Pune Accident : भोर-महाड मार्गावर भीषण अपघात, खड्ड्यात कार पडून एकाचा दुर्दैवी अंत, अपूर्ण रस्त्याच्या कामाचा बळी
Pune Accident : भोर-महाड मार्गावर कार खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

Pune Accident : भोर-महाड मार्गावरील (Bhor Mahad Road) वरंधा घाटातील शिरगाव (ता. भोर) हद्दीत रविवारी (दि. 29 सप्टेंबर) मध्यरात्री सुमारे 2.30 च्या सुमारास भीषण अपघात (Accident) झाला. मोरी टाकण्यासाठी रस्त्यावर खोदलेल्या खड्ड्यात कार कोसळल्याने या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, एकजण गंभीर जखमी झाला आहे. राहुल विश्वास पानसरे (वय 45, रा. घाटकोपर, मुंबई) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर राहुल देवराम मुटकुले (वय 32) हे या दुर्घटनेत गंभीर जखमी झाले आहेत.
पावसामुळे रस्ता धूसर, खड्ड्यात कोसळली कार (Pune Accident News)
भोर पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, टोयोटा कंपनीची चारचाकी कार (MH 12 HZ 9299) भोरकडून महाडच्या दिशेने जात होती. शिरगाव परिसरात धुके आणि पावसामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने कार रस्त्याच्या रुंदीकरणासाठी खोदलेल्या आणि झाकल्या न गेलेल्या मोरीच्या खड्ड्यात पडली. अपघात इतका भीषण होता की, कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. हे दोघे गणपतीपुळे येथे दर्शनासाठी जात होते.
पोलिसांनी आणि ग्रामस्थांनी दाखवला तत्परता (Pune Accident News)
घटनास्थळी तत्काळ भोर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार, पो. ह. गणेश लडकत, सुनिल चव्हाण, अजय साळुंके, ज्ञानेश्वर शेडगे यांच्यासह पोलिसांचे पथक पोहोचले. मृतदेह कारमधून बाहेर काढून भोर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला, तर जखमीला उपचारासाठी महाड येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. घटनास्थळी पोलिस पाटील शंकर पारठे, वक्रतुंड क्रेन सर्व्हिसचे अक्षय धुमाळ आणि स्थानिक ग्रामस्थांनी मदतीचा हात दिला.
अपूर्ण रस्त्याच्या कामाचा पहिला बळी (Pune Accident News)
गेल्या सहा-सात महिन्यांपासून भोर-महाड मार्गाचे रुंदीकरण आणि सुधारणा काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. अनेक ठिकाणी मोऱ्या बसवण्यासाठी खड्डे खोदले गेले असून ते खुल्या अवस्थेत सोडले आहेत. त्याचबरोबर काम अपूर्ण असल्याने रस्त्यावर चिखल साचतो, पावसात रस्त्याचा अंदाज येत नाही आणि वाहनचालकांना मोठा धोका निर्माण होतो. दुर्घटनेने या अपूर्ण कामाचा पहिला जीवित बळी गेला आहे, त्यामुळे प्रशासनाच्या हलगर्जीपणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
























