर आयुर्वेद शिक्षण) नियम 2016 या कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे.


याबाबत अधिक माहिती देताना आयुर्वेद विषयातील प्रख्यात तज्ञ आणि सायंटिफिक बॉडी फार्माकोपिया कमिशन ऑफ इंडियन मेडिसिन अँड होमिओपॅथी, चेअरमन, डॉ. श्रीराम सावरीकर सांगतात की, "पहिली गोष्ट आपण एक समजून घेतली पाहिजे ती म्हणजे सर्जरी ही सर्जरी आयुर्वेदामध्ये आणि ऍलोपॅथी सर्जरी मध्ये काही फरक नसतो. दोन्ही सर्जरी ह्या सारख्याच असतात. कारण शल्य (सर्जरी) आणि शालाक्य (ईएनटी-ऑफ्थॅल्मॉजी) या विभागात शिक्षण असणाऱ्या डॉक्टरांना याचे प्रशिक्षण मिळत असते. त्यामुळे तसा तो अध्यादेश काढला गेला आहे. यापुढेही या विभागात शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांना सर्जरीचे प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे. ते व्यवस्थित दिले गेले पाहिजे. काही मॉडर्न मेडिसिनचे प्राध्यापक येऊनच या विभागातील विद्यार्थ्यांना सर्जरीचे प्रशिक्षण देत असतात. त्यामुळे कुणी यामध्ये कुरकुर करायची गरज नाही. यामुळे ज्या ठिकाणी खेडोपाडी ऍलोपॅथीचे डॉक्टर नसतात त्या ठिकाणी हे डॉक्टर जाऊन मदत करू शकतात, यामुळे झाला तर समाजाचा फायदाच होईल."


गेल्या काही वर्षात आयुर्वेद शास्त्राला विविध संशोधनासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. या नवीन अद्यादेशामुळे 39 प्रकारच्या शस्त्रक्रिया आयुर्वेदात पोस्ट ग्रॅज्युएशन करत असलेले डॉक्टर करू शकतील. यामध्ये डोळे, कान, नाक, घसा संबंधित 19 शस्त्रक्रियांचा समावेश आहे. साध्या गाठी काढणे, गँगरीन झालेला अवयव काढणे, डोळ्याशी संबंधित छोट्या सर्जरी करणे आणि शरीरात गेलेला धातूचा, बिगरधातूचा तुकडा काढणे या आणि अन्य सर्जरी करण्यास परवानगी देण्यात आली आहे.यामध्ये सुप्रा मेजर सर्जरीचा समावेश नाही.


इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र, अध्यक्ष, डॉ अविनाश भोंडवे याच्या मते, ह्या पोस्ट ग्रॅजुएट डॉक्टरांनी आपल्या पदवी पुढे आयुर्वेदातील ते तज्ञ आहे असे लावावे म्हणजे लोकांमध्ये गैरसमज पसरणार नाही. तसेच आमचा आयुर्वेदाला विरोध नाही, त्यांनी त्यांना जे शिक्षण घेत आहे त्याआधारवर त्यांची प्रॅक्टिस करावी.


याप्रकरणी महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन, अध्यक्ष, डॉ. आशुतोष गुप्ता यांच्या मते ऍलोपॅथीची डॉक्टर उगाच या गोष्टीला विरोध करत आहेत. या अगोदरही अशा पद्धतीच्या सर्जरी सर्वत्र होत होत्या. ह्या सर्जरी म्हणजे आपल्या ज्या ऍलोपॅथीच्या ज्या सर्जरी असतात त्या आणि ह्या सारख्याच असतात या मध्ये कोणतीही जडी बुटीचा वापर करत नाही. या सर्व पोस्ट ग्रॅजुएट डॉक्टरांना प्रशिक्षण दिलेले असते. त्यामुळे उगाच कुणी आगपाखड करायची गरज नाही. राज्यात आयुर्वेदाचे 80 हजार पदवीधर डॉक्टर तर 10 ते 12 हजार डॉक्टर पोस्ट ग्रॅजुएट आहेत त्यापैकी 2-3 हजार डॉक्टर ह्या ठरवून दिलेल्या सर्जरी करत असतात. ह्यामुळे झाला तर फायदाच होईल. अनेक ठिकाणी ऍलोपॅथीचे डॉक्टर पोहचत नाही त्या ठिकाणी हे डॉक्टर काम करत असतात."


आपल्याकडे यापूर्वीही जो एक वर्ग आहे तो वर्षानुवर्षे आयुर्वेदिक उपचार घेत आहे. त्यामुळे ही ऍलोपॅथी चांगली कि आयुर्वेद उपचार पद्धती हे भांडण न करता नागरिकांना ज्या पॅथीच्या डॉक्टरांचा अनुभव योग्य वाटतो, ते त्या डॉक्टरांकडे जात असतात. सरते शेवटी उत्तम शासनाचे मान्यताप्राप्त प्रशिक्षण घेतलेल्या डॉक्टरांकडून रुग्णांना उपचार मिळणे गरजेचे आहे. ज्या पद्धतीने उपचार शहरात मिळत आहेत ते दूर खेडोपाडी मिळणे गरजेचे आहे.


संतोष आंधळे यांचे आणखी काही महत्वाचे ब्लॉग