Avinash Jadhav MNS Morcha Mira Bhayandar: मीरा-भाईंदरमधील मराठी आंदोलन तापलं, अखेर पोलिसांनी अविनाश जाधवांना सोडलं, बाहेर येताच म्हणाले....
MNS Morcha in Mira Bhayandar: मिरा भाईंदरमध्ये मराठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, पोलिसांनी कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत या मोर्चाला परवानगी नाकारली होती.

MNS Morcha in Mira Bhayandar: मिरा भाईंदरमध्ये मंगळवारी काढण्यात आलेल्या मराठा मोर्चावरुन राजकारण चांगलेच तापताना दिसले. या मोर्चाला सुरुवातीला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र, मराठी आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहिल्यानंतर साधारण दोन-तीन तासांनी पोलिसांनी मोर्चाला अधिकृत परवानगी दिली नसली तरी आंदोलकांना बालाजी हॉटेल चौक ते मीरारोड रेल्वे स्थानकापर्यंत मोर्चा काढण्याची परवानगी दिली. त्यामुळे मीरा भाईंदरमधील (Mira Bhayandar News) हा मराठी मोर्चा काहीप्रमाणात यशस्वी ठरला. मात्र, हा मोर्चा यशस्वी होऊ नये म्हणून कालपासून पोलिसांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु होती. पोलिसांनी मनसे, ठाकरे गट आणि मराठी एकीकरण समितीच्या अनेक कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावल्या होत्या. मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांना पोलिसांनी मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता ताब्यात घेतले होते. त्यांना सुरुवातीला काशिमीरा आणि नंतर पालघर येथील पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. अखेर दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांना सोडण्यात आले. यानंतर अविनाश जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
अविनाश जाधव यांनी मीरा भाईंदरमध्ये मराठी माणसाने दाखवलेल्या एकीबद्दल आनंद व्यक्त केला. मला ताब्यात घेण्यापेक्षा आजचा मोर्चा होणे महत्त्वाचे होते. आम्ही नसतानाही लोकं तिकडे रस्त्यावर उतरली होती. त्यांनी मराठीचा माज काय असतो, हे दाखवून दिले. ज्या लोकांनी या सगळ्या गोष्ट केल्या आहेत, त्यांना आम्ही सोडणार नाही. परंतु, मला एका गोष्टीचा प्रचंड आनंद आहे की, आज मराठी माणूस एकजूट झाला. मला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मीरा भाईंदर, वसई आणि विरारमधील मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली नसती आणि आमचे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मोर्चाला असते तर हा मोर्चा प्रचंड झाला असता. हा मोर्चा होणे खूप गरजेचे होते. महाराष्ट्राच्याविरोधात 100 -200 लोक मोर्चा काढत असतील तर त्याला पाच-पंचवीस हजारांच्याच गर्दीनेच उत्तर देणे गरजेचे होते. यापुढे कोणीही अशाप्रकारे महाराष्ट्र आणि मराठीविरोधात मोर्चा काढायची हिंमत करणार नाही, असे अविनाश जाधव यांनी म्हटले.
आणखी वाचा
मीरा भाईंदरमध्ये बंदी झुगारली, मराठी मोर्चा ठरलेल्या मार्गानेच निघाला, धरपकडीनंतर मनसैनिक आक्रमक!
मोर्चाला परवानगी नाकारलेय, कलम 144 लागू, एकत्र जमू नका; मीरा-भाईंदरमध्ये पोलिसांची फायनल वॉर्निंग
























