इंग्लंड, रशिया पाठोपाठ आता भारतातही लवकरच कोरोना या संसर्गजन्य आजार विरोधातील लसीकरणास सुरुवात होणार असल्याचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जाहीर केले आहे. त्यामुळे आता इतर देशापाठोपाठ भारतीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सध्याचा घडीला लस हा सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण ज्या पद्धतीने कोरोनाच्या या आजराने केवळ भारतातच नव्हे तर जगभरात कहर घातलेला आहे. दिवाळीनंतर तर भारतात दिल्ली सोडलं तर कोरोना गायब झाला की काय अशा पद्धतीने नागरिकांनी रस्त्यांवर गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र एकट्या महाराष्ट्रात गुरुवारी (3 डिसेंबर) कोरोनाच्या या आजारामुळे 115 नागरिकांचा मृत्यू झाला आहे हे वास्तव नाकारून चालणार नाही. त्यामुळे नागरिकांनी सजग राहणे काळाची गरज असून जो पर्यंत प्रत्यक्षात लस घेतली जात नाही तो पर्यंत सुरक्षिततेचे सगळे नियम पाळलेच पाहिजे. पंतप्रधानानी कोरोना विरोधातील लसीबाबत सर्वपक्षीय नेत्यांना (4 डिसेंबर) माहिती दिली. त्यात "तज्ज्ञांच्या माहितीनुसार पुढील काही आठवड्यात कोरोना लस तयार होईल. वैज्ञानिकांनी हिरवा कंदिल देताच भारतात लसीकरण सुरु होईल," असं मोदींनी या बैठकीत सांगितलं.


जगात कोरोना बाधितांच्या क्रमवारीत भारताचा दुसरा क्रमांक लागतो. शिवाय 130 कोटी पेक्षा अधिक लोकसंख्या असल्यामुळे भारत या लसीकरणाची मोहीम कशा पद्धतीने राबवणार आहे आणि कशा पद्धतीने नियोजन करणार आहे याकडे सर्वच जगाचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे "लसीचा साठा आणि रिअल टाईम इन्‍फर्मेशनसाठी खास सॉफ्टवेअर तयार केलं आहे." "कोरोनाचं लसीकरण अभियान व्यापक असेल. अशा अभियानांविरोधात अफवा पसरवल्या जातात. त्यामुळे तुम्ही लसीबाबत जागरुकता निर्माण करा," असं आवाहन मोदींनी सर्वपक्षीय नेत्यांना केले आहे. लस कधी येणार याची तारीख निश्चित नसली तरी ती लवकरच येण्याची शक्यता मोदींच्या आजच्या बैठकीनंतर निर्माण झाली आहे. लस म्हणजे कोरोनावरील उपचार नसून कोरोना होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपचारपद्धती आहे. ज्या पद्धतीने मानवी चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्यातील काही विविध लशीची उपयुक्तता आणि परिणामकरिता 92-95 % सांगण्यात येत आहे, त्यामुळे ही लस सुरक्षित असल्याचे त्या त्या कंपन्यातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.


भारतात लसीकरण करणे म्हणजे एक मोठा कार्यक्रम आहे. कोरोना लस आल्यानंतर ती सर्वात आधी कोणाला देणार याची उत्सुकता सगळ्यांच आहे. याविषयी पंतप्रधान मोदी माहिती दिली. ते म्हणाले की, "पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, मग फ्रण्टलाईन कर्मचारी आणि वयोवृद्ध व्यक्ती तसंच गंभीर आजारी असलेल्या लोकांना लस दिली जाणार आहे. केंद्र आणि राज्‍य सरकार लसीच्या वितरणासाठी वेगाने काम करत आहे." त्यासाठी महाराष्ट्रात सरकारने या अगओदरच लसीकरण आणि तिचे वितरण याबाबत राज्यात एक टास्क फोर्स गठीत केला आहे. यामध्ये वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांसोबत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांचा समावेश असणार आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कोविडचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या देशातील महाराष्ट्रसह 8 राज्यांची व्हीसीद्वारे बैठक घेण्यात आली होती . यावेळी नीती आयोगाने देखील येणाऱ्या लसीची निर्मिती, वितरण याबाबत सादरीकरण केले होते .


