Pahalgam Terror Attack : नशीब बलवत्तर म्हणून वाचलो; दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यातील नागपूरकर प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश आहे. तर या हल्ल्यात आतापर्यंत 28 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 13 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

Jammu Kashmir Pahalgam Terror Attack : संपूर्ण जागाला आपल्या निसर्गसौंदर्याने वेड लावणारे भारताचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या काश्मीर मधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला आहे. यात अनेक निष्पाप पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार करत हल्ला केला. या हल्ल्यात आतापर्यंत 28 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 13 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. यात महाराष्ट्रतील 6 निष्पाप पर्यटकांचा ही मृत्यू झाला आहे.
अशातच, नागपूरचे (Nagpur) पृथ्वीराज वाघमारे त्यांच्या सात सदस्य कुटुंबीयांसह सध्या काश्मीरमध्ये असून श्रीनगरमध्ये एका हॉटेलमध्ये अडकले आहेत. विशेष म्हणजे पहलगाममध्ये ज्या ठिकाणी काल भ्याड दहशतवादी हल्ला झाला, दोनच दिवसांपूर्वी पृथ्वीराज वाघमारे त्यांच्या कुटुंबीयांसह त्याच पर्यटन स्थळावर उपस्थित होते. तेव्हा परिस्थिती एकदम शांत होती. मात्र कालपासून (22 एप्रिल) परिस्थिती अत्यंत तणावाची झाली आहे. काश्मीरमध्ये प्रत्येक ठिकाणी सुरक्षा दल दिसत आहे. आकाशात हवाई दलाचे हेलिकॉप्टर आणि विमानांची सतत टेहळणी सुरू असल्याची प्रतिक्रिया पृथ्वीराज वाघमारे यांनी एबीपी माझाशी व्हिडिओ कॉल वर श्रीनगर मधून बोलताना दिली आहे.
लवकरात लवकर महाराष्ट्रात यायचंय..
पृथ्वीराज वाघमारे हे नागपुरात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या परिसरात राहतात. त्यामुळे बावनकुळेनी त्यांच्याशी रात्री संपर्क साधला असून वाघमारे कुटुंबीयांना सुरक्षित महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहितीही वाघमारे यांनी दिली. मात्र वाघमारे कुटुंबीय महिला आणि मुलांसह सध्या काश्मीरमध्ये असल्यामुळे एक भीतीचा वातावरण ते अनुभवत आहेत आणि लवकरात लवकर महाराष्ट्रात येऊ इच्छितात, अशी इच्छा वाघमारे कुटुंबीयांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली आहे.
दहशदवादी हल्ल्यानंतर नागपूरमध्ये पण हाय अलर्ट
कश्मीरमधील दहशदवादी हल्ल्यानंतर नागपूरमध्ये पण हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. शहरातील संघ मुख्यलाय, रेशीबाग येथील स्मृतिमंदिर परिसर, दीक्षाभूमी, नागपूर रेल्वेस्थानक आणि नागपूर विमानतळ परिसरात पोलिसांची सतर्कता वाढली आहे. तर नागपूर शहातील संशयास्पद हालचालीवर पोलिसांची करडी नजर असल्याचेही बघायला मिळाले आहे.
श्रीनगरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसोबत अनिल देशमुखांचा संवाद
काटोल मतदारसंघातील मुर्ती येथील देशभ्रतार व कोराडी येथील वाघमारे कुटुंबीय हे श्रीनगर येथे फिरण्यासाठी गेले होते. पहलगाम येथे सोमवारी झालेल्या हल्ल्याच्या वेळी हे दोन्ही कुटुंब घटना स्थळाच्या काहीच अंतरावर होते. सध्या ते श्रीनगर येथील एका हॉटेलमध्ये सुरक्षित असून त्यांच्यासोबत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संवाद साधत धिर दिलाय. तसेच राज्य शासनाला या कुटुंबीयांची माहिती देवून त्यांना सुखरुप आणण्याची विनंती केलीय. मुर्ती येथील प्रफुल्ल देशभ्रतार त्यांच्या पत्नी मेघा तसेच कोराडी येथील पुथ्वीराज वाघमारे त्यांच्या पत्नी मनिषा आणि मुली श्रेयषा आणि एकता हे श्रीनगर येथे फिरण्यासाठी गेले होते.
