एक्स्प्लोर
एकाच दिवशी तीन हत्यांनी नाशिक हादरलं!
या घटनेनंतर नाशिककरांमध्ये घबराट पसरली असून गुन्हेगारांवर पोलिसांचा वचकच आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नाशिक : एकाच दिवशी तीन खुनांच्या घटनांनी नाशिक हादरलं. नाशिकच्या सिडको परिसरात एक आणि इंदिरानगर परिसरात दोन हत्या झाल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर नाशिककरांमध्ये घबराट पसरली असून गुन्हेगारांवर पोलिसांचा वचकच आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास सिडको परिसरातील डीजीपी नगरमध्ये साहेबराव जाधव नावाच्या रिक्षाचालकाची हत्या झाली. चार ते पाच जणांच्या टोळक्याने साहेबराव जाधवच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात साहेबराव जाधवचा मृत्यू झाला तर हल्लेखोर पसार झाले आहेत. ही घटना होऊन काही तास उलटत नाही, तोच नाशिकच्या इंदिरानगर परिसरात अशाचप्रकारे धारदार शस्त्राने वार करत दोघांची निर्घृणपणे हत्या केली आणि हल्लेखोर फरार झाले. पूर्ववैमनस्यातून या हत्या झाल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे. एकाच रात्री काही तासांच्या अंतराने साहेबराव जाधव, देवा इंगे आणि दिनेश बिराजदार या तीन जणांची हत्या झाली. ही बातमी समजताच नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली. पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आणि आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहे.
Before You Go
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story






















