एक्स्प्लोर

BLOG: अकोल्यातील प्रकाश आंबेडकर आकर्षण धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचा 38 वर्षांचा इतिहास

अकोल्यात गेल्या 38 वर्षांपासून धम्मचक्र प्रवर्तन दिन  सोहळा असतो. गेल्या 38 वर्षांपासून दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी अकोला क्रिकेट क्लब मैदानावर सोहळा होतो. पण गेल्या 38 वर्षांपासून या सोहळ्याचे मुख्य आकर्षण आणि मुख्य वक्ते असतात प्रकाश आंबेडकर. शिवसेनेत 'शिवतीर्था'वरच्या दसरा मेळाव्याचं जे स्थान आहे तेच प्रकाश आंबेडकरांच्या राजकीय प्रवासात या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचं स्थान आहे. प्रकाश आंबेडकरांच्या वर्षभरातल्या राजकीय वाटचालीची बीजं आणि मार्ग या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मेळाव्यातील भाषणावरून ठरवला जात असतो. या मेळाव्याचा इतिहास आणि प्रकाश आंबेडकरांची येथून ठरत असलेली राजकीय भूमिका या संपूर्ण इतिहासाचा मागोवा घेणारा हा 'विशेष ब्लॉग'... 

    गेली अनेक वर्षे अकोला जिल्ह्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा अखंडपणे सुरु आहे. एकच नेता, विशाल मिरवणूक, प्रचंड प्रतिसाद,ओसंडून वाहणारा उत्साह, आखाडे, लेझीम पथके, आकर्षक देखावे,विविध झाक्या, हजारोचा स्वंयशिस्त समूह, कमालीचे आज्ञाधारी कार्यकर्ते, वर्षागणीक वाढत जाणारी गर्दी, भारतीय बौद्ध महासभेचे शिस्तबद्ध आयोजन आणि महाराष्ट्राला राजकीय सामाजिक दिशा देणारी जाहीर सभा असा दरवर्षीचा शिरस्ता…पूर्वीचा भारिप बहुजन महासंघ (आताची वंचित बहुजन आघाडी) आणि भारतीय बौद्ध महासभेच्या संयुक्त परिश्रमाने दरवर्षी आयोजन असते. ॲड. बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर 'अकोला पॅटर्न' गतिमान करण्यात ह्या 'विशाल मिरवणूक व जाहीर सभांचा' सिंहाचा वाटा राहिला आहे. तीन पिढ्यातील अनेक बदल अकोला जिल्ह्याने या निमित्ताने पाहिलेत. परंतु, अगदी पहिल्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यापासूनच आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेले ॲड. बाळासाहेब आंबेडकरच या वर्षी साजरा होणा-या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचे आकर्षण आहेत. सलग 38 वर्षे असाच पायंडा आहे. महाराष्ट्राला आकर्षण असलेला हा सोहळ्याच्या आयोजनाचा इतिहास असाच उल्लेखनीय आहे. जुन्या जाणत्या कार्यकर्ते पदाधिकारी ह्यांनी  दूरदृष्टी ठेवून सुरुवात केलेल्या छोटेखानी कार्यक्रमाने पहाता पहाता भव्य स्वरूप प्राप्त केले आहे.

   तसा अकोला जिल्हा चळवळीचा बालेकिल्लाच होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा भारताच्या सामाजिक राजकिय क्षितिजावर नेतृत्व उदय झाल्यानंतर त्यांच्या पाठीशी हा जिल्हा प्रचंड ताकदीने उभा राहिला. आंबेडकरी चळवळीतील कलापथके, गीतकार, शाहीर, जलसे, कलापथके, दंडारी, भजनी मंडळांनी जागृतीचा वणवा सतत पेटत ठेवला होता. शेड्यूल कास्ट फेडरेशनचे वऱ्हाड प्रांतिकचे 9 व 10 डिसेंबर 1945 ला बाबासाहेबांच्या उपस्थितीत अकोल्यात भरले होते. भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, 'शेकाफे'चे कार्य मोठ्या गतीने सुरु होते. भैय्यासाहेब आंबेडकरांनी देखील पाच वेळा ह्या जिल्ह्याचा दौरा केला होता. भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाचा विशेष दबदबा होता. तसेच रिपब्लिकन पक्षाच्या प्रेसिडीयमची पहिली बैठक देखील 28, 29 व 30 डिसेंबर 1957 साली अकोल्यातच संपन्न झाली होती. बाबासाहेबांच्या बौद्ध धम्म स्विकाराच्या आवाहनानुसार 100 % बौद्ध धम्म स्वीकारणारा जिल्हा अकोलाच आहे. 1901 सालच्या जनगणनेत एकही बौद्ध धर्मीयांची नोंद नसलेल्या अकोला (वाशीम संयुक्त) जिल्ह्यात 1956 ला धम्म स्वीकाराल्यानंतर 1961 च्या जनगणनेत दोन लाख बेचाळीस हजार चारशे चौसष्ट बौद्ध धर्मीयांची संख्या नोंदविण्यात आली होती. एवढी प्रचंड आंबेडकरी निष्ठा असलेला जिल्हा म्हणून अकोल्याचा लौकिक होता. त्यामुळे हे तरूण बाळासाहेब पहिल्याच दिवशी नेते म्हणून स्विकारले गेले. भारतीय बौद्ध महासभेचे कार्य व भैय्यासाहेब आंबेडकर यांच्यानंतर महाउपासिका मीराताई आंबेडकर व बाळासाहेबांचा राबता ह्या जिल्ह्यात वाढविण्यात तत्कालीन पदाधिकारी कार्यकर्ते यशस्वी झाले.

