Opration Sindhoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर महाराष्ट्रभरात अलर्ट; 'या' ठिकाणच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ, नेमकं कारण काय?
Opration Sindhoor: अमृतसरजवळच्या जेठुवाल गावात पाकिस्तानी रॉकेट पाडण्यात आलं आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

Operation Sindoor : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात निष्पाप 26 जणांचा दुदैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर देशासह जगभरात संतापाची लाट परसाली होती. परिणामी या भ्याड हल्याला जशाच तसं उत्तर देत भारताने 15 दिवसानंतर बदला घेत पाकड्यांना अद्दल घडवली आहे. भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या (Operation Sindoor) माध्यमातून पाकिस्तानच्या 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राइक करत पहलगामच्या भ्याड हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत बदला घेतलाय. या घटनेने पाकिस्तान पुरता घाबरल्याचे दिसून येत आहे. शिवाय पाकिस्तानकडून सीमारेषेवर वारंवार गोळीबार करण्यात येत आहे. अशातच पाकिस्ताननं परत एकदा आपला खरा चेहरा समोर करत अमृतसरजवळच्या जेठुवाल गावात पाकिस्तानी रॉकेट (India vs Pakistan) पाडण्यात आलं आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
'ऑपरेशन सिंदूर'नंतर महाराष्ट्रभरात अलर्ट
पाकिस्तानमधील हवाई हल्ल्यानंतर महाराष्ट्रात अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पर्यटन स्थळांची, आध्यात्मिक स्थळांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्या सर्व ठिकाणी अधिक दक्षता ठेवण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या. संभाव्य परिस्थिती लक्ष्यात घेता सर्वत्र खबरदारी घेण्यात येत आहे. अशातच परराष्ट्र मंत्रालयाकडून आलेल्या आकडेवारीनुसार, पाकिस्तानने LOC वर केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनात एकूण 13 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर 59 नागरिक जखमी झाले आहेत. मृतांमधील सर्व पुंछमधील असल्याची माहिती पुढे आली आहे. तर एकूण जखमीपैकी 44 पुंछमधील असल्याची माहिती आहे.
भारत-पाक सीमारेषेजवळील राज्यांमध्ये मॉकड्रील
भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले तर सर्वाधिक नुकसान हे साहजिकच नियंत्रण रेषेला लागून असलेल्या परिसरात होईल. त्यामुळे भारत-पाक सीमारेषेपासून जवळ असलेल्या राज्यांमध्ये मॉकड्रील सुरु झाली आहे. या राज्यांमधील लोकांना हवाई हल्ल्यापासून वाचण्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. भारतात सीमारेषेपासून जवळ असलेल्या राज्यांचा विचार करायला झाल्यास त्यामध्ये पंजाब, जम्मू-काश्मीर, गुजरात आणि राजस्थान यांचा समावेश आहे.
भारतीय वायूदलाला सरकारची सूट
पाकिस्तानी लष्कराकडून बुधवारी रात्री अमृतसर येथील जेठुवाल गावात रॉकेट डागण्यात आले होते. मात्र, हे रॉकेट भारतीय सैन्याने अमृतसर-पाकिस्तान सीमारेषेजवळील शेतात पाडले. भारतीय सैन्याने हे क्षेपणास्त्र ताब्यात घेतले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारतीय वायूदलाला पूर्ण मोकळीक दिली आहे. पाकिस्तानने आगळीक केल्यास तोडीस तोड प्रत्युत्तर द्या. पाकिस्तानी विमानं भारताच्या हवाई हद्दीत दिसली तर कारवाई करण्याची सूट भारतीय हवाई दलाला देण्यात आली आहे.























