Rupali Chakankar: आमची चूक नाही म्हणणारं दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी, महिला आयोगाने कारणं सांगितली, रुपाली चाकणकरांनी A टू Z सांगितलं!
Rupali Chakankar on Tanisha Bhise Death Case: रूग्णाला योग्य उपचार मिळाले नाहीत त्यामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाला असल्याचा ठपका दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर अहवालात ठेवण्यात आला आहे.

पुणे: पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने (Deenanath Mangeshkar Hospital) उपचार नाकारल्यानं गर्भवतीचा मृत्यू झाल्याच्या आरोपांनी राज्यात खळबळ उडाली. अनेक राजकीय पक्षांनी, संघटनांनी आंदोलने केली, त्यानंतर दीनानाथ रूग्णालयाने (Deenanath Mangeshkar Hospital) त्यांचीच एक समिती नेमून या मृत्यूप्रकरणात रूग्णालयाची चूक नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर राज्य शासनाचा दीनानाथ रुग्णालयात (Deenanath Mangeshkar Hospital) घडलेल्या प्रकरणी आता चौकशी अहवाल समोर आला असून यात या प्रकरणी रूग्णायावरची ठपका ठेवण्यात आला आहे, त्याचबरोबर या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी पत्रकार परिषद घेत चौकशी अहवालाबाबत माहिती दिली. या अहवालानुसार रुग्णालय दोषी आढळले असून रुग्णालयाने कोणतेही नियम पाळले नसल्याचं रुपाली चाकणकर यांनी सांगितलं आहे.
रुग्णाची मेडिकल हिस्ट्री केवळ डॉक्टरला
रूपाली चाकणकर पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाल्या, 'भिसे कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणताही रुग्ण डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी शेअर करतात, कारण चांगली ट्रिटमेंट मिळावी. या रुग्णाची ट्रिटमेंट डॉक्टर घैसास यांच्याकडे सुरू होती, 15 मार्च रोजी रुग्ण आणि डॉक्टरांची पहिली भेट झाली होती. यावेळी डॉक्टरांनी रुग्णाची संपूर्ण हिस्ट्री सांगण्यात आली होती. रुग्णाची मेडिकल हिस्ट्री केवळ डॉक्टरला माहिती होती. पण घटना घडल्यानंतर दिनानाथ रुग्णालयाला चौकशीसाठी स्वत:ची समिती नेमली आणि त्यात अहवाल दिला. त्या अहवालात रुग्णालयाने स्वत:ला वाचवण्यासाठी रुग्णाच्या वैयक्तिक आयुष्याच्या गोपनीय गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडल्या. त्याचा निषेध करते. याबाबत दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला समज दिली जाईल. यावर कुटुंबाने आक्षेप घेतला असून तसं लेखी पत्र आयोगाला दिलं आहे. तसंच यावर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. या आढावा बैठकीत यावर चर्चा झाली.'
'9 वाजून 1 मिनिटाने रुग्णाची रुग्णालयात एन्ट्री दिसत आहे. रुग्णाला 2 तारखेला बोलवलं होतं. पण 28 तारखेला रक्तस्त्राव होऊ लागल्याने रुग्ण त्याच दिवशी रूग्णालयात आला, त्यांचा डॉक्टरांशी संपर्क झाला. त्यानंतर डॉक्टरांनी रुग्णाला रुग्णालयात बोलावलं. तसंच संबंधीत स्टाफला सूचना दिल्या. डिलिव्हरीसाठी तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे डिलिव्हरीची ऑपरेशनची तयारी करण्यात आली होती. त्याच दिवशी रुग्णाला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाण्याआधी 10 लाखांची मागणी केली. यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी आमच्याकडे 3 लाख रुपये आहे, ते 3 लाख आता घ्या, इतर पैशांची व्यवस्था आम्ही दोन ते चार तासांत किंवा उद्यापर्यंत करू असं सांगितलं. या काळात संबंधित विभागाला मंत्रालयातून, अनेक विभागातून फोन गेले. पण रुग्णालयाने याची कोणतीही दखल घेतली नाही.'