अशी झाली सुरुवात…

14 ऑगस्ट 1980 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे नातू ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांचे अकोल्यात प्रथम आगमन झालेले. 1980  पासून अकोल्यात बाळासाहेबांचा राबता होता. सभा आणि कार्यक्रमांना सुरुवात झाली होती. धम्मदीक्षेनंतर अकोल्यात धम्म चळवळ प्रभावी होती.त्याकाळापासून भारतीय बौद्ध महासभा जिल्ह्यात कार्यरत होतीच. बाळासाहेबांच्या आगमनाने राजकीय बांधणी होऊन 1984 सालची लोकसभा निवडणूक लढण्यात आली होती.31 ऑक्टोबर 1984 रोजी इंदिरा गांधींची हत्या झाली होती. परिणामी 1984 च्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधींच्या हत्येमुळे काँग्रेसबाबत सहानुभूतीची लाट होती. इंदिरा गांधींच्या बलिदानावर मते मागितली गेली. दरम्यान, 1980 मध्ये जनसंघ हा भारतीय जनता पक्ष झाला होता.भाजपाने अकोल्यात खामगांव विधानसभा मतदार संघात दोन वेळ आमदार राहिलेल्या पांडुरंग पुंडकर ह्यांना उमेदवारी दिली होती. पक्षनिधी साठी 'एक रूपया, एक मत' अशी भावनिक मागणी त्यावेळी पदाधिकारी करीत होते.लोकवर्गणीतून ही निवडणूक लढविण्यात येत होती. त्याला उस्फुर्त प्रतिसाद होता.तराजू ह्या निशाणीवर बाळासाहेबांनी निवडणूक लढविली होती.स्वबळावर लढविलेल्या निवडणुकीत बाळासाहेबांना 1,75,664 इतकी मते मिळाली होती.इंदिरा काँग्रेसचे मधुसूदन वैराळे ह्यांनी  1,88,874 मते घेत केवळ 13,210 मतांनी विजय मिळविला होता.भाजपच्या पांडुरंग पुंडकर ह्यांना 1,48,909 मते प्राप्त होऊन ते तिस-या क्रमांकावर राहिले होते. 7,36,060 मतदारांपैकी 5,24,199 मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला होता.अर्थात 71% मतदान झालेले होते.त्यापैकी इंदिरा काँग्रेसचे मधुसूदन वैराळे ह्यांना 34.86% आणि बाळासाहेबांना 32.17% मते मिळाली होती.भाजपच्या पांडुरंग पुंडकर ह्यांना 29.02% मते होती.एकूण चौदा उमेदवार निवडणुकीला उभे होते लढत मात्र तिरंगी झाली.पहिल्याच निवडणुकीत मिळालेल्या 1,65,664 मतांनी आंबेडकरी कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळाली. 

