>> संतोष आंधळे


मेंदूमृत अवयवदान म्हणजे जीवनदान. गेल्या काही वर्षात अवयवदान मोहिमेने महाराष्ट्रात चांगलाच जोर धरला होता त्याकरिता गेल्यावर्षीच केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रायलतर्फे अवयवदानामध्ये महाराष्ट्र राज्याला ‘उत्कृष्ट राज्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 2019 साली सुमारे 160 मेंदूमृत अवयवदान पार पडले होते. त्यामुळे 445 पेक्षा अधिक रुग्णांना नवीन जीवन मिळाले होते. जो आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा होता. राज्याचे देशपातळीवर कौतुक करण्यात आले होते. यावर्षी म्हणजे 2020 मध्ये हा आकडा वाढण्याची शक्यता जास्त असतानाच नेमका यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव अख्या देशात झाला आणि या सामाजिक मोहिमेला एक प्रकारची खीळ बसली. मेंदूमृत अवयवदानामुळे अनेकांना नवीन आयुष्य मिळण्यास मदत होत असते. मार्च ते जुलै या महिन्यात केवळ 22 अवयदान राज्यात पार पडले होते, गेल्यावर्षीच्या तुलनेनं हा आकडा खूपच कमी आहे. 2020 सालातील अर्धे वर्ष संपले आहे, थोड्या प्रमाणात ही मोहीम सुरु झाली आहे. शेकडोच्या संख्येने राज्यात रुग्ण अवयव मिळण्यासाठी प्रतीक्षा यादीवर नाव नोंद करून अवयव मिळण्याची वाट बघत आहे. त्यांच्या आयुष्यात नवीन बदल घडवायचा असेल, किंवा आयुष्य सुखकर करायचे असेल तर या अवयवदान मोहिमेला बळ मिळणे गरजेचे आहे. प्रतीक्षा यादीवरील प्रत्येक रुग्ण असह्य वेदना सहन करत एक-एक दिवस व्यथित करत आहेत, त्या रुग्णाच्या वेदना आणि त्यांची परिस्थिती शब्दात मांडता येणार नाही.


2020 सालात, जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात जे काही मेंदूमृत अवयवदान झालेत त्यामधून 86 रुग्णांना नवीन आयुष्य मिळाले होते. त्यानंतर कोरोनाचा काळ सुरु झाला. त्यानंतर एप्रिल ते जुलै या चार महिन्यात जे काही मेंदूमृत अवयवदान झालेत त्यामधून 21 रुग्णांना नवीन आयुष्य मिळाले आहेत. यावरून या काळात मेंदूमृत अवयवदान किती झाले आहेत याची प्रचिती येते. ही माहिती राज्य अवयव आणि ऊती प्रत्यारोपण संस्थेकडून प्राप्त झाली आहे, राज्यातील अवयवदान आणि त्या संदर्भातील सर्व गोष्टीवर देखरेख ठेवणारी म्ह्णून संस्था काम करत असते. त्याचप्रमाणे विशेष म्हणजे, लॉकडाउनच्या या काळात 18 जुलैला एका मेंदूमृत 39 वर्षीय महिलेने हृदय, यकृत, दोन मूत्रपिंडे दान केलीत. त्यामुळे कोरोनकाळातील हे पहिले हृदय दान ठरले आहे. ही शस्त्रक्रिया नवी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात पार पडली.


आपल्या देशात आणि राज्यात मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा, 1994 अंतर्गत अवयव प्रत्यारोपण केले जाते. कालांतराने या कायद्यात अधिक बदल करून 2014 साली काही सुधारणा करण्यात आल्या. अवयवदानाबद्दल यापूर्वी भरपूर लिहिले गेले आहे. या बाबत थोडक्यात या लेखातून माहिती देण्याचा प्रयत्न करूया. आपल्याकडे मेंदूमृत अवयवदानामध्ये ह्रदय, यकृत, मूत्रपिंड, स्वादुपिंड, त्वचा, डोळे, फुफ्फुसे आणि आतडे देखील दान केले जाते. या यामध्ये त्वचेचा वापर गंभीररित्या भाजलेल्या व्यक्तीमध्ये करता येतो. अन्य अवयवाचे त्या रुग्णाच्या गरजेनुसार त्या रुग्णांमध्ये प्रत्यारोपण करता येते. ज्या रुग्णांचा एखादा अवयव कायमचा निकामी होतो आणि औषधोपचारानेही बरा होत नाही. त्यावेळी त्याला अवयव प्रत्यारोपण करण्याशिवाय पर्याय नसतो. त्यावेळी त्या रुग्णाच्याच नात्यातील निरोगी व्यक्तीचा अवयव घेऊन रुग्णाच्या शरीरात त्या अवयवाचे प्रत्यारोपण केले जाते. त्याकरिता रक्तगट मॅचिंग होणे गरजेचे असते. जिवंत व्यक्ती जवळच्या नातेवाईकाला अशा पद्धतीने अवयव देऊ शकतात. फक्त मूत्रपिंड आणि यकृत याच अवयवाचे जिवंतपणी दान करता येते. या व्यतिरिक्त जे अवयव दान करता येते त्याला मेंदूमृत अवयवदान असे म्हणतात.


