Bhaskar Jadhav : 'मी उत्तरार्धाला लागलेला कार्यकर्ता, मी न बोललेलं माझ्या तोंडी घातलं जातंय, संधी दिली नाही म्हटलं नाही, पण..'; भास्कर जाधव पुन्हा थेट बोलले!
Bhaskar Jadhav : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव हे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याचे बोलले जात होते. यावर भास्कर जाधव यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Bhaskar Jadhav : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर ठाकरे गटाचे कोकणातील आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) हे देखील नाराज असल्याचे बोलले जात होते. मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकली नाही, असे वक्तव्य भास्कर जाधव यांनी केले होते. यामुळे भास्कर जाधव देखील ठाकरे गटाला (Shiv Sena UBT) सोडचिठ्ठी देणार का? अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले होते. आता यावर भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
भास्कर जाधव म्हणाले की, मी न बोललेल माझ्या तोंडी घातल जातंय. पक्षाने संधी दिली नाही, असे म्हटलं नाही. गेल्या 43 वर्षामध्ये माझ्या क्षमतेप्रमाणे मला पुरेपूर काम करण्याची संधी मिळाली नाही. हा माझा शब्दप्रयोग आहे. कोणी दिली नाही, कोणत्या पक्षाने, नेत्याने दिली नाही, असा माझा आक्षेप नाही. त्या पुढे जाऊन मी म्हटलो की, हे केवळ माझ्याच वाट्याला आले, असे नाही तर अनेकांच्या बाबतीत घडते, म्हणून हे माझे दुर्दैवं आहे, हा दोष मी माझ्याकडे घेतला, असे त्यांनी म्हटले.
मी उत्तरार्धाला लागलेला कार्यकर्ता
तरपद मिळवण्यासाठी असे विधान करून राजकीय स्टंटबाजी केली जात असल्याची टीका भास्कर जाधव यांच्यावर केली जात होती. याबाबत भास्कर जाधव म्हणाले की, मी कुठलेही पद मिळवण्यासाठी कधी काम केले नाही. गेले 43 वर्ष मी राजकारणात आहे, मी एवढी पदे उपभोगली आहेत, मी त्याकाळी कधी अशी स्टंटबाजी केली नाही, आता का करेल? बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार हे उद्धव ठाकरेच आहेत. मी जे बोललो ते बाजूला ठेवले गेले आणि जे नाही बोललो त्याला प्रसिद्ध करण्यात आले. मी कधी खोटे बोलत नाही, असे त्यांनी म्हटले. 43 वर्षांची माझी राजकीय कारकिर्द झाली आहे. कारकिर्दीच्या उत्तरार्धाला लागलेला मी कार्यकर्ता आहे. अडचणीच्या काळात आपल्या हातून चांगले काहीतरी घडावे यासाठी माझी तळमळ असल्याचे देखील भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या























