पायी आषाढी वारीला बायोबबल नियमानुसार परवानगी द्यावी, फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
कोरोनाचे वाढते संकट, रोज सापडणारे नवनवीन स्ट्रेन, तिसऱ्या लाटेचा दिलेला इशारा अशा परिस्थितीत आषाढी पायी वारीला नागरिक आणि प्रशासनाकडून टोकाचा विरोध सुरु झाला आहे. अशातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बायो बबलमध्ये पायी वारीला परवानगी देण्याचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. गेल्यावर्षी पेक्षा यंदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठी मनुष्यहानी झाली आहे. अजूनही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडण्याचे सत्र सुरु आहे. अशावेळी यंदाही गेल्यावर्षी प्रमाणे आषाढी यात्रेला येणारे पालखी सोहळे बसमधून आणण्याची मागणी पंढरपूर, आळंदी येथील नागरिकांसह पालखी मार्गावरील गावातील ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनानेही यंदा पायी वारीबाबत ठाम आणि कठोर भूमिका घेत पायी वारील विरोध केला आहे. मात्र वारकरी संप्रदाय पायी वारीसाठी ठाम असल्याचे चित्र आहे. वास्तविक वारकरी संप्रदायाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनाही पायी वारी संदर्भात मागणी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालखी सोहळा आणि देवस्थान प्रतिनिधींशी बैठकीत चर्चा करून पायी वारीचे धोके संप्रदायाला दाखवून दिले आहेत. असे असताना वारकरी संप्रदायाने मग विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुन्हा पायी वारीची मागणी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
