सगळ्यात जास्त अवयव मेंदूमृत अवयवदाना मार्फत केले जातात. एक मेंदूमृत व्यक्ती 7-8 व्यक्तींना नवीन आयुष्य देते. मेंदूमृत प्रक्रियेत रुग्णाचा मेंदू मृत स्वरूपात असून बाकीचे सर्व अवयव व्हेंटिलेटरच्या साहाय्याने कार्यरत असतात. रस्त्यांवरील अपघात, मेंदूत अतिरक्तस्राव आणि अन्य कोणत्या कारणांमुळे मेंदूचे कार्य थांबते आणि तो रुग्ण व्हेंटिलेटर असेल तर त्याच्या नातेवाईकाच्या संमतीने त्या व्यक्तीचे अवयवदान करता येते. या करीत रुग्णालयातील समुपदेशक रुग्णाच्या संबंधित नातेवाईकांशी बोलून अवयवदानासंदर्भातील सविस्तर माहिती देतो. त्या रुग्णाच्या नातेवाईकाने एकदा का समंती दिली कि मग अवयवदानाची प्रक्रियेस सुरुवात होते.


मेंदूमृत झालेल्या व्यक्तीचा जिवंत राहूनही उपयोग नसतो. त्यांचा एकदा का व्हेंटिलेटर काढला तर ती व्यक्ती काही दिवसाने मृत होते. जर एकदा का व्यक्ती मृत झाली तर त्या व्यक्तीचे कोणतेही अवयव वापरता येत नाही. त्यानंतर फार-फार तर त्वचा आणि डोळ्याचा वापर होऊ शकतो. मात्र इतर कोणतेही अवयव वापरता येत नाही. जर ही प्रक्रिया लवकर केली तर प्रत्यारोपण यशस्वी होण्याचे प्रमाण अधिक असते .आपल्या मृत्यूनंतरही हे सुंदर जग आपण नेत्रदान करून पुन्हा पाहू शकतो. तसेच इतर अवयव दान केल्यानेही आपण वेगळ्या रुपात जिवंत राहू शकतो. गेल्या काही वर्षात अशा पद्धतीने अवयव दान केल्यामुळे आज हजारो व्यक्ती त्यांचे आयुष्य व्यवस्थिपणे जगत आहेत. आपल्या राज्यात बहुतांश सर्वच अवयव प्रत्यारोपण केले जातात तसे निष्णात डॉक्टर आपल्या राज्यात असून त्याकरिता अवश्य असणारी अत्याधुनिक साधनसामुग्री असलेली रुग्णालये राज्यात आहेत, आणि गेली काही वर्षे अत्यंत यशस्वीपणे अवयव प्रत्यारोपण करत आहेत. सध्या भारतात या अवयवांव्यतिरिक्त हाताचे प्रत्यारोपणास सुरुवात झाली आहे. त्यामध्ये सध्या हळू हळू प्रगती सुरु आहे.


आपल्याकडे राज्यात अवयवांच्या नियमनाकरिता मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर अशा चार विभागीय प्रत्यारोपण समन्वय समिती कार्यरत आहेत. या समिती मार्फत ज्या रुग्णांना अवयव पाहिजे आहे त्यांचे नोंदणीकरण केले जाते. ही समिती मेंदूमृत व्यक्तीचे अवयव आणि गरजू रुग्णांमध्ये समन्वयाचे काम पाहत असते. गेल्या काही वर्षात या समित्या उत्तमरीत्या आपले काम करीत आहेत. तसेच काही रूग्णांच्या बाबतीत वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाची परवानगी आवश्यक असते, ती प्रकरणे त्यांच्या समंतीने पुढे जातात. या व्यतिरिक्त आपल्या राज्यात काही वर्षांपूर्वीच अवयव दाना संदर्भात राज्यस्तरावर समन्वय साधणारी, अवयदान आणि त्या संदर्भातील कामावर देखरेख करणारी राज्य अवयव आणि ऊती प्रत्यारोपण संस्थेची केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रायलतर्फे स्थापना करण्यात आली आहे.


