Devendra Fadanvis Ashti Speech : सुरेश धस मागे लागले की डोकं खावून टाकतात..फडणवीस असं का म्हणाले?
बीड : सुरेश धस हे आधुनिक भगीरथ असून ते एकदा मागे लागले तर डोकं खातात असं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. महायुतीचं सरकार असताना त्यांनी मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मेहनत घेतल्याचं सांगत फडणवीसांनी सुरेश धस यांचे कौतुक केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आष्टी येथील कुंटेफळ साठवण तलावाचे भूमिपूजन करण्यात आलं. त्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते. या तलावामुळे दुष्काळी आष्टी तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
आमदार सुरेश धस यांनी देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख देवेंद्र बाहुबली असा केला. आमदार सुरेश धस यांच्याकडून भरसभेत फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. बाकी कोणाकडून अपेक्षा नाही, पण देवेंद्र फडणवीसांकडून अपेक्षा आहे असं धस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये आपल्याला जलसंधारण खातं मिळालं. त्यावेळी सुरेश धस मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर अगदी मागेच लागायचे. ते सातत्याने पाठपुरवठा करायचे. सुरेश धस मागे लागले की डोके खावून टाकतात."




















