Avinash Jadhav: प्रताप सरनाईकांना हुसकावून लावलं, अविनाश जाधव म्हणाले, जे झालं ते योग्य नाही!
Avinash Jadhav: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या बाबत जे झालं ते योग्य नाही. कारण ज्यावेळी ते मोर्च्यात आले त्यावेळी ते मराठी माणूस म्हणून आले होते. अशी प्रतिक्रिया मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिली

MNS Marathi Morcha in Mira bhayandar: राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या बाबत जे झालं ते योग्य नाही. कारण ज्यावेळी ते मोर्च्यात आले त्यावेळी ते मराठी माणूस म्हणून आले होते. गेल्या दोन दिवसापासून त्यांचे वक्तव्य मला आवडले नव्हते. मात्र आज सकाळपासून ते मराठी माणसाला मोर्चा काढू का दिला नाही? यावर सातत्याने बोलत होते. त्यामुळे जर एखादी मराठी माणूस मराठीसाठी मोर्चात येत असेल तर त्याला प्रेमाने सोबत घेतलं पाहिजे. कारण एका टीव्हीवर मी त्यांचा बाईट ऐकला. ते म्हणाले की मी माझं मंत्रिपद आणि आमदार पद बाजूला ठेवून मोर्चात सहभागी होत आहे.
त्यामुळे आम्ही प्रत्येक मराठी माणसाला मराठी माणूस म्हणूनच बघतो. मुळात आता एकत्र राहणे गरजेचे आहे. आम्हाला आता आपापसात वाद करायचे नाहीत. जेव्हा इथल्या सर्व संघटना पक्ष मराठीसाठी एकत्र आले तर त्यांनाही मराठी म्हणून एकत्र घ्यायला हवं होतं. अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी दिली आहे. मीरा-भाईंदर येथील मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या मोर्च्यात मंत्री प्रताप सरनाईक यांना दिलेल्या वागणुकीबद्दल ते बोलत होते.
पोलिसांचे आभार, असच सरकारचं ऐकत रहा, मराठी माणसाची ताकद वाढवत राहा
मीरा-भाईंदर मधील त्या एका व्यापाराच्या व्हिडिओमुळे हा सर्व वाद चिघळला. त्यामुळे या सर्व प्रकरणाला तो व्यक्तीच जबाबदार आहे. त्या माणसाला मीरा-भाईंदर मधला मराठी टक्का त्याला त्याची जागा दाखवेल, हे नक्की असेही अविनाश जाधव म्हणाले. त्यामुळे येथे व्यापार करायला आलेल्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये, या महाराष्ट्राचा इतिहास फार मोठा आहे. खऱ्या अर्थाने पोलिसांचे आभार मानले पाहिजे कारण त्यांच्यामुळे एवढी मोठी ताकद उभी राहिली. कायम असेच विरोधात जात राहा सरकारचं ऐकत रहा आणि अशीच मराठी माणसाची ताकद कायम एकजूट होत राहू दे असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वक्तव्य मी ऐकली. या सर्व प्रकरणात जे कोणी अधिकारी त्यांना दोषी वाटत असतील की त्यांनी चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी. अशी आमची मागणी नाही मात्र त्यांना जरासं वाटत असेल की पोलिसांनी काहीतरी चुकीचं केला आहे तर त्यांनी खुशाल चौकशी करावी. असेही अविनाश जाधव म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
