राज्य अवयव आणि ऊती प्रत्यारोपण संस्थेच्या माहितीनुसार, सध्या राज्यात अवयवांची गरज असणारी रुग्णाची प्रतीक्षायादी खूप मोठी आहे मूत्रपिंडासाठी 5514, यकृतासाठी 1097, हृदयासाठी 74 आणि फुफ्फुसासाठी 16 रुग्ण प्रतीक्षेत आहेत. यापैकी किडनी साठी प्रतीक्षेत असणारे रुग्ण डायलेसीसवर आणखी काही महिने जगू शकतात. मात्र हृदय, यकृत आणि फुफ्फुस यासारखे अवयव असणाऱ्या रुग्णाची परिस्थिती ही बिकट असते. कारण त्यांना अवयव प्रत्यारोपण करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. तसेच या गोष्टीची गंभीर दखल घेऊन राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने या काळात प्रत्यारोपण करण्यासाठी मानक कार्यप्रणाली (एस ओ पी ) जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार जर एखादा रुग्ण इतका गंभीर आहे की जर त्याच्यावर अवयव प्रत्यारोपण नाही केले तर तो सहा महिन्यात दगावण्याची शक्यता 50 टक्क्यापेक्षा अधिक आहे अशा रुग्णांना प्रत्यारोपणाचा फायदा मिळाला पाहिजे. तसेच जे किडनी मिळण्यासाठी जे अतिगंभीर रुग्ण आहेत त्यांना 'अधिक प्राधन्य देण्यात यावे' अशा वर्गात त्यांचा समावेश करावा. तसेच जर मेंदूमृत अवयवदाना मार्फत किडनी हा अवयव मिळाला असेल आणि प्राधान्याने लागणाऱ्या वर्गवारीत किडनी घेणारा रुग्ण नसेल तर ती किडनी प्रतीक्षा यादी प्रमाणे प्रतीक्षेत असणाऱ्या रुग्णास देण्यात यावी, यामुळे मिळालेला अवयव वाया जाणार नाही.


याप्रकरणी मूत्रपिंडरोग तज्ञ आणि अध्यक्ष, विभागीय प्रत्यारोपण समन्वय समिती, औरंगाबाद, डॉ. सुधीर कुलकर्णी, असे सांगतात की, " हा काळ खरोखरच कठीण आहे. या कोरोना काळात आमच्या औरंगाबाद विभागात गेल्या पाच महिन्यात एकही मेंदूमृत अवयवदान झालेले नाही आणि प्रत्यारोपण ही झालेले नाही. कारण आमच्या विभागातील ज्या रुग्णलयात प्रत्यारोपण होते ती सर्व मोठी रुग्णलये कोरोनाची उपचार करणारी रुग्णालये म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी अशा मोठ्या शस्त्रक्रिया करणे धोकादायक ठरू शकतात. तसेच शासनाने ज्या पद्धतीची मार्गदर्शक तत्वे आखून दिली आहेत त्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे उगाच धोका का पत्करायचा. विशेष म्हणजे अनेक रुग्ण मोठ्या रुग्णालयात या काळात अशा उपचाराकरिता यायला घाबरत आहेत. तसेच अनेक ठिकाणी जिल्हाबंदी आहे. कोरोनाचा जोर ओसरला की पुन्हा या प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया चालू होतील. राज्यातील काही ठिकाणी शासनाच्या नियमाच्या अधीन राहून काही शस्त्रक्रिया सुरु आहेत. "


अवयव दान ही काळाची गरज असून अनेक गरजू रुग्ण आपल्याला लवकर अवयव मिळावा म्हणून हताश होऊन वाट पाहत असतात. त्यांच्याकडे हतबलतेपलीकडे काहीच नाही. या प्रतीक्षायादीवरील रुग्णांची संख्या कमी असली तर त्या रुग्णाच्या नातेवाईकाच्या अनेक व्यथा आहेत. त्यामुळे या प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया आणि त्याच जोडीला मेंदूमृत अवयवदानाबाबत जनजागृती करून लवकरच या स्वरूपाचे अवयव दान सुरु होणे ही सध्याची निकड आहे. ह्या रुग्णांबद्दल फारसे आपल्याकडे बोलले जात नाही. मात्र त्यांची परिस्थिती ही खूपच वाईट असते, हे रुग्ण प्रत्येक घटका मोजत त्यांचे आयुष्य काढत असतात. या अशा रुग्णांच्या प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियाकरिता वेगळी काही व्यवस्था उभारली जाऊ शकते का याचा विचार वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी करायला हवा. तसेच शासन यामध्ये काही करू शकत असेल तर त्यांनी तसे प्रयत्न करायला हवेत.


संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग