Supriya Sule: काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
महाराष्ट्र काँग्रेसने केलेल्या गुंगी गुडिया टीकेवर सुप्रिया सुळे पहिल्यांदाच स्पष्टपण बोलल्या. सुनेत्रावहिनींबद्दल महाराष्ट्र काँग्रेसने एक वक्तव्य केलं ते अयोग्यच होतं.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याबद्दल महाराष्ट्र काँग्रेसने आक्षेपार्ह ट्विट केले होते, गुंगी गुडिया म्हणत काँग्रेसने केलेल्या टीकेचं प्रदेशाध्यक्ष तथा इतरही काँग्रेस नेत्यांकडून समर्थन करण्यात आलं होतं. त्यावरुन, राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्यांनी राज्यभरात काँग्रेस आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरुद्ध निषेध आंदोलनही केलं. तर, गुंगी गुडिया हे आक्षेपार्ह नसून सुनेत्रा पवारांनी आपल्या कृतीतून ते सिद्ध करावं, आदर्श निर्माण करावा, असेही सपकाळ यांनी म्हटलं होतं. आता, काँग्रेसच्या या टीकेवर सुप्रिया सुळेंनी (Supriya sule) पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार पंतप्रधानांना भेटणार आहेत, त्याबाबतही माहिती दिली.
महाराष्ट्र काँग्रेसने केलेल्या गुंगी गुडिया टीकेवर सुप्रिया सुळे पहिल्यांदाच स्पष्टपण बोलल्या. सुनेत्रावहिनींबद्दल महाराष्ट्र काँग्रेसने एक वक्तव्य केलं ते अयोग्यच होतं. मी याबाबत काँग्रेसच्या नेतृत्वाकडे बोलले, मी काँग्रेस नेतृत्त्वाचे याबाबत आभार मानते, मी काँग्रेसच्या नेतृत्वाशी बोलण्यानंतर काँग्रेसने अर्ध्या तासातच त्यांचा स्टँड क्लिअर केला. काँग्रेसच्या महाराष्ट्र स्थानिक आयटी सेलकडून हा प्रकार झाला आहे, हे राष्ट्रीय काँग्रेसचं मत नाही, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. देशाच्या काँग्रेस नेृतत्वाने हे स्पष्ट केलं असून महाराष्ट्राची काँग्रेस आणि देशाच्या काँग्रेसमध्ये वेगळी मतं आहेत. तसेच, कुणाचा अपमान होईल असं कोणी बोलू नये, केंद्राच्या काँग्रेसने मनाचा मोठेपणा दाखवला आहे, असेही सुप्रिया सुळेंनी म्हटले. तसेच, पंतप्रधानांना 8 खासदार भेटणार असल्याबाबत स्पष्टीकरण देखील त्यांनी दिलं
पंतप्रधान भेटीचं कारणही सांगितलं.
आमच्या राष्ट्रवादी पक्षातील एक दोन खासदारांची भूमिका होती की महाराष्ट्राचे गंभीर प्रश्न आहेत. दुर्दैवानं संसद चालत नाही. त्यामुळे, माननीय पंतप्रधानांना महाराष्ट्रात जी परिस्थिती आहे, ज्यात पाण्याचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील. सातत्यानं शहरीकरणात होणारे मोठे प्रश्न आहेत. सगळ्या खासदारांना 5 कोटी रुपयांचा विकासनिधी मिळतो, त्याच्या अंमलबजावणीला आव्हानं येतात, याबाबत भेटायचं आहे. महाराष्ट्र सरकारकडून अपेक्षित मदत खासदारांना मिळत नाहीत, असे प्रश्न जे विकासाच्या चौकटीतील आहेत, त्यासाठी ही भेट असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. आपण हे सगळे प्रश्न घेऊन पंतप्रधानांकडे जाऊ या का? या भूमिकेतून आठ खासदारांनी मोदींकडे वेळ मागितली होती. आमच्या आठ खासदारांना पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी सकाळी 11 वाजता संसदेतील कार्यालयात भेटीची वेळ दिली. एकनाथ शिंदे यांच्या खासदारांना नाश्त्याला बोलावलं होतं, आम्हाला नाश्त्याला बोलावलं नाही, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
हेही वाचा























