एक्स्प्लोर
राम कदमांच्या कार्यकर्त्यांचे 'माझा'ला फोन, महिला प्रतिनिधींशी अर्वाच्य भाषेत वाद
राम कदम यांच्या कार्यकर्त्यांनी अभ्यंकर यांच्या वक्तव्याची मोडतोड करुन, त्यांनी शिवीगाळ केल्याचा खोटा प्रचार सुरु केला आहे.

मुंबई: बेताल बादशाह आमदार राम कदम यांच्या कार्यकर्त्यांनी आता मुजोरी सुरु केली आहे. आमदार राम कदम यांच्या बेताल वक्तव्यावर 'माझा विशेष' कार्यक्रमात चर्चा झाली. ज्यात मनसेकडून अविनाश अभ्यंकर सहभागी झाले होते. राम कदम यांच्या कार्यकर्त्यांनी अभ्यंकर यांच्या वक्तव्याची मोडतोड करुन, त्यांनी शिवीगाळ केल्याचा खोटा प्रचार सुरु केला आहे. हे कार्यकर्ते इथेच थांबले नाहीत, तर त्यांनी एबीपी माझाच्या कार्यालयात फोन करुन महिला प्रतिनिधींसोबत अर्वाच्च भाषेत वाद घातला. त्यामुळे बेताल बादशाहच्या आदेशावरुनच मुजोर कार्यकर्ते दडपशाही आणि दमदाटीची भाषा करतायत का? हा प्रश्न आहे. पोरींना पळवण्याची भाषा करणारा आमदार नंतर जिवंत अभिनेत्रीला श्रद्धांजली वाहतो आणि आता महिला पत्रकारांना अर्वाच्य भाषेत बोलतो, हे कुठल्या संस्कृतीत बसतं? यावर भाजप आणि मुख्यमंत्री कारवाई का करत नाहीत? हा प्रश्न आहे. अविनाश अभ्यंकर काय म्हणाले? (VIDEO- 17.45 पासून पुढे) बुधवारी 5 सप्टेंबर रोजी ‘माझा विशेष’मध्ये भाजप नेतेच नेहमी का होतात बेलगाम? या विषयावर चर्चा झाली. यावेळी अविनाश अभ्यंकर यांना प्रश्न विचारण्यात आला की, मुंबईमध्ये कोणीतरी असं म्हणण्याची हिम्मत दाखवतं की आम्ही मुली उचलू आणि देऊन टाकू, काल दिवसभर हे वक्तव्य चाललं, या वक्तव्यानंतरही शिवसेना-मनसेकडून काहीही प्रतिक्रिया आली नाही. असंच विधान जर मुंबईत असदुद्दीन ओवेसींनी केलं असतं तर मनसे-शिवसेना कशी वागली असती? आणि इतका वेळ (प्रतिक्रिया देण्यास) का लागला मनसेला? अविनाश अभ्यंकर यांचं उत्तर जशास तसं इतका वेळ का लागला असं नाही, कसं आहे प्रसन्न शेवटी सत्तेचा मान राखायचा असतो. सत्तेचा माज आणि मस्तवालपणा आला ना, की ही बेताल वक्तव्यांची मन की बात बाहेर येते. हे जे कालचं आहे ना, ते स्टेटमेंट मी वरती बघत होतो. त्याच्यात त्यांनी असं सांगितलंय, मुलींना मी आणणार आणि तुम्हाला देणार... तुम्हाला देणार?? या माणसाला लाज नाही वाटत? मग ह्यांच्यावर कुठल्या संघाचे संस्कार आहेत? (इथे शिवी दिल्याचा भास होतो; पण हे वाक्य नीट ऐकल्यास संभ्रम दूर होईल ) आम्हाला प्रश्न विचारण्यापेक्षा त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत. आणि ह्यांना कोण दानवे समजावणार? जे बेताल वक्तव्यापेक्षा प्रसिद्ध आहेत. म्हणजे मला एक लॉजिकल असा प्रश्न पाहिजे, भारतातील मोठी दहीहंडी 210 देशात जाते असं ऐकलं होतं. मग त्या 210 देशांमध्ये माझ्या महाराष्ट्रातील, माझ्या देशातील माता भगिनींचा पूर्ण अपमान झालेला आहे. आणि असे जे बोलतात ना, यांची खेटराने जरी पूजा केली ना तरी ती कमी आहे. त्या खेटराचा अपमान आहे तो. आपल्याला बोलताना लाज वाटली पाहिजे. प्रश्न- ही सगळी मंडळी भाजपमध्येच आहेत, असं समोर येतंय, आपण नावं पण दाखवली. अभ्यंकर यांचं उत्तर – हो.. मला वाटतंय त्यांनी आता काही करु शकत नाहीत, काही देऊ शकलेले नाहीत. आणि हे जे सगळा गाळ उरला आहे, आणि अचानक सत्ता हातात आली, सत्ता हातात आल्यानंतर, त्या सत्तेचा सुसंस्कृतपणा, त्या सत्तेमध्ये कसं वागायचं असतं, लोकांमध्ये कसं जायचं असतं. .. इथे महाराष्ट्रातील लोकांना नाही तर देशातील लोकांना गृहित धरलंय. हे जाणार कुठे आमच्याच मागे येणार. हा माज आहे सत्तेचा लक्षात घ्या. आणि हा माज आपल्याला जर उतरवायचा असेल, तर या लोकांना योग्यवेळी धडा दिलाच पाहिजे. हे काहीतरी बेटी बचाओ, बेटी पढाओ सांगतात..मग हे बेटी बचाओ, बेटी भगाओ आहे? ही कुठली मन की बात आहे? आणि माझ्या महाराष्ट्राचे पारदर्शक मुख्यमंत्री काय करतायत? एकाही भाजपच्या नेत्याचं स्टेटमेंट नाही. इथे भाजप, शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी हा विषय नाहीचय. हा महाराष्ट्रातील,देशातील माता भगिनींचा, माझ्या आईचा, तुमच्या आईचा, ताईंच्या आईचा, सर्वांच्या आईचा आहे. ते 60 हजार महिलांकडून राखी बांधून घेतात. गिनीज मध्ये गेले ना? मग त्या 60 हजार महिलांना प्रश्न विचारा की पळवून आणणार आणि तुम्हाला देणार याचा अर्थ काय होतो? आणि हा निर्लज्जपणाचा कळस आहे लक्षात ठेवा. आणि याला कुठल्याही प्रकारची माफी देता कामा नये. कुठेही नाही.
Before You Go
BMC Manhole Reality Check Special Report : मुंबईत पावसाचा पहिलाच तडाखा अन् पालिकेची नाचक्की!






















