एक्स्प्लोर
जे शिवसेना सोडणार होते, त्यांनी मला निष्ठा शिकवू नये: आव्हाड

ठाणे: राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेच्या बड्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. 'नारायण राणेंसोबत शिवसेनेतून कोण-कोण बाहेर पडणार होतं हे मला माहिती आहे. त्यामुळं ज्यांना शिवसेना सोडायची इच्छा होती त्यांनी मला निष्ठा शिकवू नये.' असा टोला आव्हाडांनी लगावला. कालच एकनाथ शिंदेंचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी आव्हाडांवर टीका केली होती. त्यानंतर आव्हाडांनी हे प्रत्युत्तर दिलं. 'ज्यांच्या मनात शिवसेना सोडायचा विचार आला होता, त्यांनी आम्हाला गद्दारीबद्दल सांगू नये.' असंही आव्हाड म्हणाले. तसंच शाई धरणाचं काम केवळ टक्केवारीसाठी रोखल्याचा आरोपही आव्हाडांनी केला आहे. त्यामुळं आता आव्हाड आणि शिवसेना नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगण्याची शक्यता आहे. तसंच 'हे राम नथूराम' नाटकाला विरोध करणाऱ्यांना अभिमान असल्याचंही आव्हाड म्हणाले. काय आहे नेमकं प्रकरण? ५ टक्क्यांच्या राजकारणामुळे आजपर्यंत ठाणेकरांना धरण मिळालं नसल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेवर केला होता. जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेनंतर काल शिवसेनेनं ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं होतं. 'आव्हाड यांनी टीका करण्याऐवजी आपला पक्ष सांभाळावा.' असा सल्ला शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के यांनी दिला होता. 'शाई धरणाबाबत कुणी आडकाठी केली, कुठल्या पक्षाचे नेते वादाच्या भोवऱ्यात सापडले हे सांगण्याची गरज नाही. व्हाड यांनी शाई धरणाबाबत टीका करुन स्वपक्षीय नेत्यांच्या सिंचन घोटाळा प्रकरणाच्या निखाऱ्यांना हवा दिली आहे.' असा आरोप नरेश म्हस्के यांनी केला होता.
आणखी वाचा