'सकाळी ९ वाजता रुग्णाची रूग्णालयात एन्ट्री झाली होती. दुपारी अडीच वाजता रुग्ण रुग्णालयातून बाहेर पडला. तब्बल साडे पाच तास रूग्ण तिथे दाखल असताना रुग्णाला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असतानाही कोणतेही प्राथमिक उपचार रुग्णालयातून झालेले नाही. डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकांना तुमच्याकडेच कोणतं औषध असेल, तर ते द्या. तुम्ही तुमच्या पद्धतीने रुग्णावर उपचार करा असं सागितलं. पण रुग्णालयाने कोणतेही उपचार केलेले नाहीत. रूग्णाला सहकार्य केलं नाही. या काळात रुग्णाची मानसिकता खचून गेली. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णाला ससून रुग्णालयात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. तिथे रुग्णाची मनाची स्थिती हळवी झाली होती. तिथून 15 मिनिटांत कुटुंबीय बाहेर आले. तिथे ते कोणालाही भेटले नाहीत'.
'पुढे रूग्णाला सूर्या रुग्णालयात घेऊन गेले. तिथे रुग्णालयाने तातडीने आत घेतलं, डिलिव्हरी केली, उपचार सुरू केले. सूर्या रुग्णालयाकडून चांगला प्रतिसाद त्यांना मिळाला. पण मोठ्या प्रमाणात झालेला रक्तस्त्राव आणि खचलेली मनस्थिती यात रुग्णाचा डिलीव्हरीनंतर मृत्यू झाला. रुग्णाच्या नातेवाईकांचा दावा आहे, की डॉक्टरांना संपूर्ण मेडिकल हिस्ट्री माहिती असूनही 15 मार्चला फाईल करुन घेतली. नंतर 2 एप्रिलला बोलावलं. जर आधीच डॉक्टरांना माहिती होतं, क्रिटिकल परिस्थिती आहे, तर त्यांनी फाईल करुन घ्यायला नको होती. पण ऑपरेशनला आता जाण्याआधी 10 लाखांची मागणी केली, पैसे वेळेत न भरल्याने पाच तास रुग्ण कठीण परिस्थितीत होता. ही संपूर्ण माहिती कुटुंबियांनी तक्रार अर्जात दिली आहे.'
रुग्णालयाने रुग्णावर उपचार करणे अपेक्षित होतं. ते उपचार मिळाले नाहीत. हा ठपका रुग्णालयावर ठेवण्यात आलेला असून रुग्णालय दोषी आहे. रुग्णालयाने हलगर्जीपण केला आहे. रुग्णाला त्वरित उपचार दिले असते तर रुग्ण वाचला असता. राज्य समितीचा अहवाल आलेला आहे. तिन्ही समितीचे एकत्रित अहवाल आणि नातेवाईकांनी केलेली तक्रार यावर अंतिम निष्कर्ष होईल.आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी सुद्धा याप्रकरणाचा बाबत बोलणे झालं आहे. रुग्णाला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असताना रुग्णालयाकडून कुठलेही उपचार करण्यात आले नाहीत. तसेच रुग्णाच्या नातेवाईकांनाच तुमच्याकडे कुठलेही औषध असेल तर ते रक्तस्त्राव थांबण्यासाठी द्या असे सांगण्यात आले. गर्भवती तनिषाच्या मृत्यूला दिनानाथ मंगेशकर रुग्णालय जबाबदार आहे. उपचार मिळाले असते तर तनिषा वाचू शकली असती. दोषींना पाठीशी घातले जाणार नाही त्यांच्या कठोर कारवाई केली जाईल. रुग्णालयात धर्मदाय नाव असावे. तसेच आयोग जेव्हा कारवाई करत असते तेव्हा कोणत्या पक्षाचा आहे, ते पाहिले जात नाही. कोणी कोणत्याही पक्षाचा असला तरी चुकीचा असेल तर कारवाई होणार. सर्व दोषींवर कायदेशीर कारवाई करणार. या प्रकरणात कोणालाही सोडले जाणार नाही, असंही पुढे चाकणकरांनी म्हटलं आहे.
राज्य महिला आयोगाने राज्य शासनाला समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. त्यानुसार, संबंधित महिलेचा मृत्यू हा माता मृत्यू असल्याने यासंबंधी सखोल चौकशी माता मृत्यू अन्वेषण समितीच्या माध्यमातून होईल. सखोल चौकशी करुन हा अहवाल आज संध्याकाळपर्यंत येईल. मात्र संपूर्ण घटनेत रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आला आहे. संध्याकाळपर्यंतचे अहवाल आल्याशिवाय कोणतीही कायदेशीर कारवाई करता येणार नाही. उद्यापर्यंत या घटनेप्रकरणी अंतिम निष्कर्ष काढला जाईल, अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी पुण्यातील बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.





















