एक्स्प्लोर
मी ईडीला घाबरत नाही, मंत्र्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलण्याची माझ्यात हिंमत आहे : राज ठाकरे
कोहिनूर मिलप्रकरणी ईडीने राज ठाकरे यांना 22 ऑगस्ट रोजी चौकशीसाठी बोलवले होते. साडेआठ तास ईडीच्या अधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांची तेव्हा चौकशी केली होती.

मुंबई : कोहिनूर मिलप्रकरणी ईडीने राज ठाकरे यांना 22 ऑगस्ट रोजी चौकशीसाठी बोलवले होते. साडेआठ तास ईडीच्या अधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांची तेव्हा चौकशी केली होती. राज ठाकरे पंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या विरोधात सातत्याने बोलत असल्यामुळे राज यांच्या पाठी ईडीचा ससेमिरा लावला असल्याची टीका राजकीय स्तरातून होऊ लागली. तसेच ईडीच्या चौकशीनंतर बराच वेळ राज ठाकरे माध्यमांसमोर काही बोलले नव्हते. त्यामुळे ईडीच्या चौकशीनंतर राज ठाकरे बॅकफुटवर गेल्याची टीकादेखील झाली. परंतु या चौकशीनंतर पहिल्यांदाच राज या चौकशीबाबत बोलले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. त्यांच्यासाठी त्यांनी मुंबईत काल (10 ऑक्टोबर) दोन आणि आज (11 ऑक्टोबर) तीन जंगी सभा घेतल्या. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, सर्व मंत्र्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलण्याची माझी हिंमत आहे. ईडीच्या कितीही चौकशा लावल्या तरी मी त्याला घाबरत नाही. काँग्रेस राष्ट्रवादीमधले भ्रष्टाचारी नेते भाजप आणि शिवसेनेत गेले आहेत. त्यांना कोणीच जाब विचारत नाहीत. मात्र माझी ईडीकडून चौकशी केली जाते. अशा चौकशांना राज ठाकरे घाबरत नाही. सरकारला वठणीवर आणण्यासाठी मनसेला मत द्या, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. काल गोरेगाव आणि सांताक्रुझमध्ये सभा घेतल्यानंतर राज ठाकरेंनी भांडुपमधल्या उमेदवारांसाठी सभा घेतली. राज यांनी सांगितले की, मनसेच्या आंदोलनामुळे राज्यातले 78 टोल बंद झाले. तर मनसेमुळं मोबाईलमध्ये मराठी भाषा सुरु झाली. राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात तीन भाषा आहेत. मी चौथी भाषा इथे येऊ देणार नाही, तसा प्रयत्न कोणी केल्यास त्याला बांबू बसतील. दरम्यान भाजपच्या काळात राज्य सरकारचं अडीच लाख कोटींचं कर्ज वाढलं आहे, असा आरोप मनसेने केला. कलम 370 वर बोलणारे अमित शाह शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर चकार का काढत नाहीत? असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
Before You Go
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?





