धम्मचक्र प्रवर्तन सोहळा सुरु करण्याची कल्पना त्या काळच्या जुन्या व दूरदर्शी कार्यकर्त्यांना रेल्वे स्टेशनवर चर्चा करताना सहज सुचली होती. एका कार्यकर्मानंतर बाळासाहेब आंबेडकर ह्यांना शेगांव येथे रेल्वे स्टेशनवर सोडून देताना, ह्या कल्पनेचा जन्म झाला होता. खामगांव येथे बाळासाहेबांची सभा होती. शिरस्त्याप्रमाणे सभा संपली की, त्यांना रेल्वे स्टेशनवर सोडले जायचे. खामगांवची सभा संपल्यावर शेगांव रेल्वे स्टेशनवर सोडायला अकोल्यातील कार्यकर्ते लंकेश्वर गुरुजी, गुणवंतराव पाटील, पी. आर. महाजन, बी.आर.सिरसाट व श्रीकृष्ण वानखडे गेले होते. सातत्याने नवनवीन प्रयोग करून लोकसंग्रह करण्याचा त्या काळच्या कार्यकर्त्याचा हातखंडा होता. संघटना बांधणीबाबत चर्चा सुरु असताना धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्या बाबत चर्चा झाली. दीक्षाभूमीवर बाबासाहेबांच्या कुटुंबाला स्थान नसते ह्याबाबत संताप व्यक्त केला गेला. तसेच नागपूरला मोठ्या संख्येने जाणा-या  बौद्ध अनुयायी नागपूरवरून परततात. प्रचंड गर्दी तसेच रात्री अपरात्री वाशीम मराठवाडा बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील विविध गावांत परतण्याची सोय नसल्याने त्यांना रात्र रेल्वे स्टेशनवर काढावी लागते. त्याकाळी मराठवाड्यात जाण्याचा मार्ग हा रेल्वे आणि बसेस असल्याने त्यांना अकोल्याला आल्याशिवाय पर्याय नव्हता. तसेच अकोला जिल्ह्यात रात्रीच्या हॉलटिंग गाड्या गेल्या की गावी जाण्याची सोय नसे. रात्रभर आपल्या बायका मुले, मुली आई वडील ह्यांच्यासह गैरसोय सहन करतात.आपण त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे ह्यावर एकमत झाले. नागपूरच्या धर्तीवर अकोला जिल्ह्यात धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम घेण्यासाठी चर्चा झाली. विचारविनिमय करून हा सोहळा आयोजनाचा निर्धार करून कार्यकर्ते परतले. लागलीच त्याची अंमलबजावणी झाली. अशोक वाटिका येथे बैठकीत सर्वांनी हे आयोजन मान्य केले. नियोजनाची चर्चा झाली आणि पहिला कार्यक्रम हा अशोक वाटीकेसमोर असलेल्या पोस्ट ऑफिसमागच्या खुल्या मैदानावर पार पडला. बौद्ध महासभेनं घेतलेला हा कार्यक्रम अगदी साध्या पद्धतीने स्थानिक नेत्यांच्या आणि पदाधिकार्यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाला बाबासाहेबांच्या स्नुषा आणि प्रकाश आंबेडकरांच्या मातोश्री मिराताई आंबेडकरांसह प्रकाश आंबेडकरांची प्रमुख हजेरी होती. अकोला जिल्ह्यात झालेला प्रचार आणि नागपुरातील परतणारी गर्दीने सभेने विक्रम प्रस्थापित झाला. नागपूरनंतर संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होणारा हा भव्य दिव्य सोहळा अकोला जिल्हयाचे वैशिष्टय बनले. पुढे वसंत देसाई स्टेडीयमवर अनेक वर्षे हा कार्यक्रम व्हायचा. त्यानंतर आता गेली 10 वर्षांपेक्षा अधिक काळापासून अकोला क्रिकेट क्लब मैदानावर हा सोहळा संपन्न होतो आहे.


BLOG: अकोल्यातील प्रकाश आंबेडकर आकर्षण धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचा 38 वर्षांचा इतिहास