नागरिकांमध्ये या लशींबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. आता लशीचे वाटप कशा पद्धतीने होते आहे याकडे सर्वांचे लक्ष आहे. संपूर्ण देशात महाराष्ट्रात सर्वात जास्त रुग्णबाधितांची संख्या महाराष्ट्रात होती तसेच मृत्यूचे प्रमाणही राज्यातच होते. त्यामुळे महाराष्ट्राला या लस वाटपात प्राधान्य मिळते ते पाहावे लागणार आहे. पंतप्रधानांनी कोरोना लसीच्या दराबाबत स्पष्टपणे काही सांगितलं नाही. पण यामध्ये अनुदान मिळण्याचे संकेत त्यांनी दिली. केंद्र आणि राज्‍य सरकार लसीच्या खर्चावर चर्चा करत आहे. लोकांचं आरोग्य लक्षात घेऊन यावर निर्णय होणार आहे.


31 ऑक्टोबरला ' लस, राजकारण आणि नियोजन ' या शीर्षकाखाली सविस्तर विश्लेषण करण्यात आले होते. त्यामध्ये ,भारतातील नागरिकांसाठी कोरोनाविरोधातील लस हा संवेदशील विषय असून त्यामध्ये कुणी दुजाभाव केल्यास सर्वसामान्य नागरिक खपवून घेणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. कारण लस सगळ्यांनाच हवी आहे. अनेक नागरिक या लसची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. कोरोना या विषयाला घेऊन लोकांमध्ये जबरदस्त भीती निर्मण झाली आहे. वैद्यकीय तज्ज्ञांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत लस येत नाही तोपर्यंत सुरक्षिततेचे नियम पाळा असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे लस आली की या कोरोनामय वातावरणातून सुटका होणार याची मनाशी खूणगाठ नागरिकांनी बांधली आहे. सध्याच्या घडीला सगळ्याचं लशीच्या या मानवी चाचण्या सुरु आहेत, त्यात काही कंपन्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, मात्र रशियाचा दावा सोडला तर अद्याप कुणाचीही लस तयार झालेली नाही. औषधनिर्मिती शास्त्रातील सर्व तज्ञ लस तयार करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. परंतु ज्यापद्धतीने जागतिक पातळीवर या लशीच्या संदर्भात बातम्या येत आहेत त्यावरून लवकरच ( केव्हा ते माहित नाही ) लस येईल अशी अपेक्षा असल्या कारणाने ती कोणाला आधी द्यायची, त्याचा प्राधान्यक्रम कशा पद्धतीने असणार आहे याच्या नियोजनास केंद्रीय पातळीवर जोरदार तयारी केली. त्याकरिता प्रत्येक राज्यातून आरोग्य कर्मचारी, डॉक्टर ज्यांनी कोरोनाकाळात काम केले आहे त्यांची माहिती मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.


नागरिकांना लस मिळण्यास आणखी किती काळ वाट पाहावी अजूनही स्पष्टता नसली तरी येत्या नजीकच्या काळात मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत पंतप्रधानांनी दिले आहेत. त्यामुळे लवकरच हा लसीकरणाचा कार्यक्रम सुरु होईल आणि नागरिकांना लस मिळेल. भारत नागरिकांना दिली जाणारी लस दोन डोसेसमध्ये दिली जाण्याची शक्यता आहे. तीन आठवड्याच्या अंतराने ही लस घ्यावी लागण्याची शक्यता आहे. यावर संशोधक आणि वैज्ञानिक लवकरच स्पष्ट करतीलच.


संतोष आंधळे यांचे आणखी काही महत्वाचे ब्लॉग