ज्या गाडीतून दहशतवादी आले होते त्या गाडीचा संशय
दरम्यान, सोमवारी पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला तेव्हा ते घटनास्थळाच्या काहीच अंतरावर होते. ज्या गाडीतून हे दहशतवादी आले होते त्या गाडीचा प्रफुल्ल यांना संशय आला होता आणि त्याने स्थानिक घोडेवाल्याकडे याची विचारणा केल्याची माहिती त्यांनी अनिल देशमुख यांना सांगीतली. घटनेनंतर स्थानिक नागरीकांच्या मदतीने आम्ही श्रीनगर येथे हॉटेलला सुखरूप आलो असल्याचेही त्यांनी अनिल देशमुख यांना सांगीतले. अनिल देशमुख यांनी दोन्ही कुटुंबियांना हिम्मत दिली. देशभ्रतार आणि वाघमारे कुटुंबियांना लवकरात लवकर नागपूरला आणण्यासाठी प्रशासनाला त्यांची संपूर्ण माहिती देत विनंती केलीय.
विदर्भातील 11 जिल्ह्यातील काश्मीर गेलेल्या पर्यटकांची सद्यस्थिती
नागपूर जिल्हा
नागपूर जिल्ह्यातून 45 पर्यटक काश्मीरमध्ये असल्याची माहिती आतापर्यंत समोर आली आहे. या सर्व 45 जणांसोबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शाखेचा संपर्क झाला आहे. यात तीन-चार लोकांना सोडून बहुतांशी लोकं श्रीनगर किंवा जवळपासच्या सुरक्षित ठिकाणी आहेत. यात रूपचंदानी कुटुंबीय (तीन जण ) काल घटनेच्या वेळेला पहलगामला होते. तेही आता श्रीनगरला आल्याची माहिती आहे. मात्र लोक सातत्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शाखेला संपर्क करत आहे. त्यामुळे 45 चा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तर तीन चार लोकं सोडून सर्व काश्मीरमध्ये असल्याची माहिती आहे.
अमरावती जिल्हा
जम्मू काश्मिरातील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या वेळी अमरावती मधील 11 जण हे सुद्धा तेथे होते. गोळीबार होण्याच्या काही मिनिटांपूर्वी हे सगळे जण तिथून निघाले होते. सध्या हे सगळे श्रीनगर मध्ये सुखरूप आहेत. श्रीनगरमध्ये हॉटेल डेव्हलिप लँड या ठिकाणी ते थांबलेले आहेत.
अमरावती येथील 11 नागरिक
1) मंगला बोडकेची फॅमिली
2) छाया देशमुख फॅमिली
3)निता उमेकर फॅमिली
4) चंदा लांडे फॅमिली
5)सारिका चौधरी फॅमिली
बुलढाणा जिल्हा
बुलढाणा येथील 5 नागरिक
निलेश जैन
पारस अरुण जैन
ऋषभ अरुण जैन
सौ श्वेता निलेश जैन
अनुष्का निलेश जैन
पहेलगाममध्ये हल्ला झाला तेव्हा हे पाच जण तेथील हॉटेल मधेच होते. ते बाहेर पडणार होते तेव्हाच हॉटेल मालकाने त्यांना थांबविले व सांगितल की बाहेर फायरिंग सुरु झाली आहे, बाहेर फिरायला पडू नका. हे पाच जण 18 तारखेला जम्मू काश्मीरमध्ये गेले होते. यामध्ये तीन पुरुष व दोन महिला आहेत. सध्या जैन परिवार पहेलगाम हॉटेल मध्येच आश्रयला आहे.
वाशिम जिल्हा
वाशिम जिल्ह्यातील 60 महिला नागरिक
वाशिमच्या मुक्तांगण योगा मंडळाच्या 60 महिला काश्मीर इथं सुरक्षित आहेत. सध्या महिलांसाठी मोफत योगाभ्यासाचे वर्ग चालवणाऱ्या वशिम येथील मुक्तांगण योगा मंडळाच्या 60 महिला सदस्यांचा काश्मीर येथे ग्रिष्मकालीन शिबिर सह सहलीसाठी रवाना झाल्या होत्या.
मात्र, दहशतवादी हल्ल्यापासून या सर्व 60 सदस्य सुरक्षित असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय.
भंडारा जिल्हा
भंडारा येथील 48 नागरिक जम्मू काश्मीर येथे पर्यटनासाठी गेले होते. दरम्यान हे 48 ही पर्यटक आता सुरक्षित आहेत. त्यातील भंडाऱ्याच्या खरबीनाका येथील आर्या आखरे, तिचा भाऊ आणि त्यांचं दहा जणांचं कुटुंब सुरक्षित आहे. सर्व पर्यटनासाठी गेलेले होते. मात्र, हल्ल्याच्या वेळी घटनास्थळ किंवा त्या परिसरात ते नव्हते. सर्व सुरक्षित असून ते सर्व ४८ पर्यटक महाराष्ट्रात परत येण्यासाठी प्रवासात आहेत, आपत्ती व्यवस्थापन विभागाने ही माहिती दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:























