(Source: Poll of Polls)
उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणुका पुढे ढकला; एकनाथ शिंदेंचा पलटवार, 'सन्नाटा'वरुन राज ठाकरेंनाही टोला
महायुती जिंकणार याची खात्री विरोधकांना झालीय. विधानसभेत झालेल्या पराभव पराभवामुळे विरोधकांची मानसिकता खचली आणि निवडणुकांना सामोरे जाण्याची त्यांची मानसिकता दिसत नाही.

सातारा : राज्यातील विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आज राज्य निवडणूक आयोगात जाऊन आयुक्तांसमोर आपलं गाऱ्हाणं मांडलं. तसेच, मतदार याद्यांमधील घोळ संपुष्टात येईपर्यंत निवडणुका पुढे ढकला अशी मागणीच विरोधकांनी केली आहे. त्यावर, आता सत्ताधारी पक्षाकडून प्रतिक्रिया येत आहेत. मुख्यमंत्र्यांनंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांची ही महा कन्फ्यूजन आघाडी असून पराभव दिसू लागल्यामुळेच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच, अशा पद्धतीची मागणी करत, असे प्रकारचे वक्तव्य महाविकास आघाडीकडून (MVA) केलं जात आहेत, असे शिंदेंनी म्हटले. तसेच, पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या पॅकेटवरुनही विरोधकांना टोला लगावला.
महायुती जिंकणार याची खात्री विरोधकांना झालीय. विधानसभेत झालेल्या पराभव पराभवामुळे विरोधकांची मानसिकता खचली आणि निवडणुकांना सामोरे जाण्याची त्यांची मानसिकता दिसत नाही. त्यामुळेच, निवडणुका पुढे ढकला, अशा पद्धतीची मागणी महाविकास आघाडीकडून केलं जात आहे. सगळे एकत्र आल्यामुळे जिंकण्याची खात्री विरोधकांना पटली पाहिजे होती. मात्र, जिंकण्याची खात्री नसल्यामुळे महायुती जिंकणार असा विश्वास त्यांना निर्माण झाला आहे, त्यामुळेच अशी मागणी केल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटले.
महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये महायुतीपेक्षा जास्त जागा मिळाल्या तेव्हा निवडणूक आयोग चांगला होता, त्यांनी कोणताही आक्षेप घेतला नाही. मात्र, निवडणूक आणि ईव्हीएम मशीन सुद्धा चांगली होती आणि आता हरल्यानंतर निवडणूक आयोगाला दोष देण्याचे काम ते करत आहेत. ईव्हीएम मशिनची प्रक्रिया ही काँग्रेसच्या काळामध्ये सुरू झालेली आहे, ही आमच्या महायुतीच्या काळात किंवा इंडियाच्या काळात सुरू झालेली नाही, असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले.
एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना टोला
मनसेप्रमुख राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या यशानंतरही सर्वत्र सन्नाटा, असे म्हटले. त्यावरुन, एकनाथ शिंदेंनी टोला लगावला आहे. सन्नाटा आमच्याकडे आहे की त्यांच्याकडे आहे, हे सगळे लोक कन्फ्यूज झालेले आहेत. हे लोक सगळे एकत्र येतात तेव्हा जिंकण्याची खात्री पटली पाहिजे, पण निवडणूक पुढे ढकला म्हणतात म्हणजे त्यांना जिंकण्याची खात्री नाही, असे म्हणत राज ठाकरेंनाही शिंदेंनी टोला लगावला. तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती पूर्ण ताकतीने उतरणार आहे आणि आम्ही 2.5 ते 3 वर्षांमध्ये कामं केलेलं आहे. विकासाचे लोकाभिमुख काम सर्वसामान्यांसाठी केलेलं आहे. आमच्या लाडक्या बहिणी विरोधकांना या ठिकाणी चारीमुंड्या चित करतील, असेही शिंदेंनी म्हटले.
उद्धव ठाकरेंचा फोटो लावलाय ना, चांगलय
दरम्यान, शिवसेना उबाठा पक्षाकडून पूरग्रस्तांना मदतीचे कीट दिले जात आहेत. या कीटवर उद्धव ठाकरेंचा फोटो लावल्यासंदर्भात एकनाथ शिंदेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. त्यावर, उद्धव ठाकरे यांचा फोटो लावलाय ना, चांगलं आहे मला काही अपेक्षेप नाही, असे शिंदेंनी म्हटले. दरम्यान, पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतकीटवर एकनाथ शिंदेंच्या फोटोवरुन उद्धव ठाकरेंनी टीका केली होती. त्यावरुन, शिंदेंना उपरोधात्मक टीका केली.
हेही वाचा
भाजपने विधानसभेचं तिकीट दिलं; मैथिलीचं वय अन् इंस्टावर किती फोलोअर्स?



















