Wet Drought Farmers: शिंदे गटाच्या आमदारामुळे सरकार अडचणीत, इतके दिवस फडणवीस-अजितदादांनी टाळलं नेमकं तेच केलं, म्हणाला...
Santosh Bangar : ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे, शेतकऱ्याला 30-40, 50-70% या पद्धतीने नाही, तर 100% नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. अशी मागणी शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी केली आहे.

Marathwada Rain Update हिंगोली : राज्यात यंदा मुसळधार पावसाने सर्वत्र थैमान घातलं असून राज्यभरासह मराठवाड्यात सतत जोरदार सुरू असलेल्या पावसामुळे (Marathwada Rain) शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्यातच हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात सुद्धा हातातोंडाशी आलेले शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. या परिस्थितीत विरोधकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा, ही मागणी केली जात असताना आता सत्ताधारी आमदाराकडून सुद्धा ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यातच आता शिवसेना आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे अशी मागणी केली आहे. तर राज्याचे मुख्यमंत्र्यांना आम्ही जाऊन निवेदन दिलं आहे. शेतकऱ्याला 30-40, 50-70% या पद्धतीने नाही तर 100% नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. अशी मागणीही आमदार संतोष बांगर यांनी केली आहे.
राज्यभरात पावसाने शेतकऱ्याचं अतोनात नुकसान केलं आहे. परिणामी ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे. कारण गावांमध्ये शेतामध्ये जाऊन पाहिलं तर सोयाबीनला काहीही राहिलेलं नाही. सोयाबीन संपूर्ण सडून गेला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शेतकऱ्याच्या पाठीशी आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्य शासनाचे मंत्री नुकसान पाहणी करून आढावा घेण्यासाठी पाठवले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकर नुकसान भरपाई मिळेल. असा विश्वासही आमदार संतोष बांगर यांनी बोलताना व्यक्त केला आहे.
माढा तालुक्यातील 16 गावांना पुराचा तडाखा (Floods Hit 16 Villages in Madha)
शेतकऱ्यांना तातडीने 50 हजारांची मदत करा, अन्यथा विधानसभेत आवाज उठवणार, असा इशारा माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी सरकारला दिला आहे. कोणतेही निकष न लावता पूरग्रस्त शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी सरकारने तातडीने 50 हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी अभिजीत पाटील यांनी केली आहे. माढा तालुक्यातील 16 गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. त्यामुळे नवरात्र उत्सवातील कार्यक्रम रद्द करा आणि पूरग्रस्तांना मदत करा, असे आवाहन अभिजीत पाटील यांनी केलं आहे. शेतीबरोबर दुकान व्यवसायिकांना देखील मदत मिळावी, शाळांचे मोठे नुकसान झाले आहे त्यांनाही मदत करावी. कोल्हापूर-सांगलीच्या धर्तीवर मदत करू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिल्याची माहिती अभिजीत पाटील यांनी दिली आहे. मात्र पूरग्रस्तांना मदत मिळाली नाहीतर सभागृहात आवाज उठवणार असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























