एक्स्प्लोर
INDvsPAK : महामुकाबल्यात कुणाचं पारडं जड?
आशिया चषकाच्या निमित्ताने भारत आणि पाकिस्तान संघ तब्बल सव्वा वर्षांनी पुन्हा आमनेसामने येत आहेत.

दुबई : आशिया चषकाच्या निमित्ताने भारत आणि पाकिस्तान संघ तब्बल सव्वा वर्षांनी पुन्हा आमनेसामने येत आहेत. आशिया चषकाच्या प्राथमिक साखळीतला भारत-पाकिस्तान सामना आज दुबईत खेळवण्यात येईल. या स्पर्धेच्या निमित्ताने दोन्ही संघ नऊ दिवसांत तीनवेळा एकमेकांविरुद्ध खेळण्याची शक्यता आहे. रोहित शर्माच्या टीम इंडियात आशिया चषक जिंकण्याची नक्कीच क्षमता आहे. पण यंदा आशिया चषकाचा संभाव्य विजेता म्हणून माझी पसंती सरफराझ अहमदच्या पाकिस्तानला आहे, असं भारताचा माजी कसोटीवीर संजय मांजरेकर यांना वाटतं. टीम इंडिया आणि पाकिस्तान संघामधला आशिया चषकातला साखळी सामना काही तासांवर आलेला असताना संजय मांजरेकर यांनी हे मत व्यक्त केलंय. भारतीय क्रिकेटरसिकांना नक्कीच हिरमुसलं करणार आहे. पाकिस्तानची सध्याची कामगिरी ही चढत्या भाजणीची आहे. त्यात पाकिस्तानचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट हे अलिकडच्या काळात संयुक्त अरब अमिरातीतच खेळलं जातं. त्यामुळे दुबई आणि अबुधाबी ही शहरं पाकिस्तान क्रिकेटचं माहेरघर बनली आहेत. योगायोगानं यंदाचा आशिया चषक हा दुबई आणि अबुधाबीतच खेळवण्यात येत आहे. त्यामुळेच आशिया चषकाचा संभाव्य विजेता म्हणून टीम इंडियाच्या तुलनेत आपली पसंती ही पाकिस्तानला असल्याचं संजय मांजरेकर सांगतात. कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय फलंदाजीची ताकदही कमी झाली आहे, याकडे संजय मांजरेकर आपलं लक्ष वेधतात. त्यामुळेच आशिया चषक जिंकायचा, तर प्रतिकूल परिस्थितीत पाकिस्तानला एकदा नाही, दोनदा नाही, तर तीनदा हरवण्याचं आव्हान टीम इंडियासमोर आहे. भारत आणि पाकिस्तान संघांमधला आशिया चषकातला पहिला सामना हा दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्ताननं टीम इंडियाचा धुव्वा उडवला तो दिवस होता दिनांक १८ जून २०१७. त्यानंतर तब्बल सव्वा वर्षांनी दोन्ही संघ पुन्हा आमनेसामने येत आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमधल्या विजयानं पाकिस्तानला एक नवा आत्मविश्वास दिला आहे. आशिया चषकातही मोहम्मद आमिर, जुनैद खान, उस्मान खान आणि शाहिन आफ्रिदी यांच्यापैकी तीन डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांच्या आक्रमणाची रणनीती घेऊन पाकिस्तानी फौज नव्या लढाईसाठी सज्ज झालीय. त्यांच्या जोडीला फहिम अश्रफ, हसन अली, शादाब खान, शोएब मलिक आणि फखर झमान असे एक ना अनेक पर्याय कर्णधार सरफराझ अहमदच्या हाताशी आहेत. पाकिस्तानच्या या आक्रमणाला पुरुन उरायचं. त्यांच्या नाकावर टिच्चून विजय मिळवायचा तर टीम इंडियाच्या फलंदाज आणि गोलंदाजांना एकमेकांना पुरक अशी कामगिरी बजावावी लागणार आहे. विराट कोहलीची अनुपस्थितीत जाणवू द्यायची नाही, याचा अर्थ फलंदाजांवरच्या जबाबदारीचं ओझं हे दुपटीनं वाढलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाला महेंद्रसिंग धोनीच्या अनुभवाची कशी साथ मिळते, यावरही खूप काही अवलंबून राहिल.






