मिरवणूक असते सोहळ्याचे प्रमुख आकर्षण 

दरवर्षी अकोला रेल्वे स्टेशन पुलापासून दुपारी मिरवणूक सुरु होते. सर्वात पुढे अश्वावर धम्मध्वज घेऊन स्वार असतात.त्यामागे श्रामणेर संघ, त्याचे भोवती समता सैनिक दल आणि भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी असतात. त्यांच्या पाठोपाठ बाळासाहेब आंबेडकर यांच्याकरीता सजविलेला धम्मरथ असतो. त्यावर बाळासाहेबांसोबत जिल्हा आणि राज्यातील पदाधिकारी आणि सत्तेतील प्रमुख पदाधिकारी विराजमान असतात. रेल्वे स्टेशन चौकापासून शिवाजी कॉलेज, टिळक मार्ग, सिटी कोतवाली पोलीस स्टेशन चौक आणि तेथून गांधी मार्गावरून नवीन बस स्थानक पासून अकोला क्रिकेट क्लब येथे साहेबांच्या धम्मरथाचे आगमन होते.धम्मरथामागे जिल्हातील ग्रामीण आणि शहरी भागातील आखाडे, लेझीम पथके, आकर्षक देखावे,विविध झाक्या, हजारोचा स्वंयशिस्त समूह कार्यकर्ते ह्यांची प्रचंड गर्दी असते. शहरातील विविध ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर ह्यांचे स्वागत केले जाते.रस्त्याच्या कडेला देखावे आणि जनतेच्या सोयी साठी मोफत पाणी, जेवण आणि आरोग्य सुविधा ह्यांची सुविधा असते. जेथे सभा होणार असते त्या मैदानावर देखील फुले शाहू आंबेडकरी चळवळ आणि धम्मावरील पुस्तकांचे सर्वाधिक स्टॉल असतात. ज्यात धम्म ध्वजापासून, मुर्त्या व इतर साहित्य उपलब्ध असते. आंबेडकरी चळवळीचे गायक, कलावंत आणि लेखकांचे स्वतंत्र स्टॉल लावून गाण्याच्या कॅसेट, पुस्तके विकतात. मैदानावर डॉ धर्मेंद्र राऊत यांच्यासह अनेक डॉक्टर्स आणि आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य सुविधा उप
लब्ध केल्या जातात.काही संस्था आणि मंडळे स्टेशन चौकापासून रस्त्याच्या कडेला ते मैदानाच्या आत देखील भिम अनुयायांकरीता भोजन पाण्याची मोफत व्यवस्था करतात.

ह्या मिरवणूक आणि सभेचे स्वरक्षण करण्यासाठी मागील काही वर्षात समता सैनिक दला बरोबर मिरवणूक नियंत्रण समिती, धम्म रथ सजावट समिती, मैदान सुरक्षा समिती आणि स्टेज व्यवस्थापन समिती ह्यांनी विशेष यंत्रणा नेमली जाते. 2013 सालापासून राजेंद्र पातोडे मिरवणूक नियंत्रण समिती प्रमुख झाल्या नंतर मिरवणूक नियंत्रण समितीला नवीन स्वरूप दिले. मिरवणूक नियंत्रण समितीचे ट्रॅकसूट असलेल्या तरुणांच्या हातात मिरवणुकीची सूत्रे सोपविलेली असते. मिरवणूक मार्गावरील प्रत्येक चौक आणि संपुर्ण मिरवणूक मार्गावर मिरवणूक नियंत्रण समितीचे तरुण कार्यकर्ते मिरवणुकीचे नियंत्रण आणि संचालन करतात. त्यामुळे पोलिसांवरील मिरवणूक नियंत्रणाचा भार नसतो. कुठेही वाद किंवा गडबड होऊ दिली जात नाही.विशेष म्हणजे दरवर्षी दुर्गा विसर्जन, दस-याच्या  दुस-या दिवशी असते .नेमके त्याच दिवशी मिरवणूक आणि जाहीर सभा होते. परंतु 38 वर्षात दोन्ही मिरवणुका एकाच वेळी वेगवेगळ्या मार्गाने एकाच वेळी जातात मात्र कुठलाही अनुचित प्रकार कधीही घडला नाही.


BLOG: अकोल्यातील प्रकाश आंबेडकर आकर्षण धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचा 38 वर्षांचा इतिहास

 

आंबेडकर कुटुंबीयांची एकत्रित उपस्थिती आकर्षणाचे केंद्र  

या सोहळ्याची अनेक वैशिष्ट्य राहिली आहेत. आई मीराताई आंबेडकर यांच्यासोबत बंधू भिमराव आंबेडकर, आनंदराज आंबेडकर व बाळासाहेब ह्या भावंडाची एकत्रित उपस्थिती या कार्यक्रमाला अनेकदा राहिली आहेत. मागच्या काही वर्षांत बाळासाहेबांसोबत प्रा.अंजली आंबेडकर, मनीषा आनंदराज आंबेडकर आणि बाबासाहेबांच्या चौथ्या पिढीतील सुजात आंबेडकर, ऋतिका भीमराव आंबेडकर, साहील आणि अमन आंबेडकर ह्यांची हजेरी असते.

अन् मीरातीईंनी केली प्रकाश आंबेडकरांना समाजाला 'दान' केल्याची घोषणा.. 

