![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Vidhan parishad election 2024: कोकण पदवीधरमधून राज ठाकरेंच्या मनसेची माघार 'सशर्त'; वारंवार असं घडणार नाही, फडणवीसांचा राज ठाकरेंना शब्द
Maharashtra Politics: उमेदवार जाहीर करूनही कोकण पदवीधर मतदारसंघातून राज ठाकरेंची माघार, भाजपचे निरंजन डावखरेच निवडणूक लढवणार. अभिजीत पानसे उमेदवारी अर्ज भरणार नाहीत. भाजप नेत्यांची शिष्टाई यशस्वी
![Vidhan parishad election 2024: कोकण पदवीधरमधून राज ठाकरेंच्या मनसेची माघार 'सशर्त'; वारंवार असं घडणार नाही, फडणवीसांचा राज ठाकरेंना शब्द Vidhan parishad election 2024 Devendra Fadnavis urge MNS chief Raj Thackeray to take back nomination from Konkan Padvidhar matadar sangh Vidhan parishad election 2024: कोकण पदवीधरमधून राज ठाकरेंच्या मनसेची माघार 'सशर्त'; वारंवार असं घडणार नाही, फडणवीसांचा राज ठाकरेंना शब्द](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/07/436d3700f594b7e344ec27b67f0c7e711717733802513954_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: येत्या काही दिवसांमध्ये होऊ घातलेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. मनसेने (MNS) या निवडणुकीसाठी अभिजीत पानसे (Abhijit Panse) यांना कोकण पदवीधर मतदारसंघातून रिंगणात उतरवले होते. मात्र, भाजप नेत्यांच्या मनधरणीनंतर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कोकण पदवीधर मतदारसंघातून (Konkan Padvidhar matadar sangh) माघार घेत भाजपला निवडणुकीसाठी 'सशर्त' पाठिंबा दिल्याची माहिती समोर आली आहे. मनसेचे नेते नितीन सरदेसाई (Nitin Sardesai) यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली. कोकण पदवीधर मतदारसंघातून माघार घेण्यामागे राज ठाकरे यांचे दूरगामी राजकीय गणित असल्याचा दावा नितीन सरदेसाई यांनी केला.
देवेंद्र फडणवीस यांनी हे 3 जूनला रात्री शिवतीर्थवर येऊन राज ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीत देवेंद्र फडणवीस यांनी कोकण पदवीधर मतदारसंघातून माघार घेण्यासंदर्भात राज साहेबांना वैयक्तिक विनंती केली होती. त्यानंतर आज सकाळी निरंजन डावखरे 'शिवतीर्थ'वर राज ठाकरे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आले होते. यानंतर राज ठाकरे यांनी फडणवीसांच्या विनंतीला मान देऊन अभिजित पानसे कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा अर्ज भरणार नाहीत, असा निर्णय घेतला असल्याचे नितीन सरदेसाई यांनी सांगितले.
तुमच्यावर वारंवार पाठिंबा देण्याची वेळ येणार नाही; फडणवीसांची राज ठाकरेंना ग्वाही
देवेंद्र फडणवीस हे कोकण पदवीधर मतदारसंघातून माघार घेण्याबाबत राज ठाकरे यांच्याशी बोलले. त्यावेळी अशा पद्धतीच्या गोष्टी वारंवार होणार नाहीत, असे त्यांनी सांगितले. आमचा पक्ष स्वतंत्र आहे, आम्हाला उमेदवार लढवता येत नाही, याबाबत राज ठाकरे यांनी फडणवीसांना सांगितले. त्यावर फडणवीसांनी असे वारंवार घडणार नाही, असे आश्वासन दिले.
राज ठाकरेंचा पाठिंबा सशर्त, दूरगामी राजकीय गणित
राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीप्रमाणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतही भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे का, असा प्रश्न नितीन सरदेसाई यांना विचारण्यात आला. यावर सरदेसाई यांनी म्हटले की, असं काही नाही, राजकारणात बऱ्याच गोष्टींचा परिणाम लगेच दिसून येत नाही, काही गोष्टींचा फायदा कालांतराने दिसत असतो. राज ठाकरे मनसेच्या फायद्याचा विचार करुनच निर्णय घेतात, त्यामुळे या निर्णयाचा फायदा काही दिवसांनी दिसून येईल, असा दावा नितीन सरदेसाई यांनी केला. त्यामुळे मनसेचा यावेळीचा पाठिंबा हा 'बिनशर्त' नसून 'सशर्त' असल्याचे स्पष्ट होत आहे.
कोकण पदवीधर मतदारसंघातून लढण्याची सर्व तयारी मनसेने केली होती. पण फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीला मान देऊन माघार घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा पक्षाला काय फायदा होईल, हे तुम्हाला नजीकच्या काळात कळेलच. विधानसभा निवडणुकीत इतरांना पाठिंबा देण्याची वेळ येणार नाही. अशा गोष्टी वारंवार होणार नाहीत, असे फडणवीसांनी सांगितल्याचे नितीन सरदेसाई यांनी अधोरेखित केले.
आणखी वाचा
उमेदवार जाहीर करूनही कोकण पदवीधर मतदारसंघातून राज ठाकरेंची माघार, भाजपचे निरंजन डावखरेच निवडणूक लढवणार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)