एक्स्प्लोर
खंडाळ्याजवळ केवळ एका कर्मचाऱ्यासाठी रेल्वे थांबवण्याचा घाट महागात?
मदुराई एक्सप्रेस ही रेल्वे खंडाळा येथे थांबा घेत नसताना, केवळ एका रेल्वे कर्मचाऱ्यासाठी तिथे थांबवण्याचा घाट घालण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

पिंपरी चिंचवड : खंडाळा येथे रेल्वे रुळावरून उतरण्यामागचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. मदुराई एक्सप्रेस ही रेल्वे खंडाळा येथे थांबा घेत नसताना, केवळ एका रेल्वे कर्मचाऱ्यासाठी तिथे थांबवण्याचा घाट घालण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. खंडाळा येथून त्या कर्मचाऱ्याला लोणावळ्यात सोडण्यात येणार होतं. लोणावळ्यात मात्र ही रेल्वे रीतसर थांबा घेते. या एका प्रवाशासाठी शेकडो प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्यात आला, हे आता यावरून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे नेमकं कोणी आणि कोणासाठी हा घाट घातला होता हे आता चौकशीत समोर येणं अपेक्षित आहे. यात मागील इंजिनच्या चालकाला याची माहिती होती का नाही हे मात्र अस्पष्ट आहे. या दुर्घटनेमुळे दिवसभर रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर खंडाळ्याजवळ मदुराई एक्स्प्रेसचा डबा रुळावरुन घसरला. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तरी या प्रकरणी मुंबईचे डीआरएम एस. के. जैन यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. घसरलेल्या एक्स्प्रेसचा डबा हलवण्यात तब्बल अकरा तास लागले. डब्बा हलवल्यानंतर या ठिकाणाचे रूळ खचलेले निदर्शनात आले. मदुराई एक्स्प्रेस घसरण्याची घटना मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडली. यामुळे रेल्वेला तीन एक्सप्रेस रद्द करण्याची वेळ आली. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात याच ठिकाणी मालगाडीच्या सहा बोगी घसरल्या होत्या. तेंव्हा या ठिकाणी डागडुजी करण्यात आली होती. पण वर्षभराच्या आतच याच ठिकाणी पुन्हा अशीच घटना घडलीय. म्हणूनच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
Before You Go
Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा 'तो' जुना व्हिडिओ

एबीपी माझा वेब टीम
Opinion





