  जिल्ह्याला भारावून टाकणारा एक प्रसंग घडला होता तो अगदी पहिल्याच सोहळ्यात. या सोहळ्यात मीराताई आंबेडकर ह्या भाषणासाठी उभ्या राहिल्या. त्यांनी यावेळी केलेल्या भावनिक भाषणानं सभेतील लोक पार हेलावून गेले होते. त्या म्हणाल्या होत्या की, "बाबासाहेबांनी आपल्या हयातीत जे काही कमवलं ते सर्व समाजाला देवून टाकलं, माझ्याकडे बाबासाहेबांनी कमाविलेल्या संपत्तीतलं काहीही नाही. परंतु, आज समाज आंबेडकर कुटुंबांकडे प्रचंड आशेने पाहतो आहे. माझ्याकडे बाबासाहेबांची संपत्ती सली तरी माझ्याकडे बाबासाहेबांचा नातू आहे आणि तो मी आज समाजाच्या ओटीत टाकते आहे”.... ह्या वाक्याने सभा स्तब्ध झाली... मीराताईंच्या भाषणाने उपस्थित समूहाच्या काळजाचा वेध घेतला... जनतेच्या डोळ्यात अश्रू तरळले... अन टाळ्यांचा कडकडाटात बाळासाहेबांच्या नेतृत्वाचा स्विकार केला गेला.आणि नेता, पक्ष, संघटना फिनिक्स पक्षाप्रमाणे झेपावली.पुढच्या काळात ’बहुजन सारे एक होवू, सत्ता आपल्या हाती घेऊ‘ हा नारा देत सत्ताबाह्य समूहाला सत्ताधारी होण्याचा राजमार्ग प्रशस्त करणा-या ‘बहुजन पॅटर्नने’ जन्म घेतला. पुढे हाच पॅटर्न महाराष्ट्रात 'अकोला पॅटर्न' नावाने ओळखला गेला. 

अन् प्रकृतीच्या समस्येनंतरही परंपरा थांबली नाही. 

 8 जुलै 2021 रोजी सकाळी प्रकाश आंबेडकर ह्यांचा एक व्हिडीओ सकाळी सोशल मिडियात आला. तीन महिने राजकीय कार्यक्रमांपासून दूर राहणार असल्याची घोषणा त्यांनी सदर व्हिडिओच्या माध्यमातून केली.अचानक आलेल्या ह्या व्हिडीओने अनेक तर्क-वितर्कांना उधाण आलं होतं. बाळासाहेबांनी व्यक्तिगत कारणांसाठी पक्षाच्या कार्यक्रमांपासून पुढील तीन महिने दूर राहणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर तीन महिन्यांच्या कार्यकाळात पक्षाचे कार्यक्रम सुरू राहावेत यासाठी पक्षाच्या जेष्ठ नेत्या आणि महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांची पक्षाच्या प्रभारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्याच व्हिडीओमध्ये पक्षाच्या प्रभारी अध्यक्षा म्हणून रेखाताई ठाकूर ह्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात येत असल्याची घोषणा देखील होती. एखाद्या राजकीय नेत्याने तीन महिन्यांच्या सुट्टीची घोषणा केल्याची ही अभूतपूर्व घटना असल्याने अनेक तर्क- वितर्क लढवण्यात येत होते.दरम्यान, "माझ्या व्यक्तिगत कारणासाठी पक्षाच्या दैनंदिन कार्यक्रमातून तीन महिन्यासाठी कार्यरत राहणार नाही. पक्ष चालला पाहिजे. आपण आंदोलनाला सुरुवात केली आहे. राज्यातील पाच जिल्ह्यामध्ये निवडणुका आहेत. म्हणून पक्षाला अध्यक्ष असणे महत्वाचे आहे, असे सांगत वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी प्रभारी म्हणून रेखाताई ठाकूर यांची नियुक्त करण्यात येत आहे. पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांनी रेखाताई ठाकूर यांना सहकार्य करून पक्षाचे कार्यक्रम राबवावेत", असे आवाहनही बाळासाहेब आंबेडकर यांनी व्हिडीओद्वारे केले होतं. त्याचे खरे कारण समोर आलं होते की त्यांचे वर बायपास सर्जरीची तातडी असल्याने त्यांनी सुट्टी आणि प्रभारी अध्यक्ष नेमण्याचा निर्णय घेतला होता.

