![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Ramdas Kadam Exclusive VIDEO : विधानसभेला 100 जागा दिल्या नाहीत तर सगळ्या जागांवर लढणार; रामदास कदमांचा भाजपला इशारा
Ramdas Kadam Exclusive : जागावाटपावेळी जे काही झालं ते अतिशय घृणास्पद झालं, अतिशय विश्वासाने आम्ही भाजपसोबत गेलो होतो असं शिवसेना नेते रामदास कदम म्हणाले.
![Ramdas Kadam Exclusive VIDEO : विधानसभेला 100 जागा दिल्या नाहीत तर सगळ्या जागांवर लढणार; रामदास कदमांचा भाजपला इशारा ramdas kadam exclusive interview on bjp mahayuti lok sabha election result demanded 100 seats to shiv sena in vidhan sabha maharashtra politics marathi news Ramdas Kadam Exclusive VIDEO : विधानसभेला 100 जागा दिल्या नाहीत तर सगळ्या जागांवर लढणार; रामदास कदमांचा भाजपला इशारा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/20/fee3c4e3413d796802e04294226b6cfb171888518206793_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: अजितदादांना जरा उशिरा घेतलं असतं तर त्यांच्या वाट्याला गेलेली 9 मंत्रिपदं शिवसेनेला मिळाली असती आणि मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेल्यांना जॅकेट घालून बसावं लागलं नसतं असं शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी म्हटलंय. सर्व्हेच्या नावाखाली आमचे उमेदवार बदलले, पण भाजपचेही उमेदवार पडलेच की, त्यामुळे सर्व्हे फक्त शिवसेनेचे उमेदवार बदलण्यासाठीच होते की काय असा सवालही त्यांनी विचारला. विधानसभेच्या निवडणुकीत जर सेनेला 100 जागा दिल्या नाहीत तर सर्वच जागा आमच्या असं म्हणत त्यांनी भाजपला इशाराच दिला. एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते.
काय म्हणाले रामदास कदम?
जागावाटपावेळी जे झालं ते अतिशय घृणास्पद झालं. रायगड आमचं, रत्नागिरी आमचं, अमरावती आमचीच असं सगळं भाजपने केलं. अतिशय विश्वासाने आम्ही भाजपसोबत गेलो होतो. जर एकनाथ शिंदे यांच्यावर जबाबदारी दिली असतील तर महायुतीच्या आणखी जागा वाढल्या असत्या.
अमरावतीची जागा आमच्याकडून घेतली. त्या ठिकाणी अडसूळ आधी पडले होते ते ठीक. पण मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे दोनवेळा खासदार असतानाही ती जागा देवेंद्र फडणवीसांना जाहीर करावी लागली. त्यामुळे हा प्रकार पुन्हा न होता विधानसभेला आम्हाला 100 जागा द्या, म्हणजे आधी काम करता येईल.
सर्व्हेच्या नावाखाली उमेदवार बदलले
भाजपला देखील सर्व्हेचं प्रकरण पटलं नसावं. फक्त शिवसेनेच्या जागा बदलण्यासाठी सर्व्हे पुढे केला का असा प्रश्न पडतो. सर्व्हेच्या नावाखाली आमचे उमेदवार बदलले, काही उमेदवार आमच्यावर लादले. पण भाजपच्याही जागा पडल्या, त्यावर काय म्हणायचं? भावना गवळी, हेमंत गोडसे नको असं भाजपचं मत होतं. पण आम्ही तुमच्या जागांवर कधी बोललो का? तुमच्या उमेदवारांवर आक्षेप घेतले का?
अजित पवार यांची प्रशासनावर पकड चांगली आहे, ते चांगलं काम करतात. माझं म्हणणं एवढंच होतं की, त्यांना महायुतीत घ्यायला थोडा उशीर झाला असता तर त्यांच्या वाट्याला गेलेली 9 मंत्रिपदं आम्हाला मिळाली असती. एकनाथ शिंदेंनी ज्यांना मंत्रिपदाचा शब्द दिला होता, ते बिचारे जॅकेट घालून बसले नसते. 9 मंत्रिपदं मिळाली असती तर त्यामुळे शिवसेनेची बांधणी अधिक भक्कम झाली असती.
महायुतीचा लोकसभेत पराभव का झाला याचं विश्लेषण तीनही पक्षांनी करावं असं रामदास कदम म्हणाले.
शिवसेनेला 100 जागा हव्यात
शिवसेनेला येत्या विधानसभेच्या निवडणुकीत 100 जागा हव्यात असं सांगताना रामदास कदम म्हणाले की, आमच्याकडे आता 50 आमदार आहेत. गेल्या वेळी आम्ही 100 पेक्षा जास्त जागा लढवल्या होत्या. त्यामुळे आता आम्हाला 100 जागा हव्यात. त्या दिल्या नाहीत तर सगळ्या जागा आमच्याच. भाऊ भाऊ म्हणता मग वाटून खाऊ.
उद्धव ठाकरेंनी लोकसभेच्या 21 जागा लढवल्या, मग आम्हाला कमी का मिळाल्या. आम्हाला जास्त जागा मिळाल्या असत्या तर आणखी खासदार निवडून आले असते. तुलाही नाही आणि मलाही नाही असं व्हायला नको. शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्हाला सत्ता आणायची आहे.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)