Devendra Fadnavis : सरकार स्थापनेच्या दिल्लीतील बैठकांना अदानी उपस्थित नव्हते
Devendra Fadnavis : सरकार स्थापनेच्या दिल्लीतील बैठकांना अदानी उपस्थित नव्हते
मी राज्याचा मुख्यमंत्री व्हावे, अशी भाजप पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण आता मुख्यमंत्री होणे हे सर्व माझ्यासाठी गौण आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाची (Maharashtra CM) कोणतीही शर्यत नाही आणि अशा शर्यतीत मी सहभागी नाही, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. एका मराठी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात असणार की दिल्लीत याबाबतच्या चर्चेचा पुन्हा तोंड फुटण्याची शक्यता आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला गेल्यावेळपेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त केला. राज्यात 2019ला आमच्या 105 जागा आल्या. आता त्याहीपेक्षा आमच्या जास्त जागा येतील. त्यापेक्षा कमी येणार नाहीत. विदर्भातही आम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
यापूर्वी एबीपीच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' या कार्यक्रमातही देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदासाठी आपण इच्छूक नसल्याचे सूतोवाच केले होते. मी पाच वर्षे राज्याचा मुख्यमंत्री होतो. आतापर्यंत महाराष्ट्रात फक्त दोन मुख्यमंत्र्यांनाच 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला. त्यापैकी एक म्हणजे वसंतराव नाईक आणि दुसरा म्हणजे मी. त्यामुळे आता मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न किंवा लालसा माझ्या मनात उरलेली नाही. आता मला जी जबाबदारी देण्यात येईल, त्यामध्ये मी काम करेन. महायुती ज्याला मुख्यमंत्री ठरवेल, त्याच्या पाठिशी मी ठामपणे उभा राहीन, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते.






















