Malegaon Murder : मागील भांडणाचा राग धरून मित्राने काढला काटा, मालेगावी टोळीयुद्धाचा थरार
Malegaon Murder : मालेगाव (Malegaon) शहरात दोघांनी तरुणावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवत त्याचा निघृण खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Malegaon Murder : मागील भांडणाची कुरापत काढून एका तरुणावर दोघांनी धारदार शस्त्रांनी हल्ला चढवत त्याचा निघृण खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना मालेगाव (Malegaon) शहरात घडली आहे. मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास शहरातील गोल्डन नगर भागातील हॉटेल शकील लगत ही थरारक घटना घडली. पहाटेच्या सुमारास घडलेल्या खुनाच्या घटनेने परिसर हादरला आहे.
मालेगाव शहर (Malegaon City) परिसरात गेल्या काही दिवसांपासून खून, खुनाचे प्रयत्न, जबरी लुट, हाणामाऱ्याची प्रकरणे वाढली आहेत. अशातच मालेगाव शहरातील गजबजलेल्या गोल्डननगर भागात आज पहाटेच्या सुमारास एका तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याची घटना उघडकीस आली.सलमान अहमद सलीम अहमद असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास सलमान याच्यावर तौसीफ अहमद जब्बार अहमद उर्फ राजू तसेच त्याचा साथीदार अकील अहमद मोहम्मद सुगराती उर्फ पापा या दोघांनी मागील भांडणाची कुरापत काढून धारदार शस्त्रांनी वार केले. पोटावर पाठीवर तसेच मानावर व चेहऱ्यावर सपासप वार केल्याने वर्मी घाव लागून सलमान रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळून गतप्राण झाला. सलमान मृत झाल्याचे पाहून तौसिफ व अकीलने घटनास्थळावरून पलायन केले.
.
दरम्यान खुनाच्या घटनेची माहिती मिळताच अपो अधिक्षक चंद्रकांत खांडवी, उपअधीक्षक प्रदीप जाधव, पवारवाडी पोलीस ठाण्याचे सपोनि डी जे बडगुजर उपनिरीक्षक नाजीम शेख आदी पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोर दुचाकीवरून फरार झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या शोधार्थ सर्वत्र नाकाबंदी केली गेली. तौसिफ व अकील मनमाडकडे पळाले असल्याचे कळताच पोलीस पथकाने मनमाड येथे धाव घेतली.
पवारवाडी पोलिसांनी तातडीने सापळा रचून स्टेशनवर रेल्वेने पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या या दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले. याप्रकरणी मृत सलमानचे वडील मोहम्मद सलीम यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. हल्लेखोर तौसिफ व अकील या दोघांना पोलिसांनी आज न्यायालयात हजर केले असता 12 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला.
मालेगावात टोळीयुद्ध
दरम्यान आज पहाटेच्या खुनाचा थरार पाहिल्यानंतर नागरिकांना हादरा बसला आहे. दर दिवसाआड शहरात खुनाच्या घटना समोर येत आहेत. तर दुसरीकडे भाई गंग फोफावत चालली आहे. दरम्यान सलमान अहमदचा मृत्यू शहरातील टोळीयुद्धातून झाल्याचे समोर आले आहे. तर सलमानला मारणारे दोन्ही संशयित हे सराईत गुन्हेगार असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या असल्या तरी शहरात वाढत चाललेल्या टोळीयुद्धाच्या बिमोड करण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.