Maratha reservation Pune : मराठे आक्रमक! पुणे-सातारा मार्ग रोखला, नवले पुलाजवळ जाळपोळ, रुग्णवाहिका अन् स्कूल बस दोन तासांपासून जागेवरच...
मराठा आंदोलकांनी पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नवले पुलाजवळ रस्ता अडवला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली आहे. पाच ते सात किलोमीटरपर्यंत दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहे.

पुणे : मराठा आंदोलनाची धग आता पुण्यापर्यंत येऊन पोहचली आहे. आंदोलकांनी (Maratha Reservation Protest) पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नवले पुलाजवळ रस्ता अडवला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली आहे. पाच ते सात किलोमीटरपर्यंत दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहे. महत्वाचं म्हणजे यात रुग्णवाहिका आणि स्कूलबसेसदेखील अडकल्या आहे. मागील दोन तासांपासून विद्यार्थी आणि रुग्ण तातकळत आहे. शिवाय अनेक नागरिकदेखील वाहतूक कोंडीत अडकले आहेत.
पुण्यातील नवले पुलावर मराठे आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे. अनेक मराठा कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचं बघायला मिळत आहे. नवले पुलावर टायरची जाळपोळ करत आहे. रस्त्याच्या मधोमध टायर जाळल्याने नवले पुलाजवळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. परिसरात धूराचे लोट पसरल्याचं बघायला मिळत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मात्र त्यातच या कार्यकर्त्यांकडून टायरची संख्या वाढवण्यात येत आहे. मागील दोन तासांपासून पूर्ण वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यातच महिला आणि लहान मुलंदेखील अडकले आहे. अनेक पुणेकरांना आपापल्या कामासाठी रवाना व्हायचं आहे. मात्र ही जाळपोळ पाहून अनेक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शिवाय नागरिकांचे कामंदेखील खोळंबले आहे.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त...
नागरिकांचे हे हाल पाहून आणि परिस्थिती चिघळत असल्याचं पाहून पोलीस मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहे. वाहतूक कोंडी सोडवून नागरिकांना नीट मार्गस्थ होऊ द्या, अशी विनंती पोलिसांकडून मराठा कार्यकर्त्यांना केली जात आहे. मात्र मराठा कार्यकर्ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांच्याकडून घोषणाबाजी केली जात आहे. रस्त्यांच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा आहेत आणि मराठा कार्यकर्तेदेखील गर्दी करत आहे. गर्दी वाढण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मराठा आरक्षण द्या... नाहीतर...
सरकारने लवकरात लवकर मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घ्यावा. त्यांनी आरक्षण द्यावं आणि राज्यातील मराठ्यांचा प्रश्न सोडवावा,. अनेक लोक आत्महत्या करत आहेत. अनेक ठिकाणी कायदा आणि व्यवस्थेचा मुद्दा निर्माण झाला आहे. राज्यातली ही परिस्थिती नियंत्रणाल आणायाची असेल आणि सगळं सुरळीत करायचं असेल तर त्यांनी थेट आरक्षण जाहीर करावं. नाही तर महाराष्ट्र असाच पेटत राहिल, असं मराठा कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.
इतर महत्वाची बातमी-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
