Suresh Dhas : वाल्मिक कराडसोबत पोलीस होते, आका म्हणाला असेल मी फरार होतोय आणि तुम्ही थांबा; सुरेश धसांनी आणखी एक बॉम्ब टाकला!
Suresh Dhas on Walmik Karad : भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून जोरदार हल्लाबोल केलाय.

Sarpanch Santosh Deshmukh Case : बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणाने राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. आज भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) आणि प्रकाश सोळंखे (Prakash Solankhe) यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणावरून वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर हल्लाबोल केला. वाल्मिक कराडसोबत पोलीस होते, आका म्हणाला असेल मी फरार होतोय आणि तुम्ही थांबा, असे सुरेश धस यांनी म्हटले आहे.
सुरेश धस म्हणाले की, आका पकडला गेला पाहिजे. आकावर खंडणीचा गुन्हा आहे. लवकर जामीन मिळतो त्याने यावं अटक व्हावी आणि जामीन मिळून जातो. याचा अर्थ त्यांचा सहभाग संतोष देशमुख प्रकरणात आहे. वाल्मिक कराड यांच्या सोबत पोलीस तिथे होते. घटना घडली त्यावेळीही पोलीस होते. याचा अर्थ आका म्हणाले असतील की मी फरार होतोय आणि तुम्ही थांबा. पोलिसांना सांगून ते निघून गेले असतील, असा आरोप त्यांनी केलाय. तसेच त्या पोलिसांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी देखील सुरेश धस यांनी केली आहे.
माझे काय संबंध, ते मी भाषणात सांगणार
सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांना लक्ष्य करीत बीडमधील बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेला त्यांनाच जबाबदार धरले आहे. तसेच वाल्मिक कराड यांचे थेट नाव घेऊन देशमुख हत्या प्रकरणात त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. तर धनंजय मुंडे यांनी पलटवार करून धस यांचेही कराड यांच्याबरोबर संबंध असल्याचे म्हटले आहे. याबाबत विचारले असता सुरेश धस म्हणाले की, माझे काय संबंध आहेत ते मी भाषणात सांगणार, आताच सांगणार नाही. कोणत्याही यंत्रणावर दबाव राहिले नाही. कोणाच्या बापासाठी कोणी मिशी काढत नाही अशीच म्हण होती. पण आता मिशी सोडा, कोणी दाढीही करत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
सरकारवर विश्वास पण दिरंगाई का होतेय?
प्रकाश सोळंखे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलंय की, कितीही मोठा कार्यकर्ता गुंतलेला असेल तरी गय करणार नाही. पण दुर्दैवाने आरोपी अजून अटकेत नाही. जर आरोपी अटकेत असते तर आतापर्यंत तपास संपत आला असता. त्यामुळे बीडच्या लोकांचा संताप व्यक्त होत आहे. आज मोर्चा काढतोय पण जरं न्याय नाही मिळाला तर आंदोलनाची पुढची दिशा ठरवू. सरकारवर विश्वास आहे पण दिरंगाई का होतेय? आरोपीला अटक होत नाही याची मनात खंत असल्याचे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
