Buldhana Unseasonal Rain : अवकाळी पावसाने बुलढाण्यातील एकफळ गावचा संपर्क तुटला; चिखल तुडवत रेल्वे रुळावरुन नागरिक, शाळकरी मुलांचा जीवघेणा प्रवास
Buldhana Unseasonal Rain : गेल्या चार दिवसांपासून सातत्याने या परिसरात कोसळत असलेल्या अवकाळी पावसामुळे बुलढाण्यातील एकफळ गावाचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांना चिखल तुडवत आणि रेल्वे रुळावरुन जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
Buldhana Unseasonal Rain : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील शेगावपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या एकफळ (Ekfal) गावातील नागरिकांना अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) जीवघेणा संघर्ष करावा लागत आहे. गेल्या चार दिवसांपासून सातत्याने या परिसरात कोसळत असलेल्या अवकाळी पावसामुळे एकफळ गावाचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात या गावातील नागरिकांना चिखल तुडवत आणि रेल्वे रुळावरुन जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
भर उन्हाळ्यात नागरिकांचे हाल
गावाला रस्ताच नसल्यामुळे आणि गेल्या चार दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे या गावात दुचाकीही जाण्यास तयार नाही. त्यामुळे गावातील आजारी रुग्णांना शाळकरी मुलांना आणि वयोवृद्ध नागरिकांना जीवघेणा संघर्ष करत रेल्वे रुळावरुन पाच किलोमीटर अंतर पार करावे लागत आहे. भर उन्हाळ्यात या नागरिकांना अवकाळी पावसामुळे या यातना सहन करावा लागत आहेत तर पावसाळ्यात या नागरिकांच्या हाल न विचारलेलेच बरे!
या गावाला रस्ताच नसल्यामुळे या गावातील 30 ते 35 तरुणांचे लग्न जुळत नसल्याचाही गावकरी सांगत आहेत. गावाला रस्ता नसल्यामुळे या गावात या तरुणांना कुणी मुलगीही देत नाही हे भीषण वास्तव अवकाळी पावसाने निमित्त समोर आलेलं आहे.
महाराष्ट्र दिनानिमित्त एकफळ गावाची कहाणी
आज महाराष्ट्र दिन. महाराष्ट्राला राज्याची स्थापना होऊन 63 वर्ष झाली, मात्र बुलढाण्यातील या एकफळ गावाला आजही येण्या-जाण्यासाठी रस्ताच नाही. या गावात कुणी लग्नासाठी मुलगीही देत नाही. या गावात 40 ते 50 तरुण मुलांची गावाला रस्ता नसल्याने लग्न रखडली आहेत. गरोदर महिला असो की वृद्ध किंवा कुणी आजारी पडलं तर मोठंच संकट! आजारी व्यक्तीला किंवा महिलेला. खाटेवर टाकून रेल्वे रुळावरुन चार किलोमीटर उचलून न्यावं लागतं. शाळकरी मुलं तर अक्षरशः रेल्वे रुळावरुन चार किमीचा पायदळ प्रवास करत शाळा गाठतात. मात्र राजकारणी असोत की अधिकारी या गावाला देतात ते फक्त आश्वासन, तेही गेली 63 वर्ष. यावर्षी अवकाळीचं संकट मोठं आहे. गेल्या चार दिवसापासून भर उन्हाळ्यात आणि अवकाळी पावसामुळे या गावात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने गावकरी उद्विग्न झाले आहेत.
बुलढाण्यात आज धुक्याची चादर
चार दिवस सातत्याने बरसत असलेल्या अवकाळी पावसानंतर आज (1 मे) सकाळी बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात दाट धुक्याची चादर बघायला मिळाली. दाट धुक्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील वाहतूकही मंदावली आहे. मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी अशी दाट धुक्याची चादर बघायला मिळाल्याने नागरिकही कुतूहलाने धुक्याचा आनंद घेत आहेत.
























