T 20 IND vs South Africa :हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वात भारतीय महिला संघ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखालील भारतीय महिला संघानं दक्षिण आफ्रिकेतल्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली. या स्पर्धेतल्या अखेरच्या साखळी सामन्यात भारतानं आयर्लंडवर पाच धावांनी मात केली. या सामन्यात भारतीय संघानं आयर्लंडला विजयासाठी १५६ धावांचं आव्हान दिलं होतं. पण आयर्लंडच्या डावातल्या नवव्या षटकात आलेल्या पावसामुळं हा सामना थांबवावा लागला. त्यावेळी आयर्लंडनं आठ षटकं आणि दोन चेंडूंत दोन बाद ५४ धावांची मजल मारली होती. डकवर्थ लुईस नियमानुसार त्यावेळी विजयी लक्ष्य ६० धावांचं होतं. त्यामुळं भारताला पाच धावांनी विजयी घोषित करण्यात आलं. मूळच्या महाराष्ट्रातल्या सांगलीच्या स्मृती मानधनाला या सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा मान देण्यात आला. तिनं ५६ चेंडूंत नऊ चौकार आणि तीन षटकारांसह ८७ धावांची खेळी उभारली.























