एक्स्प्लोर
Advertisement
बांगलादेशविरुद्ध टीम इंडिया सज्ज, फायनलपासून एक पाऊल दूर!
लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रणांगणात बलाढ्य न्यूझीलंडवर मिळवलेल्या विजयानं बांगलादेशचा आत्मविश्वास टीपेला पोहोचला आहे आणि त्या बांगलादेशचा सामना करायचा आहे तो विराट कोहलीच्या टीम इंडियाला. चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत आणि बांगलादेश संघांमधला हा उपांत्य सामना आज बर्मिंगहॅमच्या एजबस्टनवर खेळवण्यात येईल.
संघांत बर्मिंगहॅमच्या एजबस्टनवर खेळला जाणारा उपांत्य सामना. या सामन्यात आपण बलाढ्य टीम इंडियाला हरवू शकतो, ही आशा, तो विश्वास आपल्या मनात जागवण्यासाठीच बांगलादेशच्या शिलेदारांनी सूर आळवला तो आमारा कोरबो जॉय... या समूहगीताचा.
बांगलादेशच्या ड्रेसिंगमधल्या या समूहगीताचा व्हिडीओ पाहताना पहिल्यांदा नजरेत भरते ती कर्णधार मश्रफे मोर्तझा आणि त्याच्या शिलेदारांची आत्मविश्वासानं ओतप्रोत भरलेली देहबोली. बांगलादेशच्या खेळाडूंमध्ये हा इतका आत्मविश्वास आला कुठून?
बांगलादेशच्या खेळाडूंमधल्या या उंचावलेल्या आत्मविश्वासाचं कारण आहे त्यांनी अखेरच्या साखळी सामन्यात न्यूझीलंडचा पाच विकेट्सनी केलेला पराभव. बांगलादेशच्या गोलंदाजांनी या सामन्यात न्यूझीलंडला आठ बाद 265 या माफक धावसंख्येत रोखलं होतं. त्यानंतर बांगलादेशचीही चार बाद 33 अशी घसरगुंडी उडाली होती. पण शकिब अल हसन आणि महमुद उल्लानं वैयक्तिक शतकं झळकावून, बांगलादेशला त्या केविलवाण्या परिस्थितीतून बाहेर काढलं आणि चक्क विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलं. त्या दोघांनी पाचव्या विकेटसाठी थोडीथोडकी नाही, तर तब्बल 224 धावांची भागीदारी रचली. न्यूझीलंडविरुद्धच्या याच कामगिरीनं बांगलादेशला एक मोठा आत्मविश्वास मिळवून दिला आहे.
पण हा आत्मविश्वास बांगलादेशला टीम इंडियाला हरवण्याचं बळ मिळवून देऊ शकतो का? या प्रश्नाचं उत्तर कागदावर तरी नाही असंच आहे. वास्तविक कागदावरच काय, पण मैदानावरही विराट कोहलीची टीम इंडिया बांगलादेशच्या तुलनेत लय भारी आहे.
इऑन मॉर्गनच्या इंग्लंडच्या बरोबरीनं यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीत आपली ताकद दाखवून देणारा संघ कोणता असेल तर तो आहे टीम इंडिया. श्रीलंकेविरुद्धच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा आणि बोथट आक्रमणाचा अपवाद सोडला तर भारतीय शिलेदारांनी चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपल्या कामगिरीचा नेटका ठसा उमटवला आहे. शिखर धवन, रोहित शर्मा आणि विराट कोहली सातत्यानं धावा करत आहेत. युवराजसिंग आणि महेंद्रसिंग धोनीनंही संधी मिळताच आपलं उखळ पांढरं करून घेतलं. आता बांगलादेशसमोरही आपली धावांची टांकसाळ पुन्हा उघडायला भारतीय फलंदाज उत्सुक असतील.
भारतीय फलंदाजांच्या चॅम्पियन्स ट्रॉफीतल्या दादागिरीला वेसण घालण्यासाठी बांगलादेशनं आपल्या वेगवान अस्त्रांचा वापर करण्याची रणनीती आखल्याची माहिती आहे. रुबेल हुसेन, टस्किन अहमद, मुस्तफिजूर रेहमान आणि मश्रफे मोर्तझा ही वेगवान चौकडी बर्मिंगहॅमच्या लढाईत भारतीय फलंदाजांवर चाल करून जातील.
बांगलादेशच्या या वेगवान आक्रमणाला टीम इंडियाच्या भात्यात संमिश्र आक्रमणाचं उत्तर आहे. भारताच्या भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या आणि रवींद्र जाडेजाकडून श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात झालेल्या चुका त्यांनी दक्षिण आफ्रिकेसमोर सुधारलेल्या दिसल्या. रवीचंद्रन अश्विननंही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात आपल्या ऑफ स्पिनच्या अस्त्राला धार काढून घेतली. बांगलादेशच्या संघातही तमिम इक्बाल, सौम्या सरकार आणि शकिब अल हसन यांच्यासारख्या डावखुऱ्या फलंदाजांचा भरणा आहे. त्यामुळं अश्विनचे हात नक्कीच शिवशिवत असतील.
टीम इंडियाचं दक्षिण आफ्रिकेविरुद्धचं क्षेत्ररक्षण इतकं चपळ होतं, की भारतीय क्षेत्ररक्षकांनी त्यांच्या तीन फलंदाजांना धावचीत केलं. टीम इंडियाच्या फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातल्या याच सुधारित आवृत्तीनं दक्षिण आफ्रिकेसारख्या नंबर वन टीमलाही साफ चिरडून टाकलं. विराट कोहली आणि त्याच्या शिलेदारांनी बर्मिंगहॅमच्या लढाईतही तोच फॉर्म कायम राखला तर बांगलादेशचं काही खरं नाही.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement