'आता तरी देवा मला पावशील का' लिहिणारे हरेंद्र जाधव काळाच्या पडद्याआड, दहा हजारांहून अधिक गीतांचे लेखन
तूच सुखकर्ता तूच दु:खहर्ता अवघ्या दिनांच्या नाथा, आता तरी देवा मला पावशील का? अशा प्रसिद्ध गीतांसह चौफर लिखाण करणारे लोककवी हरेंद्र जाधव यांचे रविवारी निधन झाले.

नवी मुंबई : भीमगीते, भक्तीगीते, भावगीतं, कोळीगीत, लग्नगीतं, लावण्या, पोवाडे, लोकनाट्य, कथा असे चौफर लिखाण करणारे लोककवी हरेंद्र जाधव यांचे रविवारी पहाटे सानपाडा सेक्टर-3 येथील निवासस्थानी वृद्धपकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 88 वर्षे होते. त्यांच्या पश्चात त्यांची मुलगी तारका जाधव, पत्नी , जावई व नात असा परिवार आहे. लोककवी हरेंद्र जाधव यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीतून तसेच सानपाडा परिसरात सर्वच स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
तूच सुखकर्ता तूच दु:खहर्ता अवघ्या दिनांच्या नाथा, बाप्पा मोरया रे चरणी ठेवितो माथा हे श्री गजाननाचे गीत दरवर्षी गणशोत्सवात प्रत्येक मांडवात वाजते. आता तरी देवा मला पावशील का? सुख ज्याला म्हणत्यात ते दावशील का?, मंगळवेढे भुमी संताची, ही लोककवी हरेंद्र जाधव यांनी रचलेली भक्तीगीतं आजही आघाडीवर आहेत. हरेंद्र जाधव यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भगवान बुद्ध यांच्या जीवनावर आधारित अनेक गीतं रचलेली आहेत.
त्यातील पहा पहा मंजुळा हा माझ्या भिमरायाचा मळा, हे खरचं आहे खर, श्री भिमराव रामजी आंबेडकर, ही त्यांची शाहीर विठ्ठल उमाप यांनी रेकॉर्डवर गायलेली गीते आजही सारा समाज आवडीने एकतो. यासारखी अनेक भीमगीते आंबेडकरी चळवळीला आजही मार्गदर्शक ठरतात. लावणीसारखे काव्य लिखाणासाठी त्यांनी हाताळली, त्यापैकीच माझ्या नवऱ्याने सोडलीया दारु बाय देव पावलाय गो, डोलकरा माझे डोलकरा, या सारखी कोळीगीते आजही श्रोते आवडीने ऐकतात.
लोककवी हरेंद्र जाधव यांच्या 600 पेक्षाही अधिक ध्वनिफिती बाजारात आलेल्या असून त्यांनी लिहिलेल्या गीताची संख्या दहा हजाराच्या घरात आहे. त्यांची गीते, गायक अजित कडकडे, विठ्ठल भेडे, सुरेश वाडकर, प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे, शाहीर कृष्णा शिंदे, शाहीर साबळे, कृष्णा शिंदे, किसन खरात, दत्ता जाधव, शाहीर विठ्ठल उमप अशा नामवंत गायकांनी गायली आहेत.
त्यांनी साक्षरता, अधश्रध्दा निर्मुलन, एड्स, दारूबंदी या सारखी अनेक लोकनाट्य, आकाशवाणी व दुरदर्शनवर प्रसारित करुन समाजप्रबोधनात्मक लिखाण केले आहे. आपल्या लोक गायनातून फुले, शाहू, आंबेडकरांची परिवर्तनावादी क्रांतीवादी चळवळ समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम ज्या कलावतांनी केले, त्यामध्ये लोककवी हरेंद्र जाधव यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते.
साहित्य सेवेतून लोकरंजनाद्वारे समाजप्रबोधन करण्यावर त्यांनी आपल्या लिखाणातून कायम भर दिला. आयुष्यातली 50 दशकाहुन अधिक काळ त्यांनी साहित्य क्षेत्रात लोकरंजनातून समाज प्रबोधनासाठी दिलेला आहे. मात्र शासनाकडून त्यांच्या कार्याची दखल घेतली नसल्याचे दिसून येत आहे. शासनाकडून साधा दलित मित्र पुरस्कार देखील त्यांना दिला गेला नाही, अशी खंत चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे.