त्याच दिवशी अर्थात गुरुवार 8 जुलै 2021 रोजी तातडीने त्यांचेवर बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली.सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल, मुंबई डॉ.अन्वयमुळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने हि शस्त्रक्रिया केली होती. वंचितच्या प्रभारी अध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी मेडिकल बुलेटिन जाहीर करीत यासंदर्भात माहिती माध्यमं आणि सोशल मीडियावर दिली होती.बाळासाहेब आंबेडकर हे आयसीयूमध्ये असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे जाहीर करण्यात आले होते. अजून काही दिवस त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येईल, असेही रेखाताई ठाकूर यांनी म्हटलं होतं. मुंबईतील मुस्लिम समाजाच्या आरक्षण मोर्चाचे नेतृत्व करण्यासाठी ते मुंबईत दाखल झाले होते.मात्र सकाळीच त्रास व्हायला लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्यापूर्वी मराठा क्रांती मोर्चा मध्ये कोल्हापूर येथे छत्रपती संभाजी महाराज ह्यांचे सोबत आंदोलन करताना बाळासाहेबांना त्रास जाणवला होता, मात्र त्याकडे दुर्लक्ष केले होते.

दिनांक 17 जुलै 2021 रोजी सुजात आंबेडकर ह्यांनी त्यांचे फेसबुक वरून आंबेडकर परिवाराच्यावतीने एक निवेदन प्रसिद्ध केले होते.त्या निवेदनाचा मजकूर असा होता. "सुजात आंबेडकर, रितिका आंबेडकर, साहिल आंबेडकर, अमन आंबेडकर आणि संपूर्ण आंबेडकर कुटुंबियांच्यावतीने  सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल, मुंबई डॉ. अन्वय मुळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे आभारी आहोत.अॅड प्रकाश आंबेडकर यांच्यावर शस्त्रक्रिया करणारे वैद्यकीय टीम, पॅरामेडिकल आणि रुग्णालयातील इतर सर्व कर्मचार्‍यांचे आम्ही ऋणी आहोत. आपणा सर्वांचे खूप आभार. धन्यवाद !" अर्थात आंबेडकरी चळवळीवर आलेले एक मोठे संकट दूर झाले होते.दरम्यान अकोला जिल्हा परिषद सह काही ठिकाणी पोटनिवडणुका लागल्या मात्र त्याला त्या निवडणुकीत पहिल्यादा ते अनुपस्थित होते.अकोल्यातील कार्यकर्त्यांनी ही निवडणूक एकजुटीने लढत पोटनिवडणुकीच्या जिल्हा परिषदेच्या 14 पैकी 6 जागांवर विजय मिळवला होता.आणि 28 पंचायत समिती गणात पोटनिवडणूक पार पडली होती.28 पैकी 16 जागा वंचितने जिंकल्या.

अन् बाळासाहेबांनी सभा घेतली 

तीन महिन्याचे सुट्टीनंतर बाळासाहेब आंबेडकर पहिल्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले तो कार्यक्रम होता.भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वातील धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्याचा.कोविडच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी नव्हती.त्यामुळे  16 ऑक्टोबर 2021 रोजी अकोला जिल्हा परिषद अध्यक्षांचे निवास्थानी मोजक्या निमंत्रित पदाधिकारी कार्यकर्त्याच्या उपस्थितीत आयोजित डिजिटल धम्मचक्र प्रवर्तन सोहळा २०२१ चे आयोजन करण्यात आले होते.आजारपणातून उठल्यानंतर प्रकाश आंबेंडकरांनी या ऑनलाईन सभेत कार्यकर्त्यांना पुढची दिशा दिली. 

प्रत्येक पाच वर्षांनी देशाचे आणि राज्याचे भवितव्य ठरविणार्या निवडणूका होतात.त्या अनुषंगाने धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्यात प्रकाश आंबेडकर काय घोषणा करतात?, काय बोलतात यावर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असते. त्यामुळे खऱ्या अर्थाने  हा धम्मचक्र प्रवर्तन दिन राज्य व देशाच्या राजकारणाला दिशा देणारी ठरत असतो. ही सभा भारतीय बौद्ध महासभा भारिप, भारिप बहुजन महासंघ आणि वंचितच्या राजकीय वाटचालीतील महत्वाचा दस्तावेज आणि वळण ठरलेली असते. या सोहळ्याचे मुख्य वक्ते म्हणून गेल्या 38 वर्षांपासून प्रकाश आंबेडकर आहेत. शिवसेनेत दसरा मेळाव्याचं जे महत्व आहे तेच महत्व वंचित बहूजन आघाडीत या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचं आहे. आंबेडकर आजच्या सभेत सध्याची महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती, काँग्रेस-सेनेसोबतची संभाव्य आघाडी यांसह अनेक विषयावर काय बोलतात?, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. 

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